सोमवार, ३० जानेवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर













....बाकी सगळं अलबेल आहे !"

       भारतीय माणसाला सोहळे प्रिय आहेत... तो नेहमीच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी (स्मृतीदिन) त्याच बरोबर नवस, कंदुरी, भंडारे, वाढदिवस आणि वर्षभरात येणारे सगळेच पारंपरिक सण साजरे करतो.. तेही अगदी आनंदाने....! परंतु ह्या सगळ्याच सोहळ्यांचं तो स्वतःला कधीच आऊटपुट मागत नाही...! 
      अलिकडे सोहळ्यांना चांगले दिवस आले आहेत. आम्हां सगळ्यांना सोहळे प्रिय वाटू लागले आहेत. आम्ही सोहळ्यांना अतिरिक्त महत्व देऊ लागलो आहोत....परंतु सोहळा का करायचा ? कशासाठी करायचा ? की,केवळ भूतकालीन इतिहासाचा  जागर करायचा..! की, नुसत्या भूतकालीन स्मृती जागृत ठेवायच्या..? की, भूतकालीन घटनांना नुसता उजाळा द्यायचा..? की, या कार्यक्रमातून, सोहळ्यातून काही आदर्श घ्यायचा,? की काही प्रेरणा घ्यायची ? की, यातून काटेकोरपणे काही आचरण करायला शिकायचे.? याबाबत आमच्याकडे काहीच उद्देश नसतो. म्हणजे "वाळूत मुतलं फेस ना पाणी" सारं निर्रथक.
        मला वाटतं या सर्व घटना, कार्यक्रम, उपक्रम, शाळेतील प्रतिज्ञा, प्रार्थना किंवा समाजात चाललेले कीर्तन, प्रवचन, सप्ताह किंवा शासनाद्वारे निघणारे उपक्रमाचे आदेश.. हे नुसते सोहळे होऊ लागले आहेत ते केवळ सोहळे न होता त्यांचे काटेकोरपणे पालन आणि आचरण व्हावे..!
      शालेय विद्यार्थ्यांकडून गेल्या सत्तर वर्षापासून दररोज राष्ट्रगीत, प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते....लहानपणी शाळेत दररोज आमच्याकडूनही राष्ट्रगीताचा दर्जा असलेलं एक प्रसिद्ध गीत वदवून घेत असत...*'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा "* कवी पुढे लिहितो *"मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* लाहोरचे कवी मुहम्मद इकबाल यांनी हे गीत १९०५ साली लिहिलं होतं. तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांना भारतातील अनेक जातीजातीत, धर्माधर्मात सलोखा,भाईचारा आहे, हे दाखवण्यासाठी हे गीत
लिहिलं होतं...एक मुस्लीम शायर म्हणतो," *मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* आणि आम्ही सत्तेसाठी हिंदुमुस्लीम दंगली घडवून आणतो... जातीजातीत भांडणे लावतो....निवडून येण्यासाठी भावाभावात भांडणे लावतो आणि आमची पोरं पोरी दररोज प्रतिज्ञेत म्हणतात, " *सारे भारतीय माझे बांधव आहेत.* किती कमालीचा विरोधाभास आहे हा. म्हणजे प्रतिज्ञा केवळ तोंडपाठ करण्यापूरतीच असते का ?  की तिचे आचरणही करायला पाहिजे. प्रियजनहो तुम्हीच ठरवा...आम्ही एकमेकांना भाऊ का समजत नाहीत..? आम्ही जातीचा धर्माचा, प्रतिष्ठेचा अहंकार घेऊन का भांडत राहतो..? अलिकडे तर जातीयवाद बोकाळला आहे तो स्पृश्य - अस्पृश्य असा नसून रुपांतरीत झाल्याचे दिसून येत आहे...महाराष्ट्रातील अनेक संतांनी जातीभेदांवर, अंधश्रद्धेवर लोकांच्या खोटारडेपणावर, अभंग व भारुडे रचली आहेत.. ती आम्हाला तोंडपाठसुद्धा आहेत; परंतु आम्ही त्यातील तत्वज्ञान आचरणात आणत नाही.
