गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात...
- डॉ.धोंडोपंत मानवतकर


        
मंठा /प्रतिनिधी
        "आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्याकडून चांगली प्रेरणा, चांगला आदर्श आणि चांगले संस्कार मिळतात आणि तेच संस्कार माणसाचं आयुष्य सुंदर करतात" असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
        मंठा येथील संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था व बाल -सुधारगृहाच्या वतीने डॉ.मानवतकर यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी धोंडोपंत मानवतकर यांना शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी नाट्यकर्मी सतीश खरात व जय मराठवाडा टिव्हीचे पत्रकार महादेव पाखरे यांनी डॉ.मानवतकरांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
                  आपल्या भाषणात बोलतांना डॉ.मानवतकर यांनी वृक्ष हेच माणसाचे खरे सगेसोयरे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,शिल्पकार जसा दगडाची मूर्ती कोरतांना दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकतो तद्वतच प्रत्येक माणसाने आपल्यातील दुर्गुण कायमचे काढून टाकले पाहिजे तरच तुमचे आयुष्य सुंदर व सुसंस्कारी होईल...यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
          वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे नाट्य व सिनेकलावंत सतीश खरात लिंबेवडगावकर यांनी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांना भेट म्हणून दिलेल्या वटवृक्षाचे वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरात रोपण करण्यात आले. 
        याप्रसंगी वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात वृक्षदिंडी काढण्यात येऊन डॉ.मानवतकर यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण केले. यावेळी ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी व वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर संत तुकारामांचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे" हा अभंग आळवून कार्यकमात रंग भरला.
         संस्थेचे सचिव शुभम कृष्णाजी शेंडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचलन केले, शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानव

 

 छ.संभाजीनगर/प्रतिनिधी

     "सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून,विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, 'हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही चिकित्सकपणे समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
       साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त  २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १ वाजता, छ.संभाजीनगर येथील नागसेनवन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'लॉ 'कॉलेजच्या महात्मा फुले सभागृहात "मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद,महाराष्ट्र "च्या वतीने 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते.  उद्घाटकीय भाषणात डॉ.धोंडोपंत मानवतकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या आयुष्यात कोणतीच परिस्थिती पुरक नसताना त्यांनी अहोरात्र संघर्ष करत सामाजिक परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, यातून वेळ काढून वास्तव परिस्थितीवर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटके, लोकनाट्ये, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णन अशी सत्तर जवळपास पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या साहित्यात सर्व जातीधर्माच्या उपेक्षित,बहिष्कृत लोकांना नायक,नायिका बनवले आहे. समाज व्यवस्थेच्या प्रवाहाबाहेर असणारा दुर्लक्षित,उपेक्षित माणूस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी उभा करून मानवतावाद जपला आहे. परंतु आज आमच्या सुशिक्षित लोकांचे सगळे प्रश्न सुटल्यामुळे ते समाजकार्यात किंवा साहित्यिक कार्यात सहभागी होत नाहीत,ही खंत आहे. "आम्हीही समाजाचे काही देणे लागतो" हा विचार सर्वांनी अंगिकारून समाज कार्यात सहभागी झाले पाहिजे,असा विचार डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी मांडला.
         कार्यक्रमारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट अणाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रा.डॉ.कोंडबा हटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून साहित्यरत्न अणाभाऊ साठे यांच्या  जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेचे संस्थापक,अध्यक्ष चंद्रप्रकाश जी.शिंदे यांनी साहित्य चळवळीची भूमिका विषद करताना सांगितले की, साहित्य परिषदेच्या अनेक संमेलनाद्वारे साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचा समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न राहणार आहे...जेणेकरून  परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्या विद्वतेचा उपयोग समाजाला होईल.
          उदघाटन सत्राचे अध्यक्ष आंबेडकरवादी लेखक भीमराव सरवदे यांनी अध्यक्षीय समारोपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अणा भाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकांचा उहापोह करून कविता लेखनाच्या भूमिकेबाबत उपस्थित कविंना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुभाष गवळी यांनी केले.
            दुसऱ्या सत्रात ४ वाजता कवी राजू वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनात' महाराष्ट्रातील नामवंत कवींनी सहभाग नोंदवला होता. 
      कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल स.जाधव यांनी केले तर   धन्यकुमार टिळक यांनी कवींचे आभार मानले.
       या कार्यक्रमास साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांना नाट्यशिबिराची गरज

ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांना नाट्यशिबिराची गरज-
नाट्यदिग्दर्शक ॲड.सुशील बनकर

 मंठा /प्रतिनिधी       
         ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आहेत परंतु त्यांची ओळख पटविण्यासाठी कलावंताची शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे, यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो, स्वतःमध्ये लपलेला कलावंत ओळखून त्याआधारे आपले करिअर करता येते त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. असा मार्गदर्शक सल्ला छ.संभाजीनगरचे नाट्यदिग्दर्शक ॲड. सुशील बनकर यांनी या शिबिरार्थींना दिला.
         मंठा येथे तालुक्यातील नवोदित हौसी नाटय कलावंतांसाठी तीन दिवशीय नाट्य अभिनय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. 
या शिबिरात नाट्यअभिनेते सतीश खरात लिंबेवडगावकर यांनी तरुण हौसी कलावंतांना भाषण,संवाद,सूत्रसंचालन,शारीरिक अभिनय, वाचिक अभिनय, मूक अभिनय असे नाट्यअभिनयाचे वेगवेगळे प्रकार शिकवून प्रायोगिक रंगभूमी, व्यवसायिक रंगभूमी, लघु चित्रपटाची निर्मिती कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
      शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून छ. संभाजीनगर येथील नाट्य अभिनेते,नाट्यदिगदर्शक ॲड.सुशील बनकर यांची विशेष उपस्थिती होती. शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना ॲड. सुशील बनकर यांनी लघुचित्रपटासाठी कॅमेऱ्याचे अँगल कसे लावले जातात, शुटींग कशी केली जाते,याबाबत मोबाईल द्वारे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी आवर्जून उपस्थित असलेले मंठा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, मार्गदर्शक नाट्य कलावंत सतीश खरात,पत्रकार मानसिंग प्रल्हादराव बोराडे,पांडुरंग वगदे सर, डिझायनर आर्टिस्ट निखिल रामपूरकर, पत्रकार महादेव पाखरे,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,
       शेवटी गणेश सरोदे या नवोदित कलावंताने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

भारतातील उपेक्षित, वंचित, दुर्बल समाजापुढे शिक्षणाच्या खाजगीकरणाचे आव्हान.. !

