बुधवार, २८ जून, २०२३

सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा..





सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...








सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...

वृतान्त- डॉ.धोंडोपंत मानतकर



          राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंठा तालुक्याच्या सामाजिक न्याय संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी, एक दिवस समाजासाठी' हे घोषवाक्य घेऊन *भव्य एल्गार मोर्चा* चे आयोजन करण्यात आले होते. मंठा तालुक्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार,आदिवासी समाज चाळीस वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनीचे पट्टे १९९१ च्या शासन निर्णयानुसार कसणारांच्या नावे करण्यात यावेत.
       तीन पिढ्यांपासून इथला गायरानधारक माणूस गायरान जमिनीचे पट्टे नावावर करण्यासाठी धरणे धरतोय, मोर्चे, आंदोलने करतोय; परंतु आजपर्यंत या गरीब कष्टकरी गायरान धारकांची कोणत्याच सरकारने दखल घेतलेली नाही, हा तीस वर्षापासून भिजत ठेवलेला गायरान जमीन धारकांचा प्रश्न निकाली काढावा. तो प्रश्न आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने निकाली काढलेला नाही, खरेतर तो मुद्दाम सोडवलेला नाही, म्हणूनच बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी या अनुसुचित जाती-जमातीवर  मुद्दामच जातीवाचक अन्याय होतोय. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे.  हा जातीवाचक अन्याय बंद व्हावा म्हणून आजही अनुसूचित जाती जमातीच्या गरीब लोकांवर धरणे, आंदोलने, मोर्चे करण्याची वेळ येत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे.
           लोकशाही असूनही या देशात मागास जातीवर जर हल्ले करून त्यांचे खून होत असतील तर, हे सरकारसुद्धा अप्रत्यक्षरित्या इथल्या हल्लेखोरांचं आणि जातीयवादाचं समर्थन करतंय का?  असा प्रश्न पडतोय..!
         बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी समाजाला महापुरुषांचे विचार सांगण्याचे या देशात आजही स्वातंत्र्य नाही. आंबेडकरी समाजातील तरूणांचे भरदिवसा खून होत आहेत. अलिकडे नांदेड, लातूर, बीड, मुंबई या ठिकाणी दलितांच्या हत्या झाल्या आहेत, ते हत्याकांड करणारे महाभाग राजरोस फिरत आहेत. त्यांना हे राजकारणी ,सत्ताधारी लोक पाठीशी का घालतात ? 'खून का बदला फाशी' अशी भूमिका सरकारने घ्यावी. अशी भूमिका या मोर्चात मांडण्यात आली.  नांदेड, लातूर, बीड, मुंबई येथील हत्याकांडातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हत्याकांडातील आरोपींच्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाव्यात आणि दलितांवर होणारे अन्याय थांबवावेत. असा रोष सर्व मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
            या 











मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व घोषवाक्यातून सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे ओढले. शासन प्रशासनाच्या रद्दाड कार्यप्रणालीचा खरपूस समाचार घेतला. हा एल्गार मोर्चा मंठा शहरातील राजे छत्रपती संभाजीराजे चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले होते. या सभेत सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यानी पत्रकामध्ये नमूद असलेल्या विषयावर परखडपणे विचार मांडले.  
         गोरगरिब, दलित, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या मिळू नयेत व त्यांनी हालाखीचे जीवन जगत रहावे. इतर समुहाचे त्यांनी गुलाम होऊन रहावे अशी इथल्या जातीयवादी सत्ताधारी लोकांची भूमिका स्पष्ट आहे म्हणून त्यांनी नोकरभरती कंत्राटी पद्धतीने सुरु केली आहे. ती बंद करावी व गोरगरिबांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण दिले जावे.
       अजून या भारतातली गरीबी संपलेली नाही, मात्र इथला गरीब माणूस संपविण्याचा प्रयत्न चालू आहे तो तात्काळ थांबला पाहिजे, खाजगीकरण करणे बंद करावे. नोकऱ्यामधली ही नवीन सुरु केलेली कंत्राटी पद्धती आणि खाजगीकरणाचा खेळ बंद करावा. 
          गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची खेडोपाडी सोय करण्यात यावी, यासाठी सरकारने बंद पाडलेले निवासी केंद्रीय मॉडर्न स्कूल पुन्हा सुरु करून गोरगरिबांच्या छोट्या छोट्या मुलांवर होणारे शैक्षणिक अन्याय थांबवावेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांचा भविष्यात होणारा छळ थांबला पाहिजे.
          रमाई घरकुल योजनेखाली गरीब लोकांना देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे ते वाढत्या महागाईच्या काळात घरकुल बांधकामासाठी पुरेसे नाही, ती रक्कम पाच लाख करण्यात यावी जेणेकरून गोरगरिबांना या योजनांचा खराखुरा लाभ घेता यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करण्यात यावी. गरीबांना देण्यात येणाऱ्या योजनांची केवळ निवडणूकांच्या कालावधीपुरतीच जाहिरातबाजी न होता तिची अखंड अमलबजावणी होऊन गोरगरिबांचे जीवनमान उंचावले पाहिजे. असा सरकारने प्रयत्न करावा. दलित,  अल्पसंख्यांक समाजातील लोकांना सुरक्षा देण्यात यावी. गोरगरिबांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नये. निरपराध दलितांच्या मुलांच्या हत्या, छळ होऊ नये यासाठीं सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे. भारतात गोरगरिब लोकांना न्याय मिळत नसेल, त्यांना सुखाने जगण्याची हमीच नसेल...  तर भारत हा विश्वगुरू होणार असल्याच्या जाहिराती करणे थांबवले पाहिजे





























