गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर लेखांक-४

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर



















अहंकार हा आपला शत्रूच..! 

               माणूस हा भयंकर अहंकारी प्राणी आहे.. छोट्या छोट्या गोष्टींचा तो अहंकार करत असतो. अहंकाराला लोक इगो म्हणतात. माणूस स्वतःच्या अहंकारी वृत्तीमुळे दुसऱ्याला खूप त्रास देत आला आहे... तेवढेच त्याने स्वतःचेही नुकसान करून घेतले आहे.
           अहंकार बाळगून माणूस स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेत असतो..म्हणून निरहंकारी लोकांची तसेच संतांची संगत महत्वाची असते; परंतु कोणत्या संतांची ? तर जे परोपकारी आहेत त्यांची. रंजल्या गांजलेल्यांना आपलं म्हणणारे आहेत त्यांची. जे सर्वज्ञ आहेत त्यांची. ज्यांचे पड्विकार गळून पडलेले आहेत त्यांची.
          आज स्वतःला महाराज म्हणवून घेत समाजाला लुबाडणारे खूप आहेत.  अनेक महाराज स्वतःला संत म्हणून घेणारे आहेत. अशाच एका संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापू यांना आपल्या दुष्कृत्याबद्दल नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अशा विकृत साधूंपासून समाजाने लवकर सावध झाले पाहिजे.
          ज्याला आपल्या ज्ञानाचाच गर्व होतो तो साधू नव्हे. "संतांची विभूती जगाच्या कल्याणा"  संतांचं आयुष्य जगाच्या कल्याणासाठी झिजलं पाहिजे.. परंतु अलिकडे तसे न होता अनेकांना आपल्या चमत्काराचा अहंकार झालेला आहे.. आणि या चमत्काराच्या माध्यमातून ते जनतेला वेठीस धरत आहेत.
                  गर्व, अहंकार, अभिमान बाळगणाऱ्या वृत्तीची माणसं इतरांसोबत नेहमीच तुलनात्मक वागत असतात. अशी माणसं भयंकर स्वार्थी असतात..ती माणसं अत्यंत गर्विष्ठ असतात.. ते आपल्या  'मनावर आणि डोक्यावर' अहंकाराचं ओझं घेऊन फिरत असतात. 
            तसा प्रत्येकाच्याच ठायी कमी जास्त प्रमाणात कशाचा ना कशाचा अहंकार असतोच..!
             काही लोकांना स्वतःजवळ असलेल्या संपतीचा अहंकार असतो तर, कुणाला ताकदीचा अहंकार, कुणाला सौंदर्याचा अहंकार, कुणाला गोऱ्या रंगाचा, कुणाला ज्ञानाचा, काहींना चांगल्या गुणवत्तेचा, काहींना प्रतिभेचा, काहींना जातीचा, काहींना धर्माचा, काहींना साहेब असल्याचा. काहींना प्रतिष्ठेचा. काहींना अंगावर असलेल्या दागदागिन्यांचा, काहींना गळ्यातल्या सोनसाखळ्यांचा. काहींना स्वतःच्या कर्तृत्वाचा, काहींना  संततीच्या कर्तृवाचा, कुणाला बिल्डिंगचा.. कुणाला आपल्याकडे सगळ्यात भारी गाडी असल्याचा. कुणाला आपल्याकडे असलेल्या पदाचा. राजकारणातल्या सत्तेचा. काहींना सर्वाेच्च पदाचा. असे अहंकाराचे अगणित प्रकार सांगता येतील ; परंतु मित्रांनो.! या जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही..म्हणजे टिकून राहणारी नाही; म्हणून कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका....निसर्ग हा   तुमचा अहंकार काही सेकंदात संपवून टाकतो. 
                   नुकत्याच झालेल्या तुर्की आणि सिरियाच्या भूकंपाचे उदाहरण घ्या. निसर्गाने केवळ नव्वद सेकंदात हजारो  गगनचुंबी इमारती जमिनदोस्त करून टाकल्या. होत्याचे नव्हते केले...अनेक निर्दोष, निष्पाप जीव गुदमरून मरून पडले...सगळ्याच प्रकारच्या अहंकारी, निरहंकारी लोकांना या निसर्गाने आपली जागा दाखवली. 
                 माणूस हा या जगात पाहुणा आहे, हे विसरू नका. या पाव्हण्याने  कसलाच मोह करू नये. तो अनेक गोष्टींच्या मोहात अडकतोय आणि त्या नश्वर गोष्टींचा अहंकार करू लागतो.
                मला आठवते माझे आजोबा संत कबिरांची आणि संत दुनियादास महाराजांची एकतारीवर भजने म्हणत असत. संत दुनियादास महाराजांच्या एका भजनाचे धृपद माझ्या अजूनही स्मरणात आहे ते असे...