भारतातील उपेक्षित,वंचित दुर्बल समाजापुढे 
शिक्षणाच्या खाजगीकरणाचे आव्हान














डॉ.धोंडोपंत मानवतकर




          गेल्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा आदेश काढला आहे. या आदेशाला विरोध दर्शवून  मराठवाडा शिक्षक संघाच्या जालना जिल्हा शाखेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना एक निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, "शिक्षण महागडे करणारा व दुर्बलांना शिक्षण नाकारणारा हा शासन आदेश शिक्षणाचे कंपनीकरण करणारा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याचा फेरविचार करून असा जाचक व घातक शासन आदेश रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू!" अशा आशयाचे निवेदन दिले आहे. 
         ६ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शासकीय, निमशासकीय सेवेतील अभियंत्यापासून सेवक पदापर्यंतची १३८ पदे कंत्राटदारांकडून भरण्यात येणार आहेत. या शासनादेशात शिक्षकांचा समावेश " कुशल मनुष्यबळ" वर्गवारीत करुन महाराष्ट्र राज्यातील डी.एड्. , बी.एड्., त्यासोबतच टीईटी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, पदवी, आदी पात्रताधारक शिक्षकांची पदे कंत्राटी संस्थेच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्यामुळे साहजिक त्यांच्या मानधनालाही कात्री लागणार आहे. मी पगार हा शब्द यासाठी वापरलेला नाही की, पगार हा वाढत जाणारा असतो ; मात्र मानधन कंत्राटदाराच्या हातात असेल व  त्या मानधनात ते कपातही करू शकतात म्हणून मानधन. 
         शिक्षकांची भरती करण्याचे अधिकार कंत्राटदारांना जर  देण्यात येत असतील तर... शाळाच कंत्राटदारांना चालवायला  दिलेल्या आहेत असा त्याचा अर्थ. म्हणजे नकळत आरक्षणाचा प्रश्न संपवून टाकलेला आहे. म्हणून या प्रक्रियेला शिक्षणाचे खाजगीकरण म्हणायला हरकत नाही. यासाठी प्रा.शितल भगवानसिंग अहिरे यांनी आपल्या शोधपत्रिकेत (पृष्ठ क्र.१६१) नोंदवलेल्या खाजगीकरणाच्या व्याख्येचा आधार घेता येईल. त्या लिहितात, "सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मालकीत किंवा व्यवस्थापनात खाजगी व्यक्तींना किंवा उद्योजकांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे खाजगीकरण होय.!" याच लेखात त्या पुढे शिक्षणाच्या खाजगीकरणाची आधुनिक व्याख्या करतात," शिक्षणाचे मोठे मोठे मॉल उभे करून त्यात आकर्षक वस्तुंची मांडणी करावी आणि त्यातील प्रत्येक वस्तु प्रत्येकाला हवीहवीशी वाटावी," हेच ते खाजगीकरण.  मॉलमध्ये हवीहवीशी वस्तु वाटणारा कोण असेल तर तो ग्राहक असेल. ग्राहक कोण असेल तर पालक व विद्यार्थी असेल. हे जर या शिक्षणाच्या मॉलमध्ये ग्राहक असतील तर ग्राहकांकडून नफ्याचीच अपेक्षा केली जाईल. अशी असेल  शिक्षणाच्या खाजगीकरणाची परिस्थिती. अशा परिस्थितीत उपेक्षित, वंचित, दुर्बल समाजापुढे खाजगीकरणात आपण कुठे असणार ? व कसे टिकणार ? हा प्रश्न असेल, किंबहुना हे आव्हानच असेल..!

🌼 येणाऱ्या काळातील शिक्षणाची अनिवार्यता

        येणाऱ्या काळात श्रीमंतांच्या, मध्यमवर्गीयांच्या किंवा गरिबांच्या पिढ्यांना शिक्षण घ्यावेच लागणार आहे. त्याशिवाय त्या पिढ्या नीटपणे किंवा सामान्यपणे उदरनिर्वाह सुद्धा करू शकणार नाहीत. कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे तो येणाऱ्या विज्ञानयुगात अनिवार्यच असेल..!
        जसा शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, तसा तो समाजाचाही तिसरा डोळा असेल.  शिक्षण आणि समाज खरेतर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समजा नाण्याच्या मूल्यांकनाची एक बाजू मुद्रित आहे व दुसरी बाजू अगदी कोरी असेल तर ते नाणे खोटे ठरवले जाते किंवा बाजारात त्याचे मूल्य अगदीच शून्य ठरते. तशीच माणसाची व समाजाची किंमत ठरविली जाते म्हणून माझ्या मते समाज आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
         शिक्षणाशिवाय जगत असलेला समाज म्हणजे डोळे नसलेला माणूस होय ! म्हणून जो समाज शिक्षित असतो तोच समाज ज्ञानी असतो आणि जो समाज ज्ञानी असतो तोच समाज प्रगत किंवा सुधारलेला असतो. आज एकुणच भारतीय समाजापुढे अनेक आव्हाने आहेत. ती आव्हाने स्वीकारण्यासाठी सर्वांगीण शिक्षणाची गरज आहे, म्हणून त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण राष्ट्र शिक्षित असावे लागेल !  राष्ट्रापुढे निर्माण होणाऱ्या जागतिक प्रश्नांना तोंड द्यावयाचे असेल तर यापुढे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. कारण शिक्षण हे अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून शिक्षण किंवा ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधकार होय !
       कोणत्याही माणसाला किंवा समाजाला नवी दृष्टी किंवा नवा दृष्टिकोन जर कशाने येत असेल तर तो शिक्षणाने येतो. शिक्षणाने प्रगतीच्या नव्या वाटा सापडतात. जो समाज शिक्षित असेल त्याचे राहणीमान, त्याची वागणूक त्याची संस्कृती आदर्शवत असते. म्हणून प्रगत आणि आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल तर राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचा प्रचार, प्रसार करणारी माध्यमे वाढवली पाहिजेत. म्हणजे ती राज्य सरकारने व केंद्र सरकारने वाढवली पाहिजेत. हे त्या त्या राज्याच्या, राष्ट्राच्या सरकारचेच काम आहे. 
       भारतातील प्रत्येक राज्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा,उच्च शिक्षणाचा प्रचार-प्रसार करून भारत हे राष्ट्र शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत करण्याचे आव्हान आज भारतीय समाजापुढे आहे. कोणत्याही राष्ट्राची सर्वांगीण प्रगती ही केवळ शिक्षणानेच होते. म्हणून भारत सरकारने के.जी. टू पी.जी. शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे. राष्ट्रातील संपूर्ण समाज शिक्षित झाला तरच राष्ट्र बलवान होईल. म्हणून बौद्धिकदृष्ट्या सुदृढ व बलशाली समाज निर्माण करावयाचा असेल तर संपूर्ण समाज  हा बौद्धिक, व्यवसायिक, तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावा लागेल व गुणवत्तापूर्ण उच्चविद्याविभूषित करावा लागेल. त्यासाठी शिक्षण मोफत व सक्तीचे करणे गरजेचे आहे. आजही तांडा, वाडी, वस्तीत, गावाजवळ पाल ठोकून राहणारा, अनेक शहरात उड्डाण पुलाखाली राहणारा.. भारतातील उपेक्षित,वंचित, दुर्बल समाज अद्याप शिक्षणाच्या  मुख्य प्रवाहात नाही, म्हणजे अजूनही तो शिक्षणापासून कोसो दूर आहे. त्यासाठी शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शिक्षणाची सक्ती करण्याची फार मोठी गरज आहे.

🌼 शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार

      बहुसंख्य भारतीय समाज अंधश्रध्देत अडकलेला आहे. हा भारतीय समाज अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्वच राज्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. तांडा,वाडी, वस्तीपर्यंत शिक्षणाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा लागेल. जेणेकरून भारतातील तळागाळातला गरीब माणूस समाज व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येईल आणि राष्ट्रातील गरीबी दूर होईल. मात्र आज बहुतांशी भारतीय समाज हा जातीभेद, धर्मभेद, धर्मांधता,कर्मकांड व अंधश्रद्धेकडे झुकत चाललेला दिसून येत आहे. याला इथली देववादी व दैववादी समाजव्यवस्था कारणीभूत आहे. देशात चालू असलेले धर्मांध सत्ताकारण कारणीभूत आहे. धर्मांध राजकारण कारणीभूत आहे. त्यातही जर राजकीय नेते व्यापारी असतील तर ते केवळ व्यापाराला महत्व देतील. व्यापार आला की, नफा-तोट्याचा विचार येतो. मग प्रत्येक बाबतीत सरासरी नफ्याचाच विचार पुढे येतो आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक  समाजाच्या प्रत्येक घटकांकडून वेगवेगळ्या नफ्याचीच अपेक्षा केली जाते. या नफ्यापुढे समाजातील हुशार, निस्वार्थी लोक, खरे संत, समाजसुधारक, तंत्रज्ञ, कलावंत, विद्वान, विशेष खेळाडू, विचारवंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या महत्वाच्या लोकांकडे दुर्लक्ष केेले जाते, खरेतर या लोकांमुळेच देशाची ओळख असते. हेच लोक देशाचे सांस्कृतिक वैभव असतात. इतर देश भारताची स्तुती धर्मामुळे किंवा जातीमुळे करत नसून शास्त्रज्ञांनी "चांद्रयान- 3 "हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरवून नावलौकिक मिळवला आहे, म्हणून स्तुती करतात. ही कामगिरी शास्त्रज्ञांची आहे. मात्र अशा विद्वान वर्गाकडे व सर्वांगीण शिक्षणाकडे जर सरकार दुर्लक्ष करीत असेल तर समाजात अधिकाधिक कामगार तयार होतील. राष्ट्रात केवळ कामगारांचीच संख्या वाढवली तर या देशाला कामगारांचा देश असे संबोधन लावले जाईल. म्हणून राज्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण देण्याचा हेतू ठेवावा. तसा निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.

