बुधवार, १९ मार्च, २०२५

मा.मं. म्हणजे काय ? - लेखक- डॉ.अशोक राणा, यवतमाळ.

‘मामं’ म्हणजे काय ?

                                इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले आहे. प्रा. मा.मं.देशमुख यांच्या जीवन चरित्रावर प्रसिद्ध लेखक अभ्यासक डॉ.अशोक राणा ( यवतमाळ ) यांनी लिहिलेला लेख.


डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

          ‘मा.मं.' म्हणजे इतिहास, ‘मामं’ म्हणजे प्रबोधन आणि ‘मामं’ म्हणजे स्वस्त पुस्तकं. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रबोधनासाठी इतिहासाचा योग्य वापर करून लिहिलेली पुस्तकं स्वस्तात उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणजे ‘मामं’. असा ‘मामं’ चा थोडक्यात परिचय करून देता येईल.  यापलीकडे सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय प्रबोधनाचा जागर करण्यासाठी पायाला भिंगरी लागल्यागत भटकणारा माणूस म्हणूनही त्यांचा परिचय महाराष्ट्रभर आहे. गेल्या शतकामध्ये त्यांची व्याख्याने न ऐकलेली व्यक्ती अभावानेच आढळेल.

  वाचक चळवळ 

 “ ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट,त्याचं घर होईल सपाट “ हे वाक्य कानी पडलं की एकच नाव ओठावर येते व ते म्हणजे मा.म.देशमुख. “ वाचाल,तर वाचाल ” हेही त्यांनी कानोकानी पोहोचविलेलं वाक्य मराठीतील वाक्प्रचारासारखं अनेकांच्या ओठावर स्थिरावलेलं आहे. एका परीने त्यांनी एकाकीपणे वाचक चळवळ महाराष्ट्रात रुजविलेली आहे. परंतु,या दृष्टिने त्यांची दखल कुणी घेतल्याचे दिसून येत नाही. अर्थात, शासनाने या कार्यासाठी त्यांना सन्मानित केले नाही. परंतु,त्याची तमा कधीही त्यांनी बाळगली नाही. शासकीय पुरस्कार,पदव्या,सन्मान या प्रलोभनापासून तर ते खूपखूप दूर आहेत. आकाशवाणी,दूरदर्शन, वृत्तपत्रे यांच्या प्रसिद्धीचाही स्पर्श त्यांना झाला नाही. तरीही जनसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलेली व्यक्ती म्हणून ‘मामं’ चा उल्लेख करावा लागेल.

 शासकीय पुरस्कार,मान-सन्मान व पैसा प्राप्त करण्यासाठी हातभार जिभा काढून लाल गाळत राजकीय नेत्यांच्या उंबरठ्यावर उभी असलेली लाचारांची फौज पाहिली की, ‘मामं’ च्या स्वाभिमानाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमान व स्वातंत्र्य कशाला म्हणतात,हे समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. त्यांनी नागपूरच्या रेशीमबागेतील प्रतिगामी धटिंगणांची लक्तरे वेशीवर टांगलीत व त्यांच्याशी चार हात केले. त्यातून त्यांच्या काळ्याकुट्ट भूतकाळाची ओळख मराठी वाचकाला झाली.

 सत्यशोधनाचा वसा 

 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधनाचा वसा घेतलेली जी काही मोजकी माणसे महाराष्ट्रात आहेत,त्यापैकी एक आहेत मा.म.देशमुख.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोल्हापुरात उभारणाऱ्या भाई माधवराव बागल यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. भारतीय जनतेला माहितीचा अधिकार मिळावा म्हणून लोकचळवळ उभारणारे न्या.पी.बी. सावंत त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून धावून आले. भारतीय कृषिक्रांतीचे प्रणेते भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणाची गंगा पोहोचविणारे शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे सान्निध्य त्यांना लाभले. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे लोकविद्यापीठाचे स्वप्न साकारणारे वीर उत्तमराव मोहिते यांची प्रेरणा त्यांच्या इतिहास संशोधनाला मिळाली. संत गाडगेबाबांची शिकवण अंगिकारून अज्ञान व अंधश्रद्धेची जळमटे नाहीशी करण्याचे स्फुरण त्यांना मिळाले. भारतात बहुजनवाद रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या मा.कांशीरामजी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भारतभर भ्रमण केले.

 अशा या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाची प्रेरणा घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांपैकी मीही एक आहे.  भारतातील साहित्य संस्थांमध्ये चालणाऱ्या जातीयवादी कट-कारस्थानांची माहिती देणारे ‘साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही’ हे माझे पहिले पुस्तक होय. त्याचे प्रकाशन २७ डिसेंबर१९८७ रोजी ठाणे येथे झालेल्या तथाकथित अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कविवर्य प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्याला वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिल्यामुळे त्याची खूप चर्चा महाराष्ट्रभर झाली. त्यानंतर ‘सा.बहुजन नायक’ वाचक-लेखक मेळाव्याच्या निमित्ताने आर्वी येथे झालेल्या ‘पहिल्या बहुजन साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद मला मिळाले. या संमेलनाचे उद्घाटन प्रा.मा.म. देशमुख यांच्या हस्ते झाले. माझ्यासाठी हा सन्मानाचा प्रसंग होता. यानिमित्ताने पहिल्यांदाच मी मामं.च्या सोबत विचारपीठावर स्थानापन्न झालो. 

 बहुजन समाज पक्षाच्या उभारणीत मामं.चे मोलाचे योगदान होते. त्यामुळे मलाही त्यात सहभागी होण्याची इच्छा झाली. भिंती व रस्ते रंगविणे, पोस्टर, बिल्ले स्क्रीन प्रिंटींगद्वारे छापणे,भाषणे देणे इ.उपक्रमात माझा सहभाग वाढला. त्यामुळे मला महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेरसुद्धा जावे लागले.   

 त्यांची व्याख्याने ऐकून व पुस्तके वाचून मला शिवरायांच्या राज्याभिषेकाच्यावेळी झालेल्या त्यांच्या अपमानाची जाणीव झाली. त्यातून माझे ‘शिवाजी शूद्र कसा ?’ हे पुस्तक आकाराला आले. १९८८ मध्ये यवतमाळ येथील नगर वाचनालयात साम्यवादी विचाराच्या संघटनांनी ‘जातीयवाद विरोधी मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्यातील प्रमुख वक्ते कॉ.गोविंद पानसरे व अध्यक्ष मी होतो. या प्रसंगी कॉ.पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ” या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्याच विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी शिवसेनेच्या लोकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. यानंतर मी कॉ.पानसरे यांचे पुस्तक वाचले. त्यातून मला ‘शिवाजी शूद्र कसा ?” या पुस्तकाचे शीर्षक सुचले. आज महाराष्ट्रभर हे पुस्तक वाचले जाते व त्यामुळे लेखक म्हणून मला ओळख मिळाली.

 रामदासाची लंगोट

 रामदासावर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मा.म.होत. हे वाक्य आपणास धक्कादायक वाटू शकते. परंतु,आजवर रामदासावर जेवढे लेखन सातत्याने त्यांनी केले,ते   पाहिले असता आपणास त्याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या काही निष्कर्षांवर डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे स्वीय सचिव वीर उत्तमराव मोहिते यांचा प्रभाव होता. अमरावतीच्या प्रभात टॉकीजमध्ये ‘भगवा झेंडा’ या चित्रपटात रामदासांच्या पाया पडताना शिवाजी महाराजांना दाखविले होते. या अनैतिहासिक प्रसंगामुळे शिवरायांचा अपमान झाला आहे,असे वाटल्यामुळे उत्तमराव मोहिते यांनी चित्रपटाचा पडदा फाडला होता. त्यामुळे पोलीस त्यांना घेऊन जात होते. डॉ.पंजाबराव देशमुख यांना ते दिसले तेव्हा त्यांनी त्यांना सोडविले. उत्तमराव मोहिते यांच्या या धाडसामुळे त्यांनी त्यांना ‘वीर’ ही पदवी दिली. त्यामुळे ते वीर उत्तमराव मोहिते या नावाने ओळखले जाऊ लागले.