 "बोल गर्वाचा बोलू नको रे उणा |
 दोन दिवसाचा दुनियेत तू पाव्हणा ||

            हा अभंग माणसाला आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे.. की, या दुनियेत आपण दोन दिवसाचे पाव्हणे आहोत हे नेहमी लक्षात ठेवा ! मनातून, डोक्यातून, हृदयातून मीपणा काढून टाका. कुणालाही गर्वाने बोलून दुखवू नका. तुमचा एकही बोल (शब्द) गर्वाने भरलेला, अहंकारमिश्रीत नसावा. कारण "गर्वाचे घर नेहमीच खाली "असते..
              मित्रांनो, आयुष्य खूप छान आहे; परंतु आयुष्य खूप मोठं आहे.. असं कधीच समजू नका. आयुष्याची व्याख्या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी एकाच वाक्यात केलेली आहे. त्या म्हणतात," अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर " हेच तर आहे जीवनाचं खरं तत्वज्ञान. आपण पहिला श्वास घेतो; परंतु दुसरा श्वास घेऊच याची शास्वती नाही...दुसरा श्वास घेण्याअगोदर तो निघून जाऊ शकतो म्हणजे बंद पडू शकतो. म्हणून हा जीव सुद्धा आपला नाही..आपली वाचा कधीही जाऊ शकते..संत तुकाराम महाराज म्हणतात, "आपुलिया बळे | नाही मी बोलत || सखा भगवंत | वाचा त्याची || आपल्या कर्तृवाचा कधीच अहंकार करू नका. सत्तेचा कधीच अहंकार करू नका; कारण सत्ता ही फक्त पाच वर्षासाठीच असते. जनतेसोबत वाईट वागले की, जनता सत्ताधारी लोकांना आपली जागा दाखवून देते.... म्हणतात ना..! "गाव करी ते राव  ना करी" म्हणून कोणतीही सत्ता ही चिरकाल टिकून राहणारी नसते; परंतु आमच्या देशात सत्ता हाती आली की, ती जाणारच नाही अशा भ्रमात राजकारणी लोक वावरत असतात. प्रत्येक घटकाला आणि घटनेला  एक मर्यादा असते हे कुणीच विसरू नये.
        माणूससुद्धा असाच एक प्राणी आहे, तो मरण विसरून जगत असतो. जणू तो अमृत पिऊन आलेला आहे. असे त्याला वाटू लागते. आपण कधीच  मरणार नाही असा अहंकार घेऊन तो इतरांसोबत वाईट वागून खूप मोठी स्वप्ने पाहत असतो. तो ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी सत्ता, संपती जमवत असतो..आणि त्या नश्वर संपतीलाच तो आपले आपले म्हणत असतो; परंतु तो भ्रमात जगत असतो. त्याचा भ्रम फक्त निसर्गच काढून टाकू शकतो .
          नुकत्याच तुर्की आणि सिरियाच्या भूकंपाने हाहाकार केला.. लाखों सजीवांचा जीव घेतला. ही निसर्गाने केलेली भयंकर हानी कधीच भरून न निघणारी आहे.    
           "निसर्ग" हा फार मोठा जादूगार आहे...त्याची किमया अनाकलनीय आहे....परंतु माणूसप्राणी एवढा अहंकारी बनला आहे की, तो निसर्गाला चॅलेंज करू लागला आहे..खरेतर तो याच निसर्गाच्या पंचतत्वापासून निर्माण होतो आणि त्याच पंचतत्वातच विलीन होत असतो..तरीही तो निसर्गालाच आव्हान करू लागलाय.! केवळ त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या, विज्ञानाच्या अहंकारावर.!
             हो, तर मला सांगायचं होतं.. माणूस हा अहंकाराचा बळी आहे.. तो रात्रंदिवस अहंकार घेऊन फिरत असतो...तो रस्त्याने जात असताना त्याला एखादा माणूस भेटला की, त्याला वाटते समोरच्याने अगोदर मला नमस्कार घालावा.. समोरच्यालाही तेच वाटते. दोघांचाही इगो हर्ट होतो आणि ते एकमेकांना न पाहता जवळून निघून जातात. इथूनच दोघात दरी निर्माण होते..आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.
              मोबाईल फोनवर बोलत असतानासुद्धा हाच प्रकार घडत असतो. अगोदर कुणी नमस्कार घालावा..? त्यावेळी कुणा एकाला स्वतःची प्रतिष्ठा मोठी वाटते, तर कुणा एकाला आपल्या वयाचा अहंकार असतो..किंवा धन संपतीचा अहंकार, असतो. दोघेही आपापल्या अहंकारात अडकून पडतात आणि निर्माण होते दरी आणि सुरू होतो विसंवाद आणि द्वेष हा द्वेष कधी  कधी कायमचा टिकून राहतो. मी का अगोदर बोलू..?  अरे बोलना.! काय फरक पडणार आहे..तू अगोदर बोलला तर.!
           असू दे तुझ्याजवळ खूप संपती; परंतु ज्याच्याकडे संपतीच नाही तो निर्धन आहे म्हणून जर त्याला अगोदर बोलला.. तर तू लगेच निर्धन होशील का?  नाही ना होणार.! तरीही त्याचा इगो त्याला संपतीच्या अहंकारातून बाहेर पडू देत नाही. 
          असे वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार माणसाला माणसापासून तोडून टाकतात. नात्यातला विश्वास तोडून टाकतात. मुलांचे आणि आईवडीलांचे असेच जमत नाही. सख्या भावा- बहिणीमध्ये दुरावा निर्माण होतो. मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होतो यातून अनेक प्रकारे नुकसान होत असते..म्हणून मित्रांनो अहंकाराला स्वतःजवळ कधीच थारा देऊ नका.! अहंकार हा आपला शत्रू आहे.
✍️
 डॉ.धोंडोपंत मानवतकर
९ | फेब्रुवारी | २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...