🌼  शिक्षणाचे खाजगीकरणाचा दृष्टिकोन घातक 

          जर राज्यकर्तेच व्यापारी वृत्तीचे असतील तर त्यांना केवळ नफ्याचीच गणिते दिसतात. भारतात सध्या व्यापारी वृत्तीचे राजकीय नेते असल्यामुळे त्यांचे सर्वस्तरावर सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण करणे सुरू आहे. 
           महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच शिक्षणाच्या खाजगीकरणाचा आदेश जाहीर केला आहे. अनेक शाळा ह्या कंत्राटदारांना कंत्राटी पद्धतीने चालवायला दिल्या आहेत. वर सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने कंत्राटदारांना शाळा चालवायला दिल्यास कंत्राटी कर्मचारी, कंत्राटी कामगार निर्माण होणार, ते शिक्षक नसतील, तर ते कंत्राटी कामगार असतील. या कंत्राटी कामगारांना अज्ञानी असलेला कंत्राटदार पावला पावलांवर वेठीस धरेल. प्रत्येक बाबतीत शोषण करेल आणि या शोषित कामगार शिक्षकांची गुलाम असलेली मानसिकता विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात अपयशी ठरेल. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. सध्या जशा खाजगी इंग्रजी शाळा पालकांना वेठीस धरुन पैशांची लूट करतात तसेच प्रत्येक गोष्टीसाठी पालकांचेही आर्थिक शोषण केले जाईल आणि कंत्राटदार फक्त पैशाच्या नफ्याचा हिशोब करत बसतील..!  यात शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्नच येणार नाही. कारण विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचीही मानसिकता खराब झालेली असेल. याद्वारेच सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, याला कारणीभूत असेल शिक्षणाचे खाजगीकरण..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर 
९८९०८२७४१४


शनिवार, ४ मे, २०२४

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

         भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी  भारतातल्या खेडोपाडी, वाडी, वस्तीवर साजरी होत आहे. मोठमोठ्या   शहरात जयंती महोत्सव साजरा होतांना दिसतो आहे.जयंतीचे स्वरूप विस्तारतांना दिसते आहे; परंतु जयंती सोहळ्यातून वैचारिक प्रबोधनाची चळवळ होत आहे का ? की, नुसते जयंती सोहळे पहायला मिळताहेत कारण "सोहळे आणि चळवळ"  या दोन बाबी अत्यंत भिन्न आहेत,अशा काही बाबींचा जयंतीच्या निमित्ताने विचार करणे महत्वाचे वाटते म्हणून त्याअनुषंगाने थोडेसे विचार मंथन..! 
         तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना व कार्याला कोटी कोटी अभिवादन..! 

 जयंती साजरी करण्यामागील हेतु व उद्देश

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो ; परंतु जयंती का ? व कशासाठी साजरी करायची ? तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे आदानप्रदान व्हावे, प्रचार-प्रसार व्हावा आणि समाजप्रबोधन व्हावे हा यामागील हेतु असावा व तसाच आंबेडकरी जनतेच्या विचारधारेचा उद्देशही असायला हवा.  
           जो कोणी बाबासाहेबांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दररोज करत असेल... तो व्यक्ती  बाबासाहेबांची जयंती दररोज साजरी करत असतो. बाबासाहेबांचा तोच खरा अनुयायी असतो, त्यालाच जयंती साजरी करण्याची खरी व्याख्या समजलेली असते.
         जे जे कोणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केवळ डी.जे.लावून, मदिरा प्राशन करून, नटून थटून नाचत असतील, असा सोहळा करणे म्हणजे जयंतीचे केवळ प्रदर्शन होय ! असे माझे वैयक्तिक मत आहे. असा प्रदर्शन सोहळा साजरा करणारांनी आत्मचिंतन करून स्वतःला विचारावे आपण खरंच बाबासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत का ? आपण खरंच बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी आहोत का ? आपण खरंच बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत का ? आपण त्यांच्या विचारांंशी प्रतारणा तर करत नाहीत ना ?, असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजे. कारण त्या महापुरुषाने रात्रंदिवस केवळ आणि केवळ समाजाच्या उत्थानासाठीच आपले आयुष्य खर्ची घातले उपेक्षित समुदायाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.  पशुवत जीवन जगणाऱ्या समुहाला अज्ञान,अंधकार,अस्पृश्यता, बहिष्कृतता, अशा विषमतावादी व्यवस्थेच्या चिखलातून बाहेर काढून  माणूस बनविले, यासाठी बाबासाहेब अहोरात्र काम करत राहिले, अभ्यास करत राहिले. त्या महामानवाचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या उपकाराचे उतराई होण्याचा आम्ही जन्मोजन्मी प्रयत्न केला तरी आमच्याकडून त्या उपकाराची परतफेड होऊ शकणार नाही.

बाबासाहेबांच्या उपकाराचे कसे होणार उतराई ?

         बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपल्याकडून कधीच होणार नाही, आमच्या कार्यकर्त्यांच्या, अनुयायांच्या मनात बाबासाहेबांच्या  उपकाराचे उतराई होण्याचा विचार जर मनात आलाच तर त्यासाठी काय करावे लागेल ? ...तर त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल ! त्यांनी विषमतेविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या चळवळीचा रथ पुढे नेण्याचे काम करावे लागेल. त्यांनी दिलेल्या पवित्र बुद्ध धम्माचे आचरण करावे लागेल ! बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करावा लागेल !  हे काम कोणाचे आहे, तर हे एकट्यादुकट्याचे काम नाही, ते संपूर्ण समाजबांधवांचे काम आहे, व येणाऱ्या प्रत्येक पिढीचे काम आहे; परंतु आजच्या पिढीकडून ते होतांना दिसते का ?...तर याचे उत्तर "नाही" असेच येईल.! मग याला कोण जबाबदार असेल तर..यासाठी मागील प्रत्येक पिढी जबाबदार असेल! मागच्या पिढीचे काम आहे की, येणाऱ्या प्रत्येक पिढीला बाबासाहेबांच्या विचारांशी जोडून ठेवणे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करायला भाग पाडणे, त्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या भाषणांतील विचारांवर मुद्द्यावर सतत चर्चा करायला लावणे, समुहात नेहमी एकीची भावना टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत ठेवणे, समाजात निर्माण होणाऱ्या अनेक संघटनांना आवर घालणे, 

 अत्यल्प लोकसमुहाचे विविध संघटनात विघटन..!