 वीर उत्तमराव मोहिते यांनी ‘रामदासाचा राष्ट्रद्रोह’ स्पष्ट करून त्यांना ‘आदिलशहाचा हेर’ म्हटले. हाच धागा पुढे धरून ‘मामं’नी रामदासाच्या कृष्णकारस्थानाचा पर्दाफाश केला. रामदासाच्या उपदेशातून ब्राह्मण संघटित झाले व त्यामधून पेशवाई अस्तित्वात आली. या संशोधनाला सर्वसामान्य वाचक व श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘मामं’ना यश आले. त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन होऊन अनेक पुरोगामी संघटनांना कार्यकर्ते मिळाले. एका व्यक्तीने प्राणपणाने आपल्या स्वीकृत कार्यासाठी प्रबोधनाचा जागर सुरू ठेवला तर माणसे बदलतात,हे या निमित्ताने महाराष्ट्राला कळले. शिवचरित्रात रामदासाची घुसखोरी कशी व कुणी केली यावर सातत्याने ‘मामं’ नी लेखन व भाषणे केल्यामुळे रामदासांना नाकारण्याची मानसिकता नव्या पिढीत तयार झाली. पुरंदरेंच्या पिलावळीने रामदासाला शिवचरित्रात प्रतिष्ठित करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. परंतु,त्यांना हार मानावी लागली. ‘मामं’च्या प्रबोधनामुळे रामदासाची केवळ लंगोट शिल्लक राहिली. पत्रकारितेचा आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,अशा आचार्य अत्रेसारख्या लेखकाने त्यांच्या विरोधात आपली लेखणी झिजविली. तशीच मराठी गझलची चळवळ करणाऱ्या कविवर्य सुरेश भटांनीही त्यांच्या विरोधात लेखनकामाठी केली. त्यांनी थेट ‘मामं’च्या देशमुख या आडनावावरच घाव घातला.

 देशमुखी वतनाचे मूळ

 १९९९मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने ‘शिवराज्य पक्षा’ची घोषणा झाली. या नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी प्रा.मा.म..देशमुखांची निवड झाली. या पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी मामं.नी पत्रकार परिषद घेतली. दूरदर्शनवर तिचे प्रसारण झाले. त्यामुळे मामं.ना पहिल्यांदा व्यापक प्रसारमाध्यम मिळाले. या घटनेमुळे त्यांच्या विरोधकांचा जळफळाट होणे स्वाभाविक होते.

 सुरेश भट नागपूरच्या दै.लोकमतमध्ये या दरम्यान ‘सारासार’ या शीर्षकाखाली एक सदर लिहित असत. त्यांनी या सदरातील एका लेखात शिवराज्य पक्षावर टीका केली. त्याचबरोबर या पक्षाचे अध्यक्ष म्हणून ‘मामं’वरही आगपाखड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी ‘देशमुखी वतन’ हे मुसलमानी अमदानीत निर्माण झाले असे विधान केले. आपल्या या विधानाचे खंडन करून ते खोटे आहे,हे कुणी सिद्ध केले तर मी कविता करणे सोडून देईन अशी घोषणाही त्यांनी या लेखात केली होती. या लेखावर मामं.नी प्रतिक्रिया काही दिली की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु,मामं.वरील आरोपांचे खंडन करण्याकरिता एक लेख लिहून सुरेश भटांकडे मी पाठविला. परंतु,त्यांनी तो प्रकाशित केला नाही. या लेखात ‘देशमुखी वतन’ हे मुसलमानी राजवटीत व मुसलमानांनी निर्माण केले नसून त्यापूर्वीही ते अस्तित्वात असल्याची माहिती मी दिली होती. हा लेख पुढे देत आहे. या लेखाचे शीर्षक होते-

        बोगस कोण ? मा.म.देशमुख की सुरेश भट !

        “ ही ‘शिवराज्य पार्टी’ की बहुजनांच्या नावावर निघालेले नवीन नाटक !” या शीर्षकाखाली दै.लोकमत दि.६-८-१९९९ च्या अंकातील ‘सारासार’ या सदरात सुरेश भटांनी लिहिलेला एक लेख प्रकाशित झाला आहे. संपूर्ण लेखामध्ये प्रा.मा.म.देशमुखांना त्यांनी महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ बोगस इतिहासाचार्य या शेलक्या विशेषणाने संबोधले आहे. या लेखाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचा परामर्श घेणे आवश्यक वाटले म्हणून या ठिकाणी लिहित आहे. सुरेश भटांच्याच सारासार(अविवेकी)लेखनशैलीचा अवलंब करून लिहायचे झाल्यास कविभ्रष्ट सुरेश भट(की भ्रष्ट) असा त्यांचा उल्लेख करता येईल किंवा ‘कवी’ या शब्दाचा वऱ्हाडी भाषेत होणारा ‘कळलाव्या’ हा अर्थ घेतल्यास ‘कविवर्य’ म्हणजे ‘कळीचा नारद’ असेच म्हणावे लागेल. पण आपल्या शिवराळपणालाच परखडपणा समजून सदैव याच्या ना त्याच्या चरणी लोटांगण घालणाऱ्या या तथाकथित कविश्रेष्ठां(?)साठी मायमराठीचा दुरूपयोग करण्याची माझी इच्छा नाही. यापूर्वी गंगाधर पानतावणे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होणार अशी माहिती कळल्याबरोबर व त्यानंतर यशवंत मनोहरांना अध्यक्षपद मिळाल्यावर सुरेश भटांनी जो त्रागा केला होता,तो साऱ्यांना माहित आहेच. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर हे पद मिळाले नाही म्हणून शरद पवार ब्राह्मणविरोधी आहेत असे भट म्हणत सुटले. पण त्यांच्या थिल्लरपणामुळे डॉ.मनोहरांच्या अल्पकालीन अध्यक्षपदाची माल डॉ.य.दि.फडके यांच्या गळ्यात पडली. तेव्हा मात्र य.दि.फडके यांच्या विरोधात भटांनी दंड थोपटले नाही. किंवा पवारांचा ब्राह्मणद्वेष त्यांना सिद्ध करता आला नाही. त्यानंतर शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आल्यावर भटांनी बाळ ठाकरे यांच्या पायाशी लोळण घेतले. तरीही त्यांना साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद मिळू शकले नाही. या साऱ्या लटपटी करण्याआधी बौद्ध धर्माच्या दीक्षेचे नाटकही त्यांनी करून पाहिले. आपल्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरविण्यासाठी आजवर सारे विदूषकी चाळे करणाऱ्या भटांनी मा.म.देशमुखांच्या इतिहास ज्ञानाची उठाठेव का करावी ते कळत नाही.