      या मोर्चात अनेक मुद्यावर भाषणातून रोष व्यक्त करण्यात आला या भाषणातील काही मुद्यांचा सारांश इथे देत आहे.         
          महाराष्ट्रात दलित ,आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले व  क्रूर पद्धतीने खून करण्याच्या घटना सुरू आहेत. उदाहरणार्थ खैरलांजी, खेड, जातेगाव, मुंबई लातूर आणि आता नांदेड...बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का केली ? म्हणून खून करण्यात आला. असे हल्ले करण्याची हिम्मत का होते? आमच्या समाजाबद्दल द्वेश पसरवण्याचे काम काही जातीयवादी संघटना करत आहेत व त्या द्वेषातून आज देशात मॉबलिंचिंग होत आहे. इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या संघटना त्या सरकार पुरस्कृत आहेत. त्या संघटनांनी भिमा कोरेगावची दंगल घडवून आणली. आमच्या समाजावर भीमा कोरेगाव येथे दगडफेक करून शांतता भंग करण्याचे काम केले. त्या घटनांचे सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत व ज्यांनी काहीच केलेले नाही, असे लोक सरकारने जेलमध्ये टाकले...म्हणून सरकारने तरुणाची माथी भडकावयला लावणाऱ्या संघटनावर बंदी घालून त्यांना जेलमध्ये टाकावे तरच देशात व महाराष्ट्रात शांतता निर्माण होईल.
       अनेक वर्षापासून गायरान जमिनी असणारे आमचे समाज बांधव सतत विनंती अर्ज आंदोलन करतात परंतु अधिकारी शासन निर्णय असताना सुद्धा गायरान जमिनी नावाच्या करत नाही हा आमच्या समाजावर होणारा अन्याय असून हा सरकारी जातीवाद आहे, याची नोंद घेऊन सर्व गायरान कसणाऱ्यांच्या नावे करून सातबाराचे वाटप करावे.
          अकोला येथील दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी यांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मौजे पांगरी बुद्रुक तालुका मंठा, जिल्हा जालना येथील गायरान जमीन धारकांचे नावाची करताना गट क्रमांक चुकीचा टाकण्यात आला आहे,तो गटक्रमांक दुरुस्त करून खरा गटक्रमांक सातबारावर टाकण्यात यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करावी, १४ मार्च २०१३ रोजी चा सरकारी नोकरभरती बंद चा शासन निर्णय रद्द करावा. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करावे.  स्वाधारच्या नावाखाली शिष्यवृत्ती बंद करण्याचा छुपा डाव बंद करावा.  समाज कल्याणच्या वस्तीगृहाचे खाजगीकरण बंद करावे. केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेले निवासी केंद्रीय इंग्लिश स्कूल सुरू करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी विहिरीचे अनुदान रोजगार हमीच्या प्रमाणात चार लाखाचे करावे. महाराष्ट्रातील ६० हजाराच्या वर असलेल्या डी.एड. बी.एड. रिक्त जागांची भरती सुरू करावी. नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण रद्द करावे. विविध महामंडळाच्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द करून मागेल त्या तरुण उद्योजकांना अंदाज पत्रकानुसार कर्जाचे वाटप करावे. अत्याचारग्रस्त कुटुंबावर भा.द.वि. कलम ३२५ अंतर्गत खोट्या केसेस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सवर्ण हत्याकांडाचे बळी पडलेल्या कुटुंबांना ५० लाखाची सरकारी मदत देण्यात यावी. अशा अनेक  मागण्या सदरहू मोर्चाच्या होत्या.
         मोर्चाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले, नगरसेवक राजेश खंदारे, कॉम्रेड मारोती खंदारे, कॉम्रेड सरिताताई शर्मा,  कॉम्रेड नंदकिशोर प्रधान, माजी सभापती दत्ता बनसोडे, नगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीनभैय्या राठोड, उपनगराध्यक्ष जे.के.कुरेशी, अचितनाना बोराडे, विकास सूर्यवंशी, पं.स. सदस्य, अरुणराव प्रधान, बाळासाहेब वांजोळकर, कॉम्रेड भगवान कोळे, तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते, भगवान लहाने, वंचितचे सुभाष जाधव, मोहन सदावर्ते, कॉम्रेड सचिन थोरात, सुनील तुरेराव,मा.सभापती  बाळासाहेब अंभिरे, सर्जेराव मगरे, अॅड अनिल मोरे, जिल्हाध्यक्षा असंघटित सौ.सारिका वरणकर, संगिताताई मधुकर मोरे, कासाबाई शिरगुळे, सौ.शीलाताई वाघमारे, शेषाबाई जाधव, सरोदे, शिल्पा बनसोडे, यांच्यासह अनेक महिलांच्या पुढाकारातून हा मोर्चा यशस्वी झाला. मोर्चात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ बापू वटाणे, डॉ.धोंडोपंत मानतकर, वंचितचे भारत उघडे, भीमशक्तीचे  दादाराव हिवाळे, चर्मकार संघटनेचे महादेव वाघमारे. दत्ता वाघमारे, अंबादास घायाळ,  सुरेश कोळे, अॅड सिद्धार्थ अवसरमोल,  सुरेश वाव्हळे, अचितराव खरात, रमेश प्रधान, कय्युमभाई कुरेशी, शगीर पठाण, रावसाहेब खरात, नगरसेवक बाजभाई पठाण, शबाबाभाई कुरेशी, शेख एजाजोद्दीन, ताहेर बागवान,व शरदराव मोरे, अच्युतराव साबळे,  विष्णू अण्णा मोरे, नाना वाघमारे, नामदेव देशमाने, नितीन मोरे, रमेश आवारे, अशोक अवचार, बौद्धाचार्य  महेंद्र टेकुळे, महेंद्र मोरे, सिद्धार्थ मोरे, अतुल खरात, सरपंच प्रताप जाधव, अर्जुन कांबळे,  ,मारोती खनपटे, समाधान शिंदे, गंगा गवळी, सिद्धार्थ देशमाने, धम्मानंद वाघमारे, मारोती कांबळे, प्रसिद्धी प्रमुख महादेव पाखरे, प्रदीप कांबळे, हार्दिक खंदारे, कार्यकर्ते आसाराम चोरमारे, संजय जाधव, विजय चव्हाण, विलास काऊतकर, सुरज प्रधान, प्रभाकर कांबळे, शुभम अंभोरे,  सारनाथ ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, जयभीम सेनेचे तालुकाध्यक्ष उद्धवभाई सरोदे, उपाध्यक्ष भीमराव वाघ, शहराध्यक्ष पिराजी पवळे. व त्यांचे इतर सहकारी यांचा सक्रीय सहभाग होता. 
       तालुक्यातून आलेल्या खेड्यापाड्यातील असंख्य पुरूष व महिलांच्या उपस्थितीने मोर्चाला व्यापक स्वरूप निर्माण झाले होते.
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