       भारतातील  इतर समाजाच्या तुलनेत बौद्ध समाज संख्येने अत्यल्प  आहे. संख्येने अत्यल्प असलेल्या समाजात अनेक पक्ष आणि संघटना निर्माण होत असल्यामुळे समाज विखुरला जातो. समाजाअंतर्गत कलह होऊन त्यातून अत्यंत अल्प समुहाचे विघटन होते. म्हणून समाजात एकीचे बळ निर्माण करण्यासाठी व बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्यासाठी एवढेच करावे लागेल... विविध संघटना व पक्ष निर्माण प्रक्रियेला आळा घालावा लागेल !  समुहाची एकजूट असावी लागेल.  बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करणे व ते पुढील पिढीसाठी 'बावीस प्रतिज्ञांचे' विचारधन वाटत राहणे, त्यातून सामाजिक परिवर्तन व सामाजिक विकास करण्याचे काम सतत करता येईल. हे काम कोणाचे आहे ? तर हे काम सर्व समाजबांधवांचे आहे. त्यातही समाजाचे पुढारी व शिक्षित बांधवांची ही खरी जबाबदारीच आहे; परंतु असे घडतांना दिसते का ? तर याचे उत्तर "नाही" असेच येईल.
 
हिंदू म्हणून जन्माला आलो असलो; परंतु....

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." 
बाबासाहेबांनी केलेला निर्धार हा हिंदू धर्माच्या सांगोपांग अभ्यासातून आलेला होता. बाबासाहेबांना हिंदू धर्मातील वर्गभेद, वर्णभेद,धर्मभेद मान्य नव्हते. जाती जातीची उतरंड मान्य नव्हती. उच्च-नीच, स्पृश्य - अस्पृश्य असे भेद मान्य नव्हते, हिंदू धर्माच्या विकृतरितीबाबत बाबासाहेब म्हणतात,"ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो; पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे." 
         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील चालीरितीला, भेदाभेदाच्या वर्तनाला वेडगळपणा म्हटले आहे. रानटी प्राण्यांना देव म्हटले जाते, नरकाडी करणाऱ्या गाईला गो-माता म्हटले जाते, त्यांची पुजा केली जाते आणि माणसांचा विंटाळ केला जातो. त्याला अस्पृश्य ठरवले जाते. त्याची अस्पृश्यता पाळली जाते. अशी हिंदू धर्माची रुढ असलेली परंपरा बाबासाहेबांनी नाकारली होती. कारण बाबासाहेबांचा विचार हा समानतेचा विचार होता. त्यांना नेहमी वाटायचे,"ज्या धर्मात माणसांमाणसामध्ये समानता नसेल आणि माणसाला माणूस म्हणूनच वागवले जात नसेल तर त्या धर्माला आपला धर्म का म्हणायचे ? बाबासाहेब पुढे म्हणतात, "ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे." बाबासाहेबांनी हिंदू धर्मात असलेल्या मानवी वर्तनाच्या विकृतीला रोग म्हटले आहे, शिरजोरीची सजावट म्हटले आहे. 
           हिंदू धर्मातील मानवी अधिकारांबाबत बाबासाहेब म्हणतात, "
जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे."
सर्व मानव जातीचे कल्याण हे शिक्षित झाल्याशिवाय किंवा धनसंचय केल्याशिवाय होणारच नाही, त्याबद्दल बाबासाहेब म्हणतात,"जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे, ती एक शिरजोरीची सजावट आहे, किंवा वेडगळपणा आहे. हिंदू धर्माची अशी वेगवेगळ्या दृष्टीने व्याख्या करणारे बाबासाहेब हिंदू धर्माचा त्याग करणार नाहीत तर काय करतील ?
             डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच धर्माचा अभ्यास केला होता. सर्व धर्माच्या मानवी हक्काबाबत अभ्यास केला होता, कोणकोणत्या धर्मात मानवीमूल्ये जपली जातात त्या धर्माचा स्वीकार करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले होते आणि सर्व धर्माच्या अभ्यासातून शेवटी बाबासाहेबांनी 'बुद्ध धम्म' स्वीकारला.

बाबासाहेबांनी का स्वीकारला बुद्ध धम्म  ?

      बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का स्वीकारला ? याची कारणे....पुढील प्रमाणे सांगता येतात.... बुद्धधम्मात कर्मकांड नाही, उचनिचता नाही,  देव-देव नाही,  जिथे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा पवित्र हेतु आहे. अवडंबर नाही, मोक्ष, नरक, स्वर्ग ह्या कल्पनांना थारा नाही. दैव,नशीब,पंचांगी भविष्य, त्याचा प्रचार-प्रसार नाही, कुठल्याही अवताराचे, चमत्काराचे समर्थन नाही, भेदभाव नाही, थोतांड नाही, वर्णभेदाची उतरंड नाही. प्रज्ञेला म्हणजे ज्ञानाला, हुशारीला महत्व आहे. शीलाला महत्व आहे, करुणा उत्पन्न व्हावी असा आदरभाव आहे.
        हिंदू धर्मात अस्पृश्य मानलेल्या सर्व जातींचे जे जे हक्क नाकारले ते ते बुद्ध धम्मात नाकारलेले नाही. ते हक्क मिळण्याची समानता आहे. 
समानता ही समग्र मानव जातीचे कल्याण होण्यासाठी कारणीभूत ठरते. कारण समानतेमुळेच समग्र मानव जातीचा विकास होऊ शकतो; मात्र असमानता म्हणजेच विषमता ही मानवी उत्कर्षाच्या आड येते. म्हणून ज्या धर्मात समानता म्हणजेच समता असेल तो धर्म व पर्यायाने त्या धर्मातील मानव जातीचा समुदाय वेगाने विकास करू शकतो. हा बाबासाहेबांचा समतेचा विचार भारतातील जनतेने अंगिकारला असता तर भारत हा देश जगात महासत्ता बनला असता. 
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी असलेले गुण म्हणजे प्रज्ञा शील आणि करुणा होत. तथागताकडे असणाऱ्या गुणांचा बाबासाहेबांनी अंगीकार करून समाज घडवण्याचे व्रत हाती घेतले होते. बाबासाहेबांनी  तत्कालीन अस्पृश्य असणाऱ्या महार समाजाला १९५६ ला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध केला. बाबासाहेबांचे हे पाऊल तथाकथित हिंदू धर्माला हादरा देणारे होते. ही भारतातील हिंदूवादी समाजव्यवस्थेतील अत्यंत क्रांतिकारी घटना होती. 
      भारतीय मानवसमुहात असलेली भेदनीती व जातीची विषमता मोडीत काढण्यासाठी अनेक क्रांतिकारक संत,थोर पुरुष इथल्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध लढले आहेत. 
          सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यात महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा होता.