       शिवराज्य पार्टी स्थापन करताना मा.म.देशमुखांनी जे निवेदन पत्र परिषदेत केले,त्यावर भटांचा मुख्य आक्षेप दिसतो. आपल्या आयुष्याची उणीपुरी विसेक वर्षे ज्यांनी बुजन समाज पार्टीत काढली व बहुजनवादडच अनेकदा पुरस्कार केला,तेच विचार पत्रपरिषदेत मा.मं.नी मांडले. पण बसपात असताना त्यांच्यावर इतके तोंडसुख घेण्याची हिम्मत भटांना झाली नाही. ती आजच का झाली ? त्यांनी बसपा सोडून शिवराज्य पार्टी काढली म्हणून ? बसपाचे पाठबळ मा.मं.च्या सोबत नाही या विश्वासाने तर त्यांना हुरूप आला नसेल ? किंवा शिवरायांवर पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेचा मतदार हिरावून घेण्याचा प्रयत्न मा.मं.नी केला या भीतीने तर ते चेकाळले नसावेत ? की शिवसेनाकारांच्या ताटाखालचे मांजर होण्याची संधी ते शोधात असावेत ? असे कितीतरी प्रश्न निर्माण व्हावेत असे विसंगत लिखाण भटांनी केले आहे.
ज्या ज्योतिबा फुल्यांना ब्राह्मणांनी मदत केली त्यांचे ऋण मानून गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब,इशारा यासारखी पुस्तके लिहून ज्योतिबांनी ब्राह्मणी काव्याची नाना रूपे व्यक्त केली आहेत,त्यांच्याच विचारसरणीवर आधारित विधाने मा.म. देशमुखांनी केलेली आहेत. तेव्हा त्यांच्या नावाचा त्यांनी पापी उपयोग केला असे कसे म्हणता येईल ? बौद्ध धर्म स्वीकारलेल्या सुरेश भटांनी पाप पुण्याच्या कल्पनांना कवटाळून बसावे हेही अनाकलनीयच आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना वारंवार ‘साध्वी’ या उपपदाने संबोधणे म्हणजे ऋतंभरा,प्रीतिसुधा यांच्या रांगेत त्यांना बसविणे नव्हे काय ? मराठी भाषेतील शब्दांविषयी तसेच भाषाशास्त्राविषयी असलेले भटांचे अज्ञान हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. पण इथे इतिहासाविषयीच्या त्यांच्या अज्ञानाचाच प्रामुख्याने विचार करुया !
समतेचा व जातीय विषमतेविरुद्धच्या लढ्याचा भटांनी उल्लेख करू नये. कारण की,त्यांनी यासाठी काहीही केलेले नाही. ‘बहुजन’ या शब्दाच्या व्याख्येतही त्यांनी आपल्या मेंदूला व्यर्थ शिणवू नये असे मला वाटते. विशेषतः मा.म. देशमुखांनी बहुजन हा जो शब्द वापरला आहे,तो दलित,आदिवासी,इतर मागासवर्गीय तसेच धार्मिक अल्पसंख्याक या अर्थाने. भटांनी त्याचा कुणबी-मराठा हा अर्थ घेतला. यातूनच त्यांची पूर्वग्रहित दृष्टी दिसून येते. बहुजनांच्या दंढारात (भटांचा शब्द) यांचा समावेश नसतो असे भट म्हणतात. ज्योतिबा फुले शेती करणारांना (कुळवाडी) कुणबी म्हणतात. मराठा नावाची जात महाराष्ट्रात नाही,तेव्हा कुणबीच स्वतःला मराठा म्हणवून घेतात ही वस्तुस्थिती आहे. इतिहासाचार्य राजवाड्यासारख्या संशोधकांनी कुणबी-मराठ्यांचे महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान मान्य केलेले आहे. तेव्हा त्यांना अशा प्रकारे हिणवून चालणार नाही. जातीय श्रेष्ठत्वाचा अभिमान मराठा म्हणविणारांना आहे. तसेच तो ब्राह्मणांनाही आहे. ब्राह्मणी अहंकारामुळे इतरांवर सतत अन्याय होत असला तरी त्यात ब्राह्मणांना नेहमीच फायदा झालेला आहे. याउलट क्षत्रियत्वाच्या मगरमिठीत सापडलेल्या मराठ्यांनी स्वतःबरोबर आजवर इतरांचेही नुकसान केलेले आहे. या गोष्टीची जाणीव होऊन आजचा मराठा समाज पुरेसा जागरूक झाला आहे. फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणाऱ्या या समाजाकडे भटांनी आता संशयाने पाहू नये व बहुजन समाजात फूट पाडण्याचा ब्राह्मणी कावा चालवू नये अशी माझी त्यांना विनंती आहे.

 शेवटी,इतिहासाचा ’इ’ माहित नसलेल्या सुरेश भटांनी या क्षेत्रातही आपले नाक खुपसून आपले हसे करून घेतले आहे. म्हणून याविषयीही थोडक्यात माहिती पाहूया. त्यांनी आपल्या अंगाचा खकाना करून घेऊ नये. कारण की ही एक शास्त्रीय चर्चा आहे. या लेखाच्या शेवटी भट म्हणतात-“ ...पण मी बोगस इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख यांना येथेच माझ्या ऐतिहासिक ज्ञानात मोलाची भर पडावी म्हणून एक विनम्र प्रश्न विचारतो,असा कोणता देशमुख आहे की,ज्याची सनद शिवाजी महाराज किंवा नागपूरकर भोसल्यांकडून मिळालेली आहे ? सर्वच सनदा हैद्राबादच्या निजामाकडून किंवा दिल्लीच्या मोगल बादशहाकडून मिळालेल्या आहेत. माझे हे विधान खोटे असेल तर मी (तसे सिद्ध झाल्यास)मराठी भाषेत कविता करणार नाही! इस पार या उस पार !”

 या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर टाकण्याकरिता नव्हे तर एक आव्हान म्हणून भटांनी ‘देशमुखी’ वतनाविषयीचा प्रश्न विचारला आहे. आणि त्यांचे विधान खोटे ठरल्यास आपण मराठी भाषेत कविता करणार नाही अशी प्रतिज्ञाही केली आहे. आपल्या इतिहासाच्या अज्ञानापोटी मराठी कविता पणाला लावण्याचा अविचार त्यांनी करू नये. कारण की,त्यांच्या कवितेचे अनेक चाहते आहेत तसा मी ही आहे. अर्थात यांत्रिक रचनेमुळे भटांची कविता आता तशीही कालबाह्य झाली आहे. म्हणून त्यांनी आता थांबणेच योग्य आहे. असो,सुरेश भटांच्या माहितीनुसार देशमुखीच्या सनदा हैद्राबादच्या निजामाकडून किंवा दिल्लीच्या मोगल बादशहांकडून मिळालेल्या आहेत,असे मोघम विधान करून आपले इतिहास(अ)ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्या माहितीनुसार फक्त हैद्राबादच्या निजामाचे १७२४ पासून अधिपत्य होते. अर्थात या साऱ्या सनदा त्यानंतरच्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. पंधराव्या शतकाच्या शेवटी अहमदनगर येथे अस्तित्वात आलेली निजामशाही भटांच्या गावीही नाही. त्याचप्रमाणे ज्या निजामशाहीचा उगम १३४७ मध्ये स्थापन होऊन १४९० ते १५२१च्या दरम्यान पाच शकले झालेल्या बहामनी राजवटीत ही देशमुखी वतन होते,याचा तर त्यांना गंधही नाही. याउलट १७२६ साली उदयास आलेल्या मोगल बादशहांनी दिलेल्या सनदा म्हणजे मुसलमानी अमदानीचे अपत्य होय व सारे देशमुख हे मुसलमानांचे चाकर असल्यामुळे त्यांचा शिवशाहीशी काहीही संबंध नाही. म्हणून मा.म.देशमुखांनी ’शिवराज्य’ हे आपल्या पक्षाला नाव ठेवण्याचा त्यांना कोणताही  नैतिक अधिकार नाही,असेच जणू ते सुचवीत आहेत. कारण की,शिवाजी महाराजांनी देशमुखीच्या सनदा दिलेल्या नाहीत. 

 या ठिकाणी सुरेश भट पुन्हा तोंडावर आपटले आहेत. त्यांच्या या विधानावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशपरंपरागत वतनाविषयीचे काय धोरण होते,याविषयी भटांना काहीच माहित नाही हे स्पष्ट होते. साऱ्या इतिहास अभ्यासकांना ठाऊक असलेली ही गोष्ट भटांना माहित नसणे स्वाभाविकच आहे. विशेषतः केवळ एक राजकीय धोरण म्हणून शिवरायांनी वंशपरंपरागत वतनांना विरोध केला होता असे सारे ब्राह्मणी इतिहासकार आजवर म्हणत आले आहेत. त्यांच्या भूमिकेला विरोध करणारा ‘शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक प्रयत्न ’ या शीर्षकाखाली डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला लेख ‘ मराठेशाहीचा मागोवा’ या ग्रंथात आलेला आहे. त्यात स्वराज्यातील सर्व वतनदारांची इनामे व हक्क लाजिमे अमानत म्हणजे सरकार जमा केले आणि त्यांच्या मोबदल्यात प्रत्येक वतनदाराच्या वतनाच्या इनामाचा व हक्क लाजिम्यांचा विचार करून ठराविक रक्कम ( शिवरायांनी) बांधून दिली. हे शिवरायांचे कार्य समाजक्रांतीला प्रेरणा देणारे आहे असे डॉ. पवार म्हणतात. पण ‘पवार’ या आडनावाची ॲलर्जी असल्यामुळे भटांकडून वरील लेख वाचवणार नाही. म्हणून त्यांनी डॉ.अ.रा.कुळकर्णी यांचा ‘संस्कृती संगम’ या ग्रंथातील ‘देशमुखी वतन’ हा लेख आपल्या नजरेखालून घालावा अशी मी त्यांना शिफारस करतो.