       इथे प्रत्येक समाज आपापल्या धर्माचे सोहळे करत आहे; मात्र ते फक्त सोहळेच होताहेत...आचरण मात्र शून्य आहे...
      दरवर्षी 'मराठी भाषा दिन' व 'मराठी भाषा पंधरवाडा' साजरा केला जातो; कार्यक्रमाला दहाबारा लोक उपस्थित असतात. माझ्यासारख्या मानधन न घेणाऱ्या गावातल्याच प्रमुख वक्त्याला बोलावून एक हार आणि त्याचं पंधरा मिनिटाचं भाषण असतं.. मी सांगत असतो, *"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी* 
 *खरेच धन्य जाहलो ऐकतो मराठी* पुढे मी सांगत असतो," मराठी लँग्वेज ही आपली मदरटंग आहे. मराठी लँग्वेजवर अनेक लँग्वेजने आपल्या मराठी लँग्वेजवर आक्रमण केलेलं आहे, आपल्याला ते हाणून पाडावे लागेल..! (टाळ्या ) माझ्या पंधरा मिनिटाच्या भाषणात हिंदी, इंग्रजीचे पाचपन्नास शब्द आलेले असतात यावर कुणीच काही बोलत नाही; कारण मी असतो गावातलाच विनामानधन वक्ता...म्हणून तेही काही बोलत नाहीत...शेवटी चहापाण्यावर कार्यक्रमाची सांगता होते....बस्स. झाला मराठी भाषा दिन साजरा...  अर्थात ही सुद्धा एक प्रासंगिक औपचारिकताच असते..  परंतु मराठी भाषेविषयी चिंतनशील चिकित्सक अशी चर्चा होत नाही...चर्चा होते ती शहरांची नावे बदलण्यावर....तो असतो सत्ताकारणाचा भाग, सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न... चर्चेत राहण्याचा..मुद्दा..!
          देशातले राज्यकर्तेसुद्धा श्रेय घेण्यासाठी अनेक कार्यक्रमाची उद्घाटने करतात; काम मात्र करत नाहीत...एक सत्त्य उदाहरण असे की, आम्ही गेल्या एप्रिलमध्ये एका आमदारांना वाचनालयाच्या उद्घाटनासाठी बोलावले त्यांनी तिथेच त्याप्रसंगी वाचनालयाला सहालाख रुपये देतो म्हणून जाहीर केले.. आज वर्ष होत आहे...अजून कृती नाही... दुसऱ्या एका प्रसिद्ध व्यक्तीने पंचवीस वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी अकरा हजार रुपये देतो म्हणून भरसभेत जाहीर केले होते. तो बिचारा कोरोनामधी मरण पावला; परंतु त्याचे आश्वासन आम्ही विसरलो नाही... आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा असंच आहे ह्यांच्या आश्वासनासारखं.....प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येऊन पडल्यासारखं...!
     पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला आम्हाला फक्त सगळीकडे स्वातंत्र्यदिनाचे भरगच्च कार्यक्रम दिसतात, ज्याची महिन्याभरापासून ,वाजवण्याची पीटीची, कवायतीची रंगीत तालीम सुरु असते... अनेक राज्यकर्तेही लिहून दिलेल्या आपापल्या सकारात्मक भाषणाचा सराव करत असतात
.....आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ऐकू येतात सगळीकडे स्वातंत्र्याचे गाणे, शहीदांची करुणरसातली कवने,
भाषणांची रेलचेल, सगळीकडे तिरंगा फडफडतांना...!  जल्लोष होताना..! जयजयकार होताना...!
        सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या धर्मनिरपेक्षतावादी आमच्या देशात लोकशाही स्वातंत्र्याचा जयघोष करतो आहोत, सोहळे करतो आहोत..मात्र लोकशाही अजून भारतातील दुर्बलांच्या, कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या झोपडीत शिरलेली नाही, की..शिरू दिली नाही..यावर आपण खुशाल चिंतन करू शकता..! लोकशाहीच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या मूल्यांचा फक्त भास होतोय..! जाहिरातींचे बळी ठरलेल्या भारतीय माणसाला फक्त  राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही...बाकी सगळं अलबेल आहे.
✍️
 डॉ.धोंडोपंत मानवतकर
लेखक- सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे अभ्यासक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...