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

            "सर्वांचे कल्याण होवो" हा सिद्धार्थ गौतम बुद्धांचा समतावादाचा वैश्विक विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अंगिकारण्याआधी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला व शेवटी बुद्धधम्माची निवड करून हिंदू धर्माचा त्याग केला... आणि भारतातील लाखो दु:खी,पीडित,अस्पृश्य, बहिष्कृत समुहातील लोकांसोबत माणूस म्हणून जगण्यासाठी समतावादी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात असलेल्या विषमतावादाचे उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण भारतच बौद्धमय करण्याचा त्यांचा पवित्र हेतु होता. हे त्यांनी  "प्रबुद्ध भारत" नावाने सुरू केलेल्या वृतपत्राच्या शीर्षकावरून कळून येते.
              प्रबुद्ध भारत म्हणजे समतावादी विचारांचा भारत. जिथे जिथे समता असेल तिथे तिथे वर्णभेद, वर्गभेद नसतील व एककल्ली व्यवस्था नसेल..! जिथे भेद निर्माण होत नाही, तिथे कलह निर्माण होऊ शकत नाही. जिथे कलह नसेल, तिथे शांतता असेल, जिथे शांतता असेल तिथे सुख असेल ! अशा सुखी भारताची संकल्पना बाबासाहेबांच्या मनात होती. ह्या संकल्पनेला इथल्या विषमतावादी व्यवस्थेने नाकारले होते, ते आजही नाकारलेलेच आहे. याचे कारण हेच की, इथल्या विषमतावादी लोकांचे श्रेष्ठत्व टिकवून ठेवायचे असेल तर जातीभेद धर्मभेद, वर्गभेद, वर्णभेद टिकून राहिले पाहिजे. यासाठी मूठभर श्रीमंताच्या हातात देशाची सत्ता असेल आणि सत्ताधारी हे मूठभर लोकांच्या धर्मसत्तेचे गुलाम असतील आणि धर्मसत्ता ही ऐतखाऊंच्या मुठीत असेल, असा हा भारतातील विषमतावादाचा सिद्धांत सांगता येतो.
             परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय भारत होता. जिथे समग्र मानव जातीच्या कल्याणाचा विचार होता. समतावादाचा विचार होता. तो विचार जर रुजला असता तर सुखी आणि समृद्ध भारत आपणास पहावयास मिळाला असता. देशात शांतता नांदली तरच देश सुखी आणि समृद्ध होईल. परंतु देशात शांतता नांदत नसेल तर देश सुखी आणि समृद्ध कधीच होणार नाही.
           सध्या तर देशात शांतता नसून अराजकता माजली आहे.
 अशा या अराजक व्यवस्थेत सध्या देशातली जनता भयभीत आहे. जनता भयभीत करण्याला कारणीभूत इथले सत्तांध आणि धर्मांध लोक आहेत. ह्या सत्तांध ,धर्मांध आणि व्यापारी सत्ताधाऱ्यांनी देशाची संपती अतीश्रीमंतांना किरायाने देण्याचा सपाटा लावला आहे. हे मूठभर श्रीमंत लोक भारतातीलच आहेत म्हणून ठीक आहे. ह्या सत्ताधारी लोकांनी भारतीय संपती जर भारताबाहेरच्या देशातल्या श्रीमंतांना विकली तर भारतीय जनतेला पुन्हा इंग्रजांच्या गुलामगिरीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर देशाला अबाधित ठेवायचे असेल तर बाबासाहेबांचे समतावादी विचारच या देशात सुख,समृद्धी, शांतता निर्माण करू शकतात. बाबासाहेबांचा संविधानात आलेला विचार हा समतेचा विचारच देशाला तारू शकेल ! म्हणून केवळ एकाच जातसमुहाकडून बाबासाहेबांची जयंती साजरी न होता ती वैश्विक पातळीवर साजरी  व्हावी. बाबासाहेबांच्या विचारांची संपूर्ण भारत देशाला गरज आहे. म्हणून बौद्ध बांधवांसह भारतातील सर्व धर्मियांना बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करण्याची गरज आहे.
जयभीम ! जयभारत !!

✍️ डॉ.धोंडोपंत मानवतकर 

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

माय तुहे किती आठव आठवू..! आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब



|| मंथनाचे पैलू ||
-------------------------------------------------------------------लेखांक -३५



"माय तुहे किती आठव आठवू..."
आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