 डॉ. अ.रा.कुळकर्णी यांनी देशमुखी वतन हे भारतात मुसलमानी अंमल सुरू होण्याआधीपासून चालू होते हे पुरेशा पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. मराठ्यांचा पहिला इतिहासकार ग्रांट डफ याचा असा समज होता की बहामनीपूर्व काळातील नाईक मंडळींनी मुसलमान बंडखोरांना मदत केली व तेच पुढे देशमुख बनले. पण त्यांचा हा समज खानदेशचा पोलिटिकल एजंट व फारशीचा तज्ज्ञ कॅप्टन जॉन ब्रिग्जने खोटा ठरविला आहे. त्याच्या मते देशमुख-देशपांडे या संस्था हिंदूंच्या आहेत. ‘मुसलमानांनी या संस्था निर्माण केल्या असे घटकाभर मानले,तर ज्या प्रदेशात मुसलमानांनी अद्याप पाऊल टाकले नव्हते, त्या म्हैसूर प्रांतात अशाच प्रकारचे अधिकारी अस्तित्वात कसे होते ? यावर विस्ताराने लिहून डॉ.कुळकर्णी यांनी इ.स.७५४-९७५ या काळात होऊन गेलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात ग्रामकूट या नावाचा एक ग्रामप्रमुख अधिकारी असे. देशग्राम कूट याचा अधिकार एखाद्या विभागावर-ग्रामांच्या समूहावर चालत असे.,” असे नमूद केलेले आहे. देशग्राम कूट या शब्दांचेच रुपांतर देशमुख असे झाल्यामुळे देशमुख ही संस्था इ.स.च्या आठव्या शतकापासून अस्तित्वात होती हे ही सिद्ध होते. शिवरायांनी ही संस्था खारीज केल्यामुळे त्यांनी वंशपरंपरागत सनदा देणे शक्यच नाही. पण मराठा अंमल सुरू झाल्यावर शिवपुत्र राजारामाने साऱ्या वतनांचे पुनरुज्जीवन केले. पेशवाईने तर त्यांना अधिक बळकट करून सर्व सामान्यांचे शोषण केले. हे सारे माहित नसणाऱ्या सुरेश भटांनी केवळ देशमुख वतनाविषयीच कुरापत काढली. देशपांडे वतनाविषयी त्यांची दातखिळी बसली आहे. मा.म.देशमुखांनी शिवशाहीवर बहुजात दृष्टिकोनातून पुराव्यांसह प्रकाश टाकला आहे. आता तुम्हीच सांगा,भट महोदय बोगस कोण ?

 वरील लेख याठिकाणी देण्यामागील कारण म्हणजे मा.म.देशमुखांनी ज्या ‘शिवराज्य पक्ष’ ची घोषणा केली होती,त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न कविवर्य सुरेश भटांनी केला होता,तो चुकीचा होता हे आजच्या वाचकांना कळावे. त्याचप्रमाणे ‘देशमुखी वतन’ हे मोगलांच्याही पूर्वी अस्तित्वात होते,या ऐतिहासिक वास्तवाचाही  परिचय व्हावा.

  कविवर्य सुरेश भटांचा माझ्याशी व्यक्तिगत स्नेह होता व त्यांच्या कवितांचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासूनच होता. सातव्या वर्गाच्या ‘आमची मायबोली’ या पाठ्यपुस्तकात त्यांची ’गीत तुझे मी आई गाईन’ ही कविता मला होती. त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणा व्यक्त करणारा त्यांच्या आईच्या मुलाखतीवरील लेख मी लिहिला होता. विशेष म्हणजे ते व मी अमरावतीकर असल्यामुळे त्यांच्याशी माझी घट्ट मैत्री होती.  त्यांच्या गझलांच्या अनेक खाजगी व जाहीर कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभावाखाली मीही गझला लिहिल्या. तरीही त्यांच्या विरोधात मला लिहावे लागले. त्याचप्रमाणे ते हयात नसताना हा लेख प्रकाशित करावा लागला. ही घटना माझ्यासाठी दुःखदायक आहे. २००३मध्ये यशोधरा प्रकाशन द्वारा प्रकाशित झालेल्या ‘साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही’ या माझ्या पुस्तकामधून याठिकाणी तो घेतला आहे. 

     बहुजन चळवळीतील ‘मामं’चे योगदान अतुलनीय असेच आहे. त्यांच्याविषयीच्या आदरभावामुळे मला हा लेख लिहावा लागला. त्यानंतर मी सा. चित्रलेखाच्या दिवाळी अंकासाठी ‘मामं’ची मुलाखत घेतली होती. ‘मामं’च्या एका पुस्तकात ती समाविष्ट असल्यामुळे ती वाचकांसाठी उपलब्ध आहे. त्यामधूनही मी ‘मामं’विषयी आदरभाव व्यक्त केला आहे. त्यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून इथेच माझ्या लेखणीला विराम देतो.
--------------------------------------------------------
ashokrana.2811@gmail.com                                      

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

दै."निळे प्रतीक" वर्धापनदिनाच्या निमित्ताने....एक दृष्टिक्षेप
वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप, त्यांचे प्रश्न, संपादकांची भूमिका आणि वाचकांची बदलती अभिरुची.   

          निळे प्रतीक' या साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात व्हावे, ही अनेक दिग्गज मान्यवरांची, लेखकांची व वाचकांची इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. दैनिकांत रुपांतर व्हावे, ही सर्वांची इच्छा असणे हे शतप्रतिशत मान्य आहे; परंतु दैनिक चालवणे तितके सोपे राहिलेले नाही ; म्हणून साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात करून ते चालवायचे. हा संकल्प सहज सोपा नक्कीच नाही; परंतु आमचे जिवलग मित्र 'निळे प्रतीक'चे संपादक मा.रतनकुमारजी साळवे यांनी संभाजीनगरसह महाराष्ट्रातील मान्यवर मित्र, साहित्यिक मित्र, उद्योजक मित्र, संस्थाचालक, वाचकप्रेमी, यांच्या इच्छेखातर साप्ताहिक 'निळे प्रतीक'चे रुपांतर दैनिकात करावयाचा संकल्प केला आणि तो पूर्णही करत आहेत ; परंतु ह्या संकल्प पूर्तीसाठी भविष्यात किती अडचणींना तोंड द्यावे लागणार.. हे संपादकांनी गृहीत धरलेले असेलच.  दैनिकात रुपांतर केल्यानंतर दैनिकांसाठी येणाऱ्या अडचणींना संपादकांनाच तोंड देत रहावे लागणार...हे सर्व ज्ञात असूनही संपादकस्नेही मा.रतनकुमारजी साळवे यांनी आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राचे रुपांतर दैनिकात केले, ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. तेवढीच ती धाडसाची आहे. आजमितीला वृत्तपत्र चालवण्यासाठी धाडस करणे, ही बाब अंगावर काटा आणणारीच आहे... कारण आज आपण आभासी जगात वावरतोय..! आभासी जग म्हणजे थोडंफार खरं आणि बाकी सारं फसवं जग. या फसव्या जगात वावरूनही एकमेकांवर विश्वास ठेवायचा आहे, ही जरा तारेवरचीच कसरत आहे. ह्या तारेवरच्या कसरतीचा स्वीकार करून आपला खेळ सुरु ठेवावा लागणार आहे, हे संपादकांना माहित आहेच.
        निळे प्रतीक'चे रुपांतर दैनिकात करण्यासाठी रतनकुमारजी साळवे यांनी आपल्या सर्व वाचक, मित्र मैत्रिणींना, उद्योजकांना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना दैनिक सुरु करण्यापूर्वी लिखित स्वरूपात आवाहनच केले होते...ते म्हणतात, "साप्ताहिक निळे प्रतीक" या वृत्तपत्रास आपण मागील १५ वर्षापासून तन,मन,धनाने साथ दिली आहे. आम्ही आपल्या कायम ऋणातच राहू इच्छितो. केवळ आपल्याच भरोशावर "निळे प्रतिक"ने महाराष्ट्रभर चळवळीचे वृत्तपत्र म्हणून नावलौकिक संपादन केले आहे. अशा पार्श्वभूमीवर आम्ही आपले एका महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू  इच्छित आहोत. १५ वर्ष यशस्वीरित्या अखंडित सुरू असलेल्या साप्ताहिक "निळे प्रतीक" चे रूपांतर आपण दैनिकांत करणार आहोत. हा संकल्प आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही सोडला आहे. सध्या आपला देश खडतर परिस्थितीतून वाटचाल करत आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याची चर्चा सर्वसामान्यात जोर धरत आहे. संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी म्हणून तुमची आमची जबाबदारी फार मोठी आहे. ही लढाई यशस्वीरित्या लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीने दैनिक सुरू करण्याचे धाडस केले आहे. आपण आमच्या या संकल्पपूर्तीसाठी पूर्वीप्रमाणेच साथ देऊन सहकार्य कराल ही नम्रपणे विनंती करतो..!" अशा प्रकारचा संदेश व विनंतीवजा आवाहन संपादकमित्र रतनकुमार साळवे यांनी समाजबांधवांना व संपूर्ण समाजाला केले होते... काही समाजबांधव सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशीसुध्दाआहेत. अनेकांचे सहकार्य मिळत आहे; परंतु हे सहकार्य आजीव सभासदाच्या रुपाने अखंड मिळावे अशी अपेक्षा आहे.
               निळे प्रतीक 'चे रुपांतर दैनिकात झाले खरे;परंतु हे दैनिक चालविण्याची जबाबादारी फार मोठी आहे. म्हणून समाजात ज्यांचा सधन व्यक्ती म्हणून नावलौकिक आहे अशा समाजबांधवांनी निळे प्रतीक च्या दैनिकाला जाहिरातीच्या व धम्मदानाच्या रुपाने अखंड मदत करावयाची आहे. बऱ्याच समाजबांधवांनी "निळे प्रतीक " साप्ताहिक असताना सर्वतोपरी मदत केलेली आहेच. रतनकुमार साळवे यांनी सुध्दा या वृतपत्राच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाची दखल घेतलेली आहेच. त्यांना निळे प्रतीक' च्या विचारपीठावर मानसन्मान दिलेला आहे.   
         निळे प्रतीक'हे वृत्तपत्र नव्हे, तर ही एक परिवर्तनाची चळवळ आहे. आणि एखाद्या चळवळीला हक्काचे वृत्तपत्र असले पाहिजे म्हणून निळे प्रतीक हे दैनिक म्हणून नव्हे तर सैनिक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.    शिवाय 'निळे प्रतीक'ही एक बहुदेशीय संस्था आहे. 'निळे प्रतीक' ही संस्था आणि 'निळे प्रतीक ' वृतपत्र हे दोन्ही वेगवेगळे नसून एकजीव आहेत. 'निळे प्रतीक'च्या माध्यमातून अनेक वर्षापासून मित्रवर्य रतनकुमारजी साळवे हे समाजातील कर्तबगार व कार्यकुशल लोकांचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या नावाने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत आहेत. अनेक  गुणवंत, विचारवंत, कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, समाजसेवक, कलाकार, कर्तव्यदक्ष अधिकारी, अशा समाजबांधवाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना निळे प्रतीक'ने विविध पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे. याच माध्यमातून वृद्धिंगत झालेला 'निळे प्रतीक'चा नावलौकिक आपणास दिसून येतो आहे.
           निळे प्रतीक' हे शीर्षकच आंबेडकरवादी विचारधारेचा प्रचार - प्रसार करण्याचा विचार आपल्यासमोर ठेवते. आंबेडकरवादी विचाराधारा ही मानवतावादाचा पुरस्कार करणारी आहे. संविधानात आलेला मानवतावादाचा विचार हा समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार होय. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्राने पुढाकार घेतला पाहिजे. गुंडशाही, झुंडशाही आणि हुकुमशाहीला खतपाणी घालणाऱ्या वृत्तींना आणि विचारांना नेस्तनाबूत करण्याचे काम वृत्तपत्र करू शकते. हे केवळ दैनिक 'निळे प्रतीक'चेच काम नसून सर्वच वृत्तपत्राचे काम आहे, नव्हे, ती वृतपत्राची खरी जबाबदारी आहे. 

