गुरुवार, २२ जून, २०२३

नको नको सांगू माये...!



आईची आठवण म्हणून ही कविता आईला
समर्पित......






















आईचा सासुरवास आणि तिच्या जिंदगीची तिनेच सांगीतलेली कथा....माझ्या कवितेतून..!🌼

--------------------------------------------------

नको नको सांगू माये..!


नको नको सांगू माये,  तुही करमकहानी
ऐकताना डोळ्यांमधीं, येतं पसाभर पानी


राब-राबली कष्टली,    तुव्हा फाटका संसार
तुव्हं खोटं खोटं भाग्य, दैवाचाही खोटा सार


मायबापाची गरीबी, नाही बोळवण साधी
सासरीही कष्ट केले, नाही धूसफूस कधी


बारा गाड्या गरिबीत, कशी जन्मली तू माय
कसायाच्या घरी जणू, गुणी जन्मली तू गाय


तुह्या बापाची गरिबी, तशी गेली शेवटाला
सासरीही फाटकाचं, तू  गं  संसार थाटला 


कामामधी जलम गेला, तुही सुद् तुला नाही  
जातं, चुलं  नि  वावर , देई  कामाची गवाही


कोंबड्यानं बांग द्यावा, तव्हा तुह्या हाती जातं
नव-याचं तुह्यासंग ,  गाय कसायाचं नातं 


उठे तांबडं फुटता,    तशी बसे जात्यावर
उपाशी न राहे कुणी, तुव्हा जीव नात्यावर


तुह्या मांडीवर डोकं,  मला येई गाढ झोप 
कणी कोंड्याचं दळण, चार पायल्याचं माप


दिसं निघायच्या आधी, बारा घागरी नदीच्या 
तुह्या कष्टामुळं येई, पानी डोळ्यात नदीच्या 


कोसभर गावनदी, तुह्या चोवीस चकरा
रांजणाला येई कीव, माय बळीचा बकरा


गव-याबी थापल्या तू, रोज सारवण केलं
तुह्या सासुबाईच्या तं, कधी मना नाही आलं


मोठी सून मनू मनू, रातं दिन काम केलं
सास-यानं तुह्या तुला, नाही अंतर गं दिलं 


सासू होती कैदासीन, सासरा  तं बापावानी
त्याला ठाऊकच होती, तुह्या जुल्माची कहानी


तुह्या पोटामधीं भूक, आतड्याला पडे पीळ
माय करायची कामं, उपाशी ती  ईळ ईळ 


पाचविला पुंजलेला, तुला कष्टाचा डोंगर 
बापाच्या मागं..मागं, तुवा हाकिला नांगर


चार वरसाचा होतो,  तव्हा कलली सावली 
घास खुंटला मुखात,  मही दुःखात मावली 


जावा पोटामधीं घास, माय तडफडे भारी
पोटाच्याच दुखापायी, नाही मिळाली भाकरी 


माय गरोदर  तरी ,खायी पाथरीची भाजी
खाण्यापिण्याच्या नावानं, करी परपूस आजी


असं कसं भाग्य तुव्हं, किती नशीब फाटकं
संसारात नाही केलं, कधी खोटं तू नाटकं 


तुह्या गळ्यामधी होता, लताबाईचा गोडवा
मह्या कवितेला आला, तुह्या ओवीचा गोडवा


तुह्या नशिबाचे गिर्हे, कसे उलटे फिरले 
तुह्या दैवाचे उखाणे, कसे दुःखाने चोरले


कसं निखरट दैवं, त्याला नाही आली कीव
जलमभर सोसलेल्या, दुखण्यानं गेला जीव 


तुझा मुलगा 

धोंडोपंत मानवतकर, 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मा.मं. म्हणजे काय ? - लेखक- डॉ.अशोक राणा, यवतमाळ.

‘मामं’ म्हणजे काय ?                                 इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक   मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...