         कवी डॉ.सर्जेराव जिगे लिखित " माय तुहे किती आठव आठवू " या  काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा आज दि.४ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील 'मठपिंपळगाव' येथे मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.
       "माय तुहे किती आठव आठवू " ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल...इतकी  सहज सुंदर झालेली आहे. आईचे श्रमसंघर्षातील कष्टप्रद जीवन व स्वभावचित्रण प्रस्तुत संग्रहात यथार्थपणे प्रतिबिंबीत झाले आहे.
      'आई 'हा अनेक लेखकांचा, नाटककारांचा, कादंबरीकारांचा, कवींच्या कवितांचा विषय झालेला आहे. आईच्या प्रेमाविषयी बऱ्याच म्हणी, सुविचार, इतकेच नव्हे; तर चित्रपटही आलेले आहेत. गद्य,पद्य, चित्रकारिता अशा वेगवेगळ्या प्रकारे आईचा महिमा उदधृत झाल्याचे आपण अनुभवले आहेच.   
       स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील कवी यशवंत दिनकर पेंढारकर, यांची (स्वामी तिन्ही जगाचा... किंवा आई म्हणोनी कोणी..), कवी माधव ज्युलियन यांची..(प्रेम स्वरुप आई ), कवी भा.दा.पाळंदे यांची...(थोर तुझे उपकार ), नंतर  कवी ग्रेस,यांची.. (ती गेली तेव्हा रिमझिम...), कवी सुरेश भटांनी तर या पृथ्वीलाच 'आई' संबोधले आहे त्यांची प्रसिद्ध कविता.. ( गे मायभू तुझे मी...), कवी नारायण सुर्वे यांची...(माझी आई) , इंदिरा संत यांची..(आई), आनंद यादव यांची..( मायलेकरं ), कवी फ.मुं. शिंदे,यांची (आई एक नाव असतं, घरातल्या....), अलिकडच्या पिढीचे  स.द.पाचपोळ यांची...( हंबरून वासराले...), धोंडोपंत मानवतकर यांची..(नको नको सांगू माये...), अशोक पाठक यांची...(दिसे आईच्या डोळ्यात), स्वाती दांडेकर यांची.. (झुलाघर),  सुषमा जाधव यांची..(माय म्हन्ते)...तसेच गद्यलेखनात सकाळचे संपादक  उत्तम कांबळे यांचे...(आई समजून घेतांना ) आईविषयी लेख, कविता लिहिणाऱ्या अशा अनेक कवीं व कवयित्रींची, लेखकांची नावे सांगता येतील; परंतु विस्तार भयास्तव ते सांगणे टाळतो. तूर्तास कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या "माय तुहे किती आठव आठवू "या संग्रहाचे प्रकाशन होत आहे, या संग्रहात अभंग शैलीतून आईविषयीची दीर्घ कविता आली आहे, त्यांच्या कवितेचा उलगडा करून घेऊ.
           कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार,चित्रकार हे सर्वच प्रतिभावंत आपापल्या शैलीतून किंवा माध्यमातून सामाजिक, राजकीय, प्रापंचिक, वैयक्तिक विषयांना उजागर करत असतात. शैली आणि माध्यमे विभिन्न असली, तरी आपला विषय वाचकांना रुचेल, समजेल आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरून तो मनात खोलवर रुजेल ही अपेक्षा ठेवून कलावंत आपल्या विषयाचे प्रतिपादन करत असतो.
               कवी डॉ.सर्जेराव जिगे यांनीसुद्धा ग्रामीण संस्कृतीत   वावरलेल्या आईच्या स्वभावधर्माचे  कर्तव्याविषयीचे इत्थंभूत वर्णन "माय तुहे किती आठव आठवू" या खंडकाव्यात केले आहे. आईसोबतच कुटुंबाचा, परिसराचा, परिस्थितीचा, घरअंगणाचा, शेतीमातीचा, देवधर्म, दैव, कर्म, संस्कार तसेच ग्रामसंस्कृतीचा, परंपरांचा,परंपरांशी निगडित रीतीभातीचा, नीति-अनीतिचा,भेदाचा, माणसांंमाणसातील जिव्हाळ्याचा, थोडक्यात म्हणजे हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे एखाद्या मानवी विषयाला अनेक कंगोरे असतात.. त्या कंगोऱ्यांना स्पर्श करतच प्रपंचाचा गाडा पूर्णत्वाकडे जात असतो. तद्वतच आईच्या कष्टमय, सोशिक,धैर्यशील व संघर्षमय जीवनाचे, सुख-दुःखाचे अनेक कंगोरे या संग्रहात आले आहेत.
           डॉ.सर्जेराव जिगे यांनी आपल्या आईची स्मृती जागविण्यासाठी, तिच्या उपकाराचे उतराई होण्यासाठी हा लेखनप्रपंच केलेला आहे. खरेतर आईच कुटुंबाचा पाया असते आणि तिच्यातूनच प्रपंचाचा विस्तार होत जातो.. म्हणूनच कवी फ.मुं. शिंदे यांच्या "आई एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं" ह्या नऊ शब्दांच्या पंक्तीच आईच्या अस्तित्वाचं मूल्यमापन नोंदवत राहतात. तिची सहनशीलता, तिची सोशिकवृत्ती, तिचा संयम, तिची धडपड, तिचं नियोजन, तिची सचोटी, तिची काटकसर, तिचं रागावणं, तिचं जीव लावणं,  कुटुंबाने तिच्यावर लादलेलं स्वीकारणं, तिची सासरची काळजी, माहेरची ओढ,  तिने जिव्हाळ्यातल्या मर्मबंधी व सृजनबंधी नात्याचा टिकवून ठेवलेला गहिवर, तिच्या प्रापंचिक संचिताचा झालेला गूढगुंता,  स्त्री म्हणून आचरणासंबंधीची तिच्यावर असलेली सामाजिक बंधने, त्यातूनही तिच्या आवडीनिवडीवर लादलेली बंधने..अशा सगळ्या बाबी स्त्रीच्याभोवती फिरत असतात. इतक्या जोखडात राहूनही ती स्वतःच्या स्वाभिमानाबरोबरच माहेरची आणि सासरची अब्रू राखते..थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तिची "आई" म्हणून कुणीच जागा घेऊ शकत नाही.
         जोपर्यंत आपण आईच्या सानिध्यात असतो तोपर्यंत तिच्या असण्याबद्दलचे आपल्याला महत्व वाटत नाही; परंतु आई जेव्हा आपल्याला सोडून जाते, तेव्हा मात्र आपल्या तनामनात पोरकेपणाची फार मोठी पोळकी निर्माण झालेली असते....तिच्यासोबत आपल्या बालपणापासून ते..ती असेपर्यंतच्या प्रत्येक आठवणींना आपण काळजात साठवतो, त्या आठवणींनी काळजात घर केलेलं असतं. तिच्या आठवणींची काळजाला कुरुपं झालेली असतात. ती कुरुपं अधूनमधून सलत राहतात. केवढाही बलवंत, श्रीमंत किंवा तिन्ही जगाचा स्वामी असला तरी तो आईविना पोरकाच असतो.
         कितीही निष्ठूर माणूस असला तरी, त्याला आईची आठवण आली की,तो उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडतो, कारण त्याला पुरुष म्हणून जगाला अश्रू दाखवता येत नाहीत ....
        कवी सर्जेराव जिगे यांनी आईच्या सुख-दुःखाचा, तिच्या स्वभावधर्माचा, कर्तव्याचा, धारिष्ट्याचा, धार्मिकवृत्तीचा लेखाजोखा शब्दांकित केला आहे...त्यांचे आईविषयीचे स्वभावचित्रण अभंगाचे रूप घेऊन आले आहे. "माय तुहे किती आठव आठवू" हा कवितासंग्रह शेतीमातीला विठ्ठल मानून काळया आईची सेवा करणाऱ्या आईला व आईसम कष्ट करणाऱ्या सर्व माय-माऊल्यांना अर्पण केलेला आहे.
         कवीच्या अस्वस्थ मनाच्या गाभाऱ्यात स्मृती-विस्मृतीतल्या अनेक घटनांची घुसळण सुरू असते. अंतर्मनाच्या कप्प्यात भूतकालीन प्रसंगाचे कढ दाटलेले असतात. ते कढ मनाचा बांध फोडू नयेत म्हणून कवी त्यांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून देत असतो. आशय, विषय अभिव्यक्ती ही कविच्या मनाची रुपे,अपरुपे शब्दांशी नातं जोडून भावनांना बंदिस्त करत असतात. भावना आणि आठव ह्यांचं नातं चिखलाचं असतं. चिखलातून माती आणि पाणी वेगवेगळे करता येत नाहीत... तद्वतच माय आणि लेकरांच्या नात्याला वेगवेगळे करता येत नाही...माय दृष्टीआड झाली की, तिचा विरह जीवघेणाच असतो...ती दृष्टीआड झाली तरी..तिची प्रतिमा, तिचे स्वभावचित्र डोळ्यांसमोर सतत तरळत असते...त्यातूनच भावनांचे उमाळे आणि आठवांचे कढ दाटून येतात आणि कविता जन्म घेते...
           माय मही भोळी  | भोळा तिचा भाव |
           पंढरीचा राव | मायबाप ||
  पृ.२१
कवी डॉ.जिगे यांनी आपल्या संग्रहात पहिल्याच कवितेत आईचा भोळा स्वभाव आणि तिचा भोळा भाव असल्याचे सांगत ती निस्सिम विठ्ठलभक्त असल्याचेही सांगितले आहे. आईवडील जसे आपल्या पोटच्या मुलासाठी संकटात धावून येतात तद्वतच कवीची आई सुख-दुःखात, संकटात ती पंढरीच्या विठ्ठलाचा धावा करते, ती विठ्ठलाला मायबापच मानते. तिचा अंबाबाई तुळजाभवानी प्रतीही भक्तिभाव आहे, परंतु आई काम करत करतच नामस्मरण, देवधर्म, पुजा-अर्चा करते. ती आपल्या प्रपंचात कामाला इतके महत्व देते की, ती कामालाच चारीधाम समजते.  स्वतःचे दु:ख, वेदना लपवून समग्र समाजाबद्दल कळवळा नि चिंता व्यक्त करणारे आईवडील हे आपले दैवत असून त्यांचे कर्तव्य अवर्णनीय असल्याचे कविने म्हटले आहे. आईने आयुष्यात भोगलेल्या अत्यंत खडतर घटनांचे हे कथाकाव्य असल्याची प्रचिती पहिल्या कवितेपासूनच येऊ लागते.