*वृतपत्राचे बदलते स्वरूप व त्यांचे प्रश्न* 

         वृत्तपत्रांचे अच्छे दिन केव्हाच संपले आहेत. वृत्तपत्रांची जागा विविध चॅनेलने घेतलेली आहे. प्रिंट मिडियाची जागा इलेक्ट्रॉनिक मिडियाने घेतली आहे. वृतपत्राचे स्वरूप बदलले आहे. आता वृत्तपत्र सोशल मिडीयावर ऑनलाईन पद्धतीने 'पीडीएफ'च्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागले आहे. वृतपत्र विकत घेऊन वाचणारा वाचक कमी झाला आहे. वृतपत्रातून दिल्या जाणाऱ्या सामाजिक, राजकीय स्वरुपाच्या जाहिरातीला आळा बसला आहे. कारण समाज माध्यमाद्वारे अनेक प्रकारच्या जाहिराती करणे सोपे झाले आहे ; म्हणून वृतपत्रासाठी मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या... वृतपत्र जाहिरातीच्या पैशावर चालत होते. ती वृतपत्रांना मिळणारी मिळकत बंद झाली आहे. परिणामी वृतपत्र चालवण्यासाठी  मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. म्हणजे वृतपत्र चालवायचे कसे असे अनेक प्रश्न वृतपत्र मालकांसमोर उभे आहेत.

वृत्तपत्र संपादकाची भूमिका

        या अगोदर वृत्तपत्राचा मालक आणि संपादक वेगवेगळे असायचे. त्यांची भूमिकाही पारदर्शी असायची. निःस्पृह, निर्भिड, निष्पक्षपातीपणा त्या वृतपत्रातील बातम्यामधून दिसून येत होता. थोडक्यात म्हणजे सर्वत्र पारदर्शीपण होता. म्हणूनच 'वृतपत्र हा समाजाचा आरसा आहे' असे म्हटले जात होते. परंतु अलिकडच्या काळात वृत्तपत्राचा मालकच संपादक म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. त्याच्याजवळ पत्रकारितेची पदवी किंवा त्याला सामाजिक भान नसले तरी चालते. म्हणून मालकाच्या बुद्धीला वाट्टेल त्या बातम्या, वाट्टेल त्या जाहिराती आणि मनमानीपणा वाढीस लागला आहे. मूळात पत्रकारितेची पदवी असलेला अनुभवी पत्रकार वर्ग, संपादक वर्ग आता वृतपत्रात दिसून येत नाही. म्हणून बातमीमध्ये असलेली सत्यता, किंवा पारदर्शकता किंवा बातम्यासाठी असलेला निकषही उरलेला नाही. स्वतः मालकच संपादकाची भूमिका निभावतोय म्हणून त्याचेकडून चांगल्या संपादकाची अपेक्षा करता येईलच असे नाही.. वृत्तपत्राचा मालकच वृत्तपत्राची सर्व जबाबदारी पार पाडत आहे. 
        याअगोदर काही वृतमानपत्रे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या मालकीची असत. म्हणून ते त्यांच्याच बातम्या टाकत असत. ५० % त्यांच्याच पक्षाचा कैवार घेत असायचे. बाकी ५० टक्के सामाजिक बांधिलकी जपत होते. मात्र अलिकडे तशी परिस्थिती नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आपली स्वतंत्र वृतपत्रे आहेत. एवढेच काय त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र चॅनेल सुध्दा आहे. म्हणून इतर वृत्तपत्रांना जाहिराती मिळण्याचा प्रश्नच नाही... म्हणून जाहिरातीच्या जीवावर छापले जाणारे वृतपत्र बंद पडली आहेत. कारण छपाईचा खर्च निघत नाही म्हणून पीडीएफ केलेले वृत्तपत्र समाज माध्यमावर फिरत असते. पीडीएफमुळे छपाईचा खर्च टाळता आलेला आहे. म्हणून बरीच वृत्तपत्रे संपादकाच्या स्वतःच्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी व प्रसिद्धीसाठी ऑनलाईन वृतपत्रे चालू आहेत.त्या वृतपत्रांकडून कोणत्याच प्रकारची अपेक्षा करता येत नाही.