        "माय तुहे किती आठव आठवू "आईवरील दीर्घ कवितेसाठी कवीने   अभंग काव्याचीच निवड का केली असावी ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे; त्याचे उत्तर असे की, अभंग काव्यप्रकार वाचकांना सहज समजतो आणि तो मनात रुजतो. शिवाय एकूणच कवितेतून असे दिसून येते की, कविचे आईवडील हे पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यांच्या प्रपंचाचा सगळा हवाला ते पांडुरंगावर टाकतात. घरात भक्तीचे वातावरण असल्यामुळे कविच्या रचनेतून अभंग काव्यप्रकाराची निवड होणे साहजिकच आहे.
         आधुनिक काळात केशवसुतांपासून मर्ढेकर- करंदीकर यांच्या पुढच्या पिढीतील दिलीप चित्रे - अरुण कोल्हटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. त्याही अगोदर अभंगाच्या वृत्ताचा वापर करून 'अखंड' या शीर्षकांतर्गत म.जोतीराव फुले यांनी विपुल काव्यलेखन करून समाज सुधारणेचे व सत्यधर्माची शिकवण देण्याचे काम केले. म.फुले यांचे काव्य अभंगाचेच रूप घेऊन ग्रामसंस्कृतीतील विकृतीला चव्हाट्यावर आणते. 
          कवी डॉ.जिगे यांनी आपल्या आईच्या कष्टप्रद आयुष्यात उद्भवलेल्या भल्यबुऱ्या प्रसंगांना अभंग रचनेच्या चरणखंडात शब्दबद्ध केले आहे.
                 माय उठे तव्हा | झोपलेलं जग |
                 पोटाची ती आग | जात्यावर ||
पृ.२४
कवीच्या आईच्या समकालीन स्त्रिया सकाळी चार वाजता उठून, चार पायल्या जात्यावर दळण दळत असायच्या. एक किलोमीटरवरून नदीचे पाणी आणून रांजण भरत असायच्या.  स्वयंपाक, न्हाणं, धूणं सगळं आटोपून नवऱ्यासोबत शेतात जाऊन खांद्याला खांदा लाऊन कष्ट करावे लागे. सगळं वेळेवर करूनही सासूबाईचे टोमणे ऐकून घ्यायचे..गणागोताची सरबराई करायची. डोळ्यात अश्रू दाबत कष्ट सहन करत संसार ओढायचा. मन मोठं करून गोरगरिबांना मदत करायची. एकाचवेळी नात्याचे अनेकांगी पदर जपून ठेवण्याची मानसिक तयारी करतांना आईची कितीच दमछाक होत असेल हे तिच्या मनाचा वेदनांकित गाभाराच जाणो..!
                       पक्वान्न करीती | ती सणासुदीला
                       शिळच पोटाला | खायी माय ||
पृ.२४
मनाचा मोठेपणा असणाऱ्या कविच्या आईची वृत्ती परोपकारी होती.    स्वतः उपाशी राहून भूकेल्यांना खाऊ घालण्यात तिला समाधान मिळे. सहरहु संग्रहात आलेली रचना कठीण, संदिग्ध किंवा शब्दबंबाळ नाही. प्रत्येक प्रसंग लगेच समजतो नि वाचक तत्कालिन परिस्थितीचा विचार करू लागतो.
                     मायीने पाहिले | ऊन पावसाळे |
                     शिवारात मळे | बहरले ||
पृ.२६
       किंवा      काळीला खुर्तून | माय थकलेली |
                    रात जागलेली  | खळ्यावर  || 
पृ.२७
आईच्या आयुष्याची सर्वस्तरावर परवड होत असूनही तिचे धीरोदात्तपणे प्रपंचाला सामोरे जाणे ही प्रक्रिया सहज नसून कमालीच्या कसरतीची आहे.  प्रस्तुत संग्रहातील रचनेतून कृषिवलांची भाषा, त्यांची साधने, यांत्रिक उपकरणांच्या कचाट्यात शेतीविषयक व दैनंदिन वापरात येणारे ग्रामीण शब्द लोप पावत चालले आहेत. प्रस्तुत संग्रहातील कवितेत ग्रामीण शब्दांचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. काठवती, घोंग्ता, हारखून, महामूर, खुर्तून, हातनी, उफनी, तिव्हा,मदन, बरकत,पांदन, कुरुपं, सपन, खोप, मुरत, गोठ म्हणजे गोष्ट, मुऱ्हाळी, शबुद, वावर,वापसा, माचवा,भकास,आबादानी,अशा ग्रामीण बोलीत येणाऱ्या शब्दांचा मुद्दाम वापर केलेला आहे. कवीचा जन्म खेडेगावातला असल्यामुळे त्यांच्या कवितेत ग्रामीण बोलीचे शब्द सहज येतात. याबरोबरच कवीचा शहराशी घरोबा झाल्यामुळे प्रमाणभाषा आणि ग्रामबोली यांची सरमिसळ दिसून येतो.
                        गणगोत तिनं | सांभाळले खूब |
                        जगण्याची ऊब | ओवीतून ||
पृ.४२
या अभंग प्रकारात ६-६-६-४ अशा मात्रा असतात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडात यमक साधावे लागते. कवीने उपरोक्त तिसऱ्या चरणाच्या शेवटी येणाऱ्या ऊब या शब्दाच्या यमकासाठी दुसऱ्या चरणात ' खूब ' ह्या फारसी अरबी शब्दाचा वापर करून यमक तर साधलेच; परंतु पंक्तीच्या आशयबोधात बाधा उत्पन्न होऊ दिली नाही. महाराष्ट्रावर अनेक सत्तांचा अमल झाल्याने त्या त्या काळात त्यांनी आपली भाषा रुजवली व ती मराठीमय झाली. समग्र समाज दैनंदिन व्यवहारात अनेक भाषा बोलत असतो. मराठी भाषेत हिंदी, उर्दू, फारशी, अरबी, इंग्रजी अशा विविध भाषांच्या काही शब्दांनी शिरकाव केलेला आहेच.. असो !
                           माय मही चाले | तिफणीच्या मागं |
                           माय बापा संगं |  ढेकळात ||
पृ.५८
            कवी डॉ.जिगे यांनी केलेल्या काही रचना फार पूर्वी लिहून ठेवलेल्या असाव्यात असे वाटते किंवा आईच्या गतस्मृतींचा तो चलचित्रपट काळीजकप्प्यात दस्तऐवजासारखा जपून ठेवलेला असल्याने अनेक घटनांच्या नोंदी करता आल्या आहेत. केवळ नोंदीच नव्हे, तर त्या नोंदीच्या मुळाशी गहिवर येणाऱ्या भावनांचा उमाळा आहे, म्हणजे आठव आहे. कितीतरी आठवांचा हा शब्दवानोळा कवीने लेखक, वाचक,रसिकांसह साहित्यसृष्टीला बहाल केला आहे. कवीच्या आईप्रमाणेच समकालीन पिढीने आपली माय सुद्धा अशीच कष्टत,तिष्ठत आणि पिचत असल्याचे चित्र बघितले आहे, बघितले असेल. ग्रामीण कास्तकार कुटुंबाच्या प्रपंचात असलेली ही कमालीची अभावग्रस्तता तरीही आशावादी राहून चिवटपणे राब-राब-राबणाऱ्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनजाणिवांची प्रांजळ अनुभूती यापेक्षा दुसरी काय असू शकते ?
         कविने आपल्या संग्रहातील काही कवितांमध्ये आईच्या कृतार्थधर्मासाठी ऐतिहासिक,पौराणिक, मिथके वापरली आहेत.आईच्या सर्वस्पर्शी भावनांचे प्रस्तर उलगडतांना तिच्या प्रापंचिक प्रमेयाची कसोटी तिच्या मनाच्या मोठेपणाात व चांगुलपणातच असल्याचे सिद्ध केले आहे.
      डॉ.सर्जेराव जिगे यांची कविता कृषिवलांच्या श्रमजीवी संस्कृतीचे, माय-माऊल्यांच्या कष्टप्रद जीवनाचे यथार्थ दर्शन घडविते. शब्दमर्यादेमुळे सर्वच काव्यपदांचा उल्लेख शक्य नाही.  हा संग्रह संपूर्ण वाचल्यावरच ग्रामीण लेखक, कवींना ग्रामसंस्कृतीत वावरणाऱ्या माय-माऊल्यांच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नाचे संसारतत्व, तिची परवड आणि तिची सत्वधीरता समजून घेता येऊ शकेल..!
       प्रस्तुत संग्रहाच्या प्रस्तावनेत ग्रामीण साहित्याचे लेखक, अभ्यासक, समीक्षक डॉ.वासुदेव मुलाटे यांनी संग्रहात आलेल्या आईच्या समग्र जीवन जाणिवांचा चिकित्सकपणे परामर्श घेतला आहे. कविवर्य प्रा.फ.मुं.शिंदे यांची व प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांची असलेली पाठराखण या संग्रहाला अधिकच महत्व प्राप्त करून देते. चित्रकार सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ व जितेंद्र साळुंके यांची सूचक व समर्पक अशी रेखाटने संग्रहाच्या सौंदर्यात भर घालतात. आदित्य प्रकाशनाने संग्रहाची सुबक व आकर्षक अशी निर्मिती केली आहे. सत्तावन्न दीर्घ कविता असलेल्या सुंदर काव्याकृतीचे वाचक स्वागतच करतील. सुंदर संघटनकौशल्य असणारे व अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलणारे कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