वाचकांची अभिरूची

      वृत्तपत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेता वाचकांची अभिरुची बदलणेही नवलाचे नाही. प्रवाहाबरोबर सगळीच माध्यमे बदलत आहेत. त्यात वाचकांची अभिरुची बदलली म्हणून नवल वाटायलाच नको.
इलेक्ट्रॉनिक मिडीयाने प्रिंट मिडियावर घाव घातला आहे. दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके ही प्रसारमाध्यमे आज संकटात आहेत. त्यांच्यासमोर आर्थिक संकट हे एकच कारण नसून वाचकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लेखकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनतेला नेमके काय वाचावयास द्यावे हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण वाचकांची अभिरुची बदललेली आहे. वाचकांना नेमके काय लागते याचाही सुगावा घेणे अवघड झाले आहे. नियतकालिके चालविण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत वृत्तपत्र चालवणे कठीण होऊन बसले आहे. तरीही वृत्तपत्र चालवण्याचे धाडस करणे आणि त्यातही फुले, शाहू,आंबेडकरी  चळवळीची परिवर्तनवादी विचारधारा घेऊन वृत्तपत्र चालवायचे ही  तर अत्यंत धाडसाची बाब आहे.
          समाजबांधवांच्या सहकार्यावर वृतपत्र चालवताही येईल; परंतु समाजबांधव पाठीराखे होऊन उभे राहिले पाहिजे. तेही अखंड उभे राहिले पाहिजे... तरच परिवर्तनवादी विचारधारेचे वृतपत्र अखंड चालवणे शक्य आहे. 'निळे प्रतीक ' चे संपादक रतनकुमार साळवे यांना सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन "निळे प्रतीक " चा हा किल्ला सहज सर करता येईल या अपेक्षेसह निळे प्रतीक चे संपादक रतनकुमार साळवे व त्यांच्या सोबत असणाऱ्या 'निळे प्रतीक'च्या परिवाराला वर्धापन दिनानिमित्त मनस्वी खूप शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
भ्रमणभाष्य - ९८९०८२७४१४

गुरुवार, १३ मार्च, २०२५

मंठा येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंठा येथे धरणे आंदोलन
   बिहार सरकार जागे व्हा ! अन्यथा आंदोलन तीव्र करू । 
         मंठा येथील आंदोलनकर्त्यांचा इशारा
मंठा /प्रतिनिधी 
       महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंठा शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य बौद्ध बांधवांनी धरणे व आंदोलन केले (दि.१२) रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात मंठा तालुक्यातील संपूर्ण बौद्ध बांधव आपले पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी झाले होते.
         या आंदोलनाची रॅली १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून घोषणा देत मुख्य रस्त्याने निघाली होती.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ. शिवरायांच्या स्मारकाला वंदन करून विसर्जित झालेल्या रॅलीचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले. 
         भारतीय बौद्ध महासभा शाखा मंठा व वंचित आघाडी मंठा तालुका च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूज्य भदंत डी.शीलरत्न थेरो यांच्या उपस्थितीत धरणे व निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पूज्य भदंत डि.शिलरत्न थेरो म्हणाले की, मंदिर,मस्जिद, गुरुद्वार, चर्च इत्यादी धार्मिक स्थळे ही जशी ज्या त्या धर्माच्या ताब्यात असतात ; परंतु बौद्धगया हे एकमेव महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही...१९४९ चा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून महाबोधी महाविहार लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.
         युनोस्को' कायद्यानुसार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ही जागतिक धरोहर असूनही ही बौद्ध विरासत सध्या ब्राह्मणाच्या ताब्यात असल्याने संविधान कलम १३,१४,१५,२५ .व २६ च्या कलमांचे पूर्णतः उल्लंघन आहे.
          याठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने सम्राट अशोकांनी निर्माण केलेले हे महाविहार जगातील सर्वच बुद्ध अनुयायींच्या अस्मितेचा विषय आहे म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महाबोधि विहार मुक्त करून घेण्याची योग्य वेळ आलेली आहे असे भदंत डि.शिलरत्न म्हणाले. 
          यावेळी डॉ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, सम्राट अशोक यांनी चोऱ्यांशी हजार बांधलेले स्तूप गेले कुठे ? तर त्या सर्व ८४ हजार स्तूपांचे रुपांतर मंदिरात करण्यात आले असल्याचे उघड दिसते. या बौद्ध धम्मीय विरासतीला आता या विद्यमान सरकारने आमच्या ताब्यात द्यावे. डॉ.किशोर त्रिभुवन म्हणाले की, आमची ही मालमत्ता परत मिळविण्यासाठी आम्ही हा लढा एकजुटीने लढण्याची योग्य वेळ आलेली आहे. रंगनाथ बापू वटाणे, भारत उघडे, सुभाष जाधव,अंबादास खरात, लक्ष्मणराव वाघमारे यांनीही  आंदोलनप्रसंगी आपला आक्रोश मनोगतातून व्यक्त केला.
       अध्यक्षीय समारोपात प्रा.सोनाजी कामिटे म्हणाले की,बुध्दगया महाबोधी विहार हे केवळ भारत देशाचेच नव्हे, तर जगभरातील बौद्धांचे श्रध्दास्थान असून महाविहाराचे व्यवस्थापन हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे, ते गैरबौद्धांपासून मुक्त करण्यात यावे, यासाठी हे आंदोलन आता थांबणार नाही. तर तीव्र करण्यात येईल याची बिहार सरकारने नोंद घ्यावी.
        भारताच्या महामहीम राष्ट्रपतीं यांच्या नांवे देण्यात आलेले निवेदन मंठा तहसिलचे नायब तहसिलदार काळदाते यांनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारले. या निवेदनावर अरुण वाघमारे,दत्तराव चोरमारे,गौतम सदावर्ते,गौतम अंभोरे,रमेश खरात,शरद मोरे,नंदकिशोर प्रधान,अशोक अवचार,दीपक शेळके,विठ्ठल ठाकरगे,गंगाराम गवळी,सिद्धार्थ खरात,सहदेव अंभोरे,मिलिंद अंभोरे,सुमेध आवारे,करण वटाणे,अजय गोंडगे,शुभम अंभोरे,अशोक रणवीर,विकास प्रधान,नितीन खाडे,विश्वंबर वटाणे,भगवान वाघ,किरण गवळी,शुभम वाघमारे,मंगेश गवळी,स्वप्नील  गोंडगे,धम्मानंद वाघमारे, दीपक बनसोडे,यश जाधव,सचिन खंदारे,भीमराव मुंढे,नरेंद्र वाघमारे,दादाराव वाघमारे,व्ही.बी मोरे,महेंद्र मोरे,ज्योती खाडे,जया आखाडे,वर्षा आखाडे, छाया खरात,सुषमा मगर,चंद्रकला कांबळे,विमल गायकवाड, सुशीला बनसोडे,मगर संगीता, गायकवाड,कांता कांबळे,सुनीता कोल्हे,सरस्वती कांबळे,प्रयागबाई कांबळे, बायजाबाई चोरमारे,कविता मोरे,मनोरमा पंडित,रचना मोरे,उज्वला मोरे, रेखा प्रधान,रमा वाघमारे,अनिता वाघमारे,आदिती खरात,आदिती खंदारे,अक्षरा वाघमारे,पूर्वी खंदारे,अमित खरात उद्धव सरोदे, गोलू पांजगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
        शांततेत पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र टेकुळे यांनी केले, तर अतुल खरात यांनी आंदोलनात सहभागी बांधवांचे आभार मानले. धरणे, आंदोलनाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात...
- डॉ.धोंडोपंत मानवतकर


        
मंठा /प्रतिनिधी
        "आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्याकडून चांगली प्रेरणा, चांगला आदर्श आणि चांगले संस्कार मिळतात आणि तेच संस्कार माणसाचं आयुष्य सुंदर करतात" असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
        मंठा येथील संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था व बाल -सुधारगृहाच्या वतीने डॉ.मानवतकर यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी धोंडोपंत मानवतकर यांना शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी नाट्यकर्मी सतीश खरात व जय मराठवाडा टिव्हीचे पत्रकार महादेव पाखरे यांनी डॉ.मानवतकरांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
                  आपल्या भाषणात बोलतांना डॉ.मानवतकर यांनी वृक्ष हेच माणसाचे खरे सगेसोयरे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,शिल्पकार जसा दगडाची मूर्ती कोरतांना दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकतो तद्वतच प्रत्येक माणसाने आपल्यातील दुर्गुण कायमचे काढून टाकले पाहिजे तरच तुमचे आयुष्य सुंदर व सुसंस्कारी होईल...यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
          वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे नाट्य व सिनेकलावंत सतीश खरात लिंबेवडगावकर यांनी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांना भेट म्हणून दिलेल्या वटवृक्षाचे वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरात रोपण करण्यात आले. 
        याप्रसंगी वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात वृक्षदिंडी काढण्यात येऊन डॉ.मानवतकर यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण केले. यावेळी ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी व वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर संत तुकारामांचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे" हा अभंग आळवून कार्यकमात रंग भरला.
         संस्थेचे सचिव शुभम कृष्णाजी शेंडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचलन केले, शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानव

 