                  





गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

आमदार बच्चूभाऊ कडू

आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची भूमिका रास्त.....आणि पवित्रा सकारात्मक. 

प्रासंगिक - डॉ.धोंडोपंत मानवतकर



























          आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व त्यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काल क्रिकेटपट्टू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. ते आंदोलन सचिन तेंडुलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीच्या विरोधात होते. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता. त्यांचे म्हणणे रास्त होते. आणि त्यांची मागणीही रास्त होती. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानणाऱ्यांची संख्या अगणित आहे. म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करणे गैर नाही. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमधील योगदान पाहून त्यांना भारताने 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानच केलेला आहे. भारतरत्न ह्या सर्वोच्च सन्मानाचे मानकरी अत्यंत बोटावर मोजण्याइतके आहेत. देशासाठी ज्यांनी फार मोठा त्याग केला आहे, फार मोठी कुर्बानी दिलेली आहे अशांना भारत सरकार 'भारतरत्न' हा पुरस्कार देते. 'भारतरत्न' हा भारत देशाची इभ्रत मोठी करणारा पुरस्कार आहे, तो पुरस्कार भारत सरकारने शहीद भगतसिंग यांना, महात्मा फुले यांना, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना दिलेला नाही; परंतु तो सचिन तेंडुलकर यांना दिलेला आहे, असे आ.बच्चूभाऊ कडू यांचे म्हणणे आहे.म्हणून  भारतरत्न दिलेल्या सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या, जुगाराच्या जाहिराती करू नये. तो भारतरत्न पुरस्काराचा अपमान आहे, नाहीतर 'भारतरत्न' हा पुरस्कार परत करावा व खुशाल जाहिराती कराव्यात. तुम्हाला भारतरत्न पुरस्कार असल्यामुळे तुम्हाला अशा ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणे शोभणारे नाही. हा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता.आ. बच्चूभाऊंचा हा विचार अतिसामान्य माणसालाही पटणारा आहे. भारतरत्न हे जर पैशासाठीच जाहिराती करत असतील तर येत्या गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी गणपतीजवळ दहा दिवस एक दानपेटी ठेवून तो सर्व निधी सचिन तेंडुलकर यांना देऊ. हा विचार खोचक नसून किंवा विरोधासाठी विरोध नसून समजावणीच्या सुरातला आहे. 
           अगोदरच अनेक कुटुंब या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीमुळे उध्वस्त होत असल्याचे दिसत असताना तरुण पिढीला चांगले विचार देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जेणेकरून 'भारतरत्न' समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून   समाजातील तरुणांना चांगला आदर्श मिळावा, चांगली प्रेरणा मिळावी. भारतरत्न मिळालेला व्यक्ती तरुणपिढ्यांचा आयकॉन ठरावा. आयडॉल ठरावा. क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या जुगाराच्या जाहिराती करून तरुणांची आपल्या कर्तृत्वाबद्दल असलेली अस्मिता गमावू नये. अत्यंत सरळ ,साधा, खरा विचार  आ.बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा होता. 
         आमदार बच्चूभाऊ कडू हे नेहमी विकृतीवर बोट ठेवत आले आहेत. त्यांची आंदोलने तरुणांचा आणि शेतकरी वर्गाचा कैवार घेणारी असतात. मात्र अनेक पुढारी हे तरुण पिढीचा वापर केवळ मागे मागे फिरण्यासाठी करतात म्हणून आजचा बहुसंख्य तरुण बेरोजगारी व महागाईच्या विळख्यात सापडलेला आहे. शेतकरी वर्ग कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडलेला आहे.
        एकीकडे भारतात कोट्यावधी तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. कमालीच्या महागाईने गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस त्रस्त आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाने गरीबांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजवले आहेत. तरुणांना चांगले शिक्षण घेण्यासाठी तारुण्य गमवावे लागत आहे. उपवर झालेली मुले, मुली कुटुंबाला आपला हातभार लागावा यासाठी नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. देशातल्या तरुणाईपुढे जगण्याचे प्रश्न आहेत. नोकरीच्या, रोजगाराच्या संधी मिळून आयुष्यात स्थैर्य कसे लाभेल यासाठी तरुणवर्ग चिंतातूर आहे.
           आजच्या तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारकडे कोणतेच ठोस कार्यक्रम नाहीत. नोकरीच्या परिक्षेच्या अर्जासाठी कोटी रुपये उकळले जातात आणि ऐनवेळी सांगितले जाते की, परीक्षा रद्द झाल्या. म्हणजे भारत सरकार तरुणवर्गाचे अशाप्रकारे शोषण करत आहे. एकतर डोक्याचा भुगा होईस्तोवर अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी करायची आणि ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्या म्हणून ऐकून घ्यावयाचे. अशा सगळ्या बाजुंनी होणारे शोषण आणि त्या शोषणाचे परिणाम भोगणारे तरुण जीवन संपविण्याचा विचार करणार नाहीत तर काय करतील ?
      कोट्यावधींची संपती असणाऱ्या एखाद्या पुढाऱ्यांने किंवा कोट्याधीश कलावंतांने, किवा एखाद्या उद्योगपतीने किंवा एखाद्या कोट्याधीश क्रिकेट पट्टूने तरुणवर्गासाठी आपल्या मिळकतीतला दहा पाच टक्के हिस्सा तरुणांच्या शिक्षणावर खर्च केला का ? दहा-पाच तरुण दत्तक घेतलेले आहेत का? उलट या तरुणांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत. तरुणांची मने भरकटवली जात आहेत. त्यांना संभ्रमात टाकण्यात येत आहे. त्यांना ऑनलाईन जंगली रम्मी सारख्या आभासी खेळाला बळी पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे समोर केले जातात. 
       जपान, चीन,अमेरिका, कॅनडाचा तरूण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. मोठमोठ्या हुद्यावर जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. मात्र आमच्या भारतातल्या तरुणांना कावडयात्रा, पायीदिंडी काढण्यासाठी पुढारी लोकांकडून पैसा पुरवला जातो. त्यांना शिक्षणापासून, परिवर्तनीय विचारापासून दूर भरकटवले जाते, त्यांच्या डोक्यात धर्मद्वेषाचे, जातीयद्वेषाचे विचार पेरण्याचे काम केले जाते. तरुणांची मने भरकटवण्यामागे सत्ताधारी लोकांचा स्वार्थी विचार असतो.
         अलिकडे अनेक अभिनेते भंकस जाहिराती करत आहेत. त्या जाहिरातीतले ते स्वतः काहीच वापरत नाहीत; मात्र आडमाप पैसा घेऊन जाहिराती करतात. ते स्वतः कोकाकोला, थम्सअप, स्प्राईट सारखे भंगार थंडपेय पीत असतील का ? अजिबात नाही, कारण त्यांना सौंदर्य जपावे लागते आणि सौंदर्य जपण्यासाठी आहारावर खूपच नियंत्रण ठेवावे लागते. मग अभिनेता, अभिनेत्री यांनी स्वतःला जपावे. आणि इतरांनी कसल्याही वस्तु पदार्थ, थंडपेय खरेदी करून आपले आरोग्य बिघडवावे का ? दुसऱ्याबद्दल चांगला विचार या नावलौकिक मिळवलेल्या लोकांच्या मनात येवू नये का ?  एवढा सदसद्विवेकीविचार या जाहिराती करणाऱ्या लोकांच्या डोक्यात यावा. भरकटलेल्या तरुणांनी आभासी जगातील कोणत्याही भूलव्या प्रकाराला बळी पडू नये व  सर्वोच्च न्यायालयानेही अशा भूलव्या जाहिरातींवर, आभासी ऑनलाईन जंगली रमी सारख्या जाहिरातीवर निर्बंध लावावेत. जेणेकरून या देशातल्या तरुणपिढ्यांची फसवणूक होणार नाही; आजचा तरुण हा उद्याच्या विज्ञानवादी, प्रगतीशील मजबूत भारताचा सक्षम नागरिक असावा म्हणून तरुणवर्गाच्या भविष्याचा विचार हाच प्रगतशील राष्ट्राचा विचार असेल !
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर


चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...