 छ.संभाजीनगर/प्रतिनिधी

     "सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून,विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, 'हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही चिकित्सकपणे समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
       साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त  २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १ वाजता, छ.संभाजीनगर येथील नागसेनवन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'लॉ 'कॉलेजच्या महात्मा फुले सभागृहात "मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद,महाराष्ट्र "च्या वतीने 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते.  उद्घाटकीय भाषणात डॉ.धोंडोपंत मानवतकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या आयुष्यात कोणतीच परिस्थिती पुरक नसताना त्यांनी अहोरात्र संघर्ष करत सामाजिक परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, यातून वेळ काढून वास्तव परिस्थितीवर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटके, लोकनाट्ये, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णन अशी सत्तर जवळपास पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या साहित्यात सर्व जातीधर्माच्या उपेक्षित,बहिष्कृत लोकांना नायक,नायिका बनवले आहे. समाज व्यवस्थेच्या प्रवाहाबाहेर असणारा दुर्लक्षित,उपेक्षित माणूस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी उभा करून मानवतावाद जपला आहे. परंतु आज आमच्या सुशिक्षित लोकांचे सगळे प्रश्न सुटल्यामुळे ते समाजकार्यात किंवा साहित्यिक कार्यात सहभागी होत नाहीत,ही खंत आहे. "आम्हीही समाजाचे काही देणे लागतो" हा विचार सर्वांनी अंगिकारून समाज कार्यात सहभागी झाले पाहिजे,असा विचार डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी मांडला.
         कार्यक्रमारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट अणाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रा.डॉ.कोंडबा हटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून साहित्यरत्न अणाभाऊ साठे यांच्या  जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेचे संस्थापक,अध्यक्ष चंद्रप्रकाश जी.शिंदे यांनी साहित्य चळवळीची भूमिका विषद करताना सांगितले की, साहित्य परिषदेच्या अनेक संमेलनाद्वारे साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचा समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न राहणार आहे...जेणेकरून  परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्या विद्वतेचा उपयोग समाजाला होईल.
          उदघाटन सत्राचे अध्यक्ष आंबेडकरवादी लेखक भीमराव सरवदे यांनी अध्यक्षीय समारोपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अणा भाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकांचा उहापोह करून कविता लेखनाच्या भूमिकेबाबत उपस्थित कविंना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुभाष गवळी यांनी केले.
            दुसऱ्या सत्रात ४ वाजता कवी राजू वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनात' महाराष्ट्रातील नामवंत कवींनी सहभाग नोंदवला होता. 
      कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल स.जाधव यांनी केले तर   धन्यकुमार टिळक यांनी कवींचे आभार मानले.
       या कार्यक्रमास साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांना नाट्यशिबिराची गरज

ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांना नाट्यशिबिराची गरज-
नाट्यदिग्दर्शक ॲड.सुशील बनकर

 मंठा /प्रतिनिधी       
         ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आहेत परंतु त्यांची ओळख पटविण्यासाठी कलावंताची शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे, यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो, स्वतःमध्ये लपलेला कलावंत ओळखून त्याआधारे आपले करिअर करता येते त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. असा मार्गदर्शक सल्ला छ.संभाजीनगरचे नाट्यदिग्दर्शक ॲड. सुशील बनकर यांनी या शिबिरार्थींना दिला.
         मंठा येथे तालुक्यातील नवोदित हौसी नाटय कलावंतांसाठी तीन दिवशीय नाट्य अभिनय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. 
या शिबिरात नाट्यअभिनेते सतीश खरात लिंबेवडगावकर यांनी तरुण हौसी कलावंतांना भाषण,संवाद,सूत्रसंचालन,शारीरिक अभिनय, वाचिक अभिनय, मूक अभिनय असे नाट्यअभिनयाचे वेगवेगळे प्रकार शिकवून प्रायोगिक रंगभूमी, व्यवसायिक रंगभूमी, लघु चित्रपटाची निर्मिती कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
      शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून छ. संभाजीनगर येथील नाट्य अभिनेते,नाट्यदिगदर्शक ॲड.सुशील बनकर यांची विशेष उपस्थिती होती. शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना ॲड. सुशील बनकर यांनी लघुचित्रपटासाठी कॅमेऱ्याचे अँगल कसे लावले जातात, शुटींग कशी केली जाते,याबाबत मोबाईल द्वारे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी आवर्जून उपस्थित असलेले मंठा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, मार्गदर्शक नाट्य कलावंत सतीश खरात,पत्रकार मानसिंग प्रल्हादराव बोराडे,पांडुरंग वगदे सर, डिझायनर आर्टिस्ट निखिल रामपूरकर, पत्रकार महादेव पाखरे,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,
       शेवटी गणेश सरोदे या नवोदित कलावंताने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

भारतातील उपेक्षित, वंचित, दुर्बल समाजापुढे शिक्षणाच्या खाजगीकरणाचे आव्हान.. !

भारतातील उपेक्षित,वंचित दुर्बल समाजापुढे 
शिक्षणाच्या खाजगीकरणाचे आव्हान














डॉ.धोंडोपंत मानवतकर




          गेल्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा आदेश काढला आहे. या आदेशाला विरोध दर्शवून  मराठवाडा शिक्षक संघाच्या जालना जिल्हा शाखेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना एक निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, "शिक्षण महागडे करणारा व दुर्बलांना शिक्षण नाकारणारा हा शासन आदेश शिक्षणाचे कंपनीकरण करणारा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याचा फेरविचार करून असा जाचक व घातक शासन आदेश रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू!" अशा आशयाचे निवेदन दिले आहे. 
         ६ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शासकीय, निमशासकीय सेवेतील अभियंत्यापासून सेवक पदापर्यंतची १३८ पदे कंत्राटदारांकडून भरण्यात येणार आहेत. या शासनादेशात शिक्षकांचा समावेश " कुशल मनुष्यबळ" वर्गवारीत करुन महाराष्ट्र राज्यातील डी.एड्. , बी.एड्., त्यासोबतच टीईटी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, पदवी, आदी पात्रताधारक शिक्षकांची पदे कंत्राटी संस्थेच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्यामुळे साहजिक त्यांच्या मानधनालाही कात्री लागणार आहे. मी पगार हा शब्द यासाठी वापरलेला नाही की, पगार हा वाढत जाणारा असतो ; मात्र मानधन कंत्राटदाराच्या हातात असेल व  त्या मानधनात ते कपातही करू शकतात म्हणून मानधन. 
         शिक्षकांची भरती करण्याचे अधिकार कंत्राटदारांना जर  देण्यात येत असतील तर... शाळाच कंत्राटदारांना चालवायला  दिलेल्या आहेत असा त्याचा अर्थ. म्हणजे नकळत आरक्षणाचा प्रश्न संपवून टाकलेला आहे. म्हणून या प्रक्रियेला शिक्षणाचे खाजगीकरण म्हणायला हरकत नाही. यासाठी प्रा.शितल भगवानसिंग अहिरे यांनी आपल्या शोधपत्रिकेत (पृष्ठ क्र.१६१) नोंदवलेल्या खाजगीकरणाच्या व्याख्येचा आधार घेता येईल. त्या लिहितात, "सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मालकीत किंवा व्यवस्थापनात खाजगी व्यक्तींना किंवा उद्योजकांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे खाजगीकरण होय.!" याच लेखात त्या पुढे शिक्षणाच्या खाजगीकरणाची आधुनिक व्याख्या करतात," शिक्षणाचे मोठे मोठे मॉल उभे करून त्यात आकर्षक वस्तुंची मांडणी करावी आणि त्यातील प्रत्येक वस्तु प्रत्येकाला हवीहवीशी वाटावी," हेच ते खाजगीकरण.  मॉलमध्ये हवीहवीशी वस्तु वाटणारा कोण असेल तर तो ग्राहक असेल. ग्राहक कोण असेल तर पालक व विद्यार्थी असेल. हे जर या शिक्षणाच्या मॉलमध्ये ग्राहक असतील तर ग्राहकांकडून नफ्याचीच अपेक्षा केली जाईल. अशी असेल  शिक्षणाच्या खाजगीकरणाची परिस्थिती. अशा परिस्थितीत उपेक्षित, वंचित, दुर्बल समाजापुढे खाजगीकरणात आपण कुठे असणार ? व कसे टिकणार ? हा प्रश्न असेल, किंबहुना हे आव्हानच असेल..!

🌼 येणाऱ्या काळातील शिक्षणाची अनिवार्यता

        येणाऱ्या काळात श्रीमंतांच्या, मध्यमवर्गीयांच्या किंवा गरिबांच्या पिढ्यांना शिक्षण घ्यावेच लागणार आहे. त्याशिवाय त्या पिढ्या नीटपणे किंवा सामान्यपणे उदरनिर्वाह सुद्धा करू शकणार नाहीत. कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे तो येणाऱ्या विज्ञानयुगात अनिवार्यच असेल..!
        जसा शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, तसा तो समाजाचाही तिसरा डोळा असेल.  शिक्षण आणि समाज खरेतर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समजा नाण्याच्या मूल्यांकनाची एक बाजू मुद्रित आहे व दुसरी बाजू अगदी कोरी असेल तर ते नाणे खोटे ठरवले जाते किंवा बाजारात त्याचे मूल्य अगदीच शून्य ठरते. तशीच माणसाची व समाजाची किंमत ठरविली जाते म्हणून माझ्या मते समाज आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
         शिक्षणाशिवाय जगत असलेला समाज म्हणजे डोळे नसलेला माणूस होय ! म्हणून जो समाज शिक्षित असतो तोच समाज ज्ञानी असतो आणि जो समाज ज्ञानी असतो तोच समाज प्रगत किंवा सुधारलेला असतो. आज एकुणच भारतीय समाजापुढे अनेक आव्हाने आहेत. ती आव्हाने स्वीकारण्यासाठी सर्वांगीण शिक्षणाची गरज आहे, म्हणून त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण राष्ट्र शिक्षित असावे लागेल !  राष्ट्रापुढे निर्माण होणाऱ्या जागतिक प्रश्नांना तोंड द्यावयाचे असेल तर यापुढे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. कारण शिक्षण हे अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून शिक्षण किंवा ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधकार होय !
       कोणत्याही माणसाला किंवा समाजाला नवी दृष्टी किंवा नवा दृष्टिकोन जर कशाने येत असेल तर तो शिक्षणाने येतो. शिक्षणाने प्रगतीच्या नव्या वाटा सापडतात. जो समाज शिक्षित असेल त्याचे राहणीमान, त्याची वागणूक त्याची संस्कृती आदर्शवत असते. म्हणून प्रगत आणि आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल तर राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचा प्रचार, प्रसार करणारी माध्यमे वाढवली पाहिजेत. म्हणजे ती राज्य सरकारने व केंद्र सरकारने वाढवली पाहिजेत. हे त्या त्या राज्याच्या, राष्ट्राच्या सरकारचेच काम आहे. 
       भारतातील प्रत्येक राज्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा,उच्च शिक्षणाचा प्रचार-प्रसार करून भारत हे राष्ट्र शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत करण्याचे आव्हान आज भारतीय समाजापुढे आहे. कोणत्याही राष्ट्राची सर्वांगीण प्रगती ही केवळ शिक्षणानेच होते. म्हणून भारत सरकारने के.जी. टू पी.जी. शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे. राष्ट्रातील संपूर्ण समाज शिक्षित झाला तरच राष्ट्र बलवान होईल. म्हणून बौद्धिकदृष्ट्या सुदृढ व बलशाली समाज निर्माण करावयाचा असेल तर संपूर्ण समाज  हा बौद्धिक, व्यवसायिक, तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावा लागेल व गुणवत्तापूर्ण उच्चविद्याविभूषित करावा लागेल. त्यासाठी शिक्षण मोफत व सक्तीचे करणे गरजेचे आहे. आजही तांडा, वाडी, वस्तीत, गावाजवळ पाल ठोकून राहणारा, अनेक शहरात उड्डाण पुलाखाली राहणारा.. भारतातील उपेक्षित,वंचित, दुर्बल समाज अद्याप शिक्षणाच्या  मुख्य प्रवाहात नाही, म्हणजे अजूनही तो शिक्षणापासून कोसो दूर आहे. त्यासाठी शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शिक्षणाची सक्ती करण्याची फार मोठी गरज आहे.

🌼 शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार

      बहुसंख्य भारतीय समाज अंधश्रध्देत अडकलेला आहे. हा भारतीय समाज अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्वच राज्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. तांडा,वाडी, वस्तीपर्यंत शिक्षणाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा लागेल. जेणेकरून भारतातील तळागाळातला गरीब माणूस समाज व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येईल आणि राष्ट्रातील गरीबी दूर होईल. मात्र आज बहुतांशी भारतीय समाज हा जातीभेद, धर्मभेद, धर्मांधता,कर्मकांड व अंधश्रद्धेकडे झुकत चाललेला दिसून येत आहे. याला इथली देववादी व दैववादी समाजव्यवस्था कारणीभूत आहे. देशात चालू असलेले धर्मांध सत्ताकारण कारणीभूत आहे. धर्मांध राजकारण कारणीभूत आहे. त्यातही जर राजकीय नेते व्यापारी असतील तर ते केवळ व्यापाराला महत्व देतील. व्यापार आला की, नफा-तोट्याचा विचार येतो. मग प्रत्येक बाबतीत सरासरी नफ्याचाच विचार पुढे येतो आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक  समाजाच्या प्रत्येक घटकांकडून वेगवेगळ्या नफ्याचीच अपेक्षा केली जाते. या नफ्यापुढे समाजातील हुशार, निस्वार्थी लोक, खरे संत, समाजसुधारक, तंत्रज्ञ, कलावंत, विद्वान, विशेष खेळाडू, विचारवंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या महत्वाच्या लोकांकडे दुर्लक्ष केेले जाते, खरेतर या लोकांमुळेच देशाची ओळख असते. हेच लोक देशाचे सांस्कृतिक वैभव असतात. इतर देश भारताची स्तुती धर्मामुळे किंवा जातीमुळे करत नसून शास्त्रज्ञांनी "चांद्रयान- 3 "हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरवून नावलौकिक मिळवला आहे, म्हणून स्तुती करतात. ही कामगिरी शास्त्रज्ञांची आहे. मात्र अशा विद्वान वर्गाकडे व सर्वांगीण शिक्षणाकडे जर सरकार दुर्लक्ष करीत असेल तर समाजात अधिकाधिक कामगार तयार होतील. राष्ट्रात केवळ कामगारांचीच संख्या वाढवली तर या देशाला कामगारांचा देश असे संबोधन लावले जाईल. म्हणून राज्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण देण्याचा हेतू ठेवावा. तसा निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.

🌼  शिक्षणाचे खाजगीकरणाचा दृष्टिकोन घातक 

          जर राज्यकर्तेच व्यापारी वृत्तीचे असतील तर त्यांना केवळ नफ्याचीच गणिते दिसतात. भारतात सध्या व्यापारी वृत्तीचे राजकीय नेते असल्यामुळे त्यांचे सर्वस्तरावर सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण करणे सुरू आहे. 
           महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच शिक्षणाच्या खाजगीकरणाचा आदेश जाहीर केला आहे. अनेक शाळा ह्या कंत्राटदारांना कंत्राटी पद्धतीने चालवायला दिल्या आहेत. वर सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने कंत्राटदारांना शाळा चालवायला दिल्यास कंत्राटी कर्मचारी, कंत्राटी कामगार निर्माण होणार, ते शिक्षक नसतील, तर ते कंत्राटी कामगार असतील. या कंत्राटी कामगारांना अज्ञानी असलेला कंत्राटदार पावला पावलांवर वेठीस धरेल. प्रत्येक बाबतीत शोषण करेल आणि या शोषित कामगार शिक्षकांची गुलाम असलेली मानसिकता विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात अपयशी ठरेल. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. सध्या जशा खाजगी इंग्रजी शाळा पालकांना वेठीस धरुन पैशांची लूट करतात तसेच प्रत्येक गोष्टीसाठी पालकांचेही आर्थिक शोषण केले जाईल आणि कंत्राटदार फक्त पैशाच्या नफ्याचा हिशोब करत बसतील..!  यात शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्नच येणार नाही. कारण विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचीही मानसिकता खराब झालेली असेल. याद्वारेच सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, याला कारणीभूत असेल शिक्षणाचे खाजगीकरण..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर 
९८९०८२७४१४


मा.मं. म्हणजे काय ? - लेखक- डॉ.अशोक राणा, यवतमाळ.

‘मामं’ म्हणजे काय ?                                 इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक   मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...