२८| जून |२०२३

गुरुवार, २२ जून, २०२३







पडरं पान्या, पडरं पान्या, कर पानी पानी 

शेत माझं लय तहान्हेलं, चातकावानी



          मृग नक्षत्र कोरडं गेलं, रोहिणी,भरणी नक्षत्रंही कोरडी गेली. आषाढ लागून चार दिवस झाले...तरी पावसाचा पत्ता नाही...उन्हाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही.  काळी आई  चैत्र, वैशाख, ज्येष्ठासह आषाढाच्याही उन्हाची तलखी सोसत आहे.  आमच्या लहानपणी आषाढी एकादशीला खूप पाऊस असायचा. पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्या भिजत भिजत, वादळ, वारा पाऊस झेलत पंढरपूरात पोहचायच्या आणि एकादशीनंतर परत फिरायच्या. आता मात्र पाऊससुद्धा जनधनच्या खात्यात पंधरा लाख टाकणार असल्याच्या आश्वासनासारखा वागू लागलाय..!
        सर्वच शेतकऱ्यांनी उन्हातान्हात आपापली शेतं नांगरुन, वखरून काळीशार करून ठेवलीत. काहींनी कापसाच्या नावानं फुल्या काढून ठेवल्यात. काहींनी सोपं वपं नगदी पीकच घेऊया म्हणून सोयाबीनच्या नावानं कास्या,काडी-कचरा वेचून वावर तळहातासारखं करून ठेवलंय. नव्या नवरीने नटून थटून सेज सजवलेल्या पलंगावर जाऊन पतीच्या आगमनाची वाट पहात पहात तिला झोप लागावी...तिच्या नव्या पतीने मित्रांसोबत त्यानेच दिलेल्या लग्नाच्या पार्टीत दारू ढोसून अगदी उशीराने लेझीम खेळत घरात यावे आणि कुठेतरी कान्याकोपऱ्यात विना अंथरूणाचे झोपून जावे... तशीत अवस्था पावसाची वाट पाहण्यात काळ्यामातीची झालेली आहे. ती नटून थटून फक्त पावसाची वाट पहात आहे. पेरणीचा काळ निघून जातोय आणि पाऊस येण्याचा नुसताच बोभाटा ऐकू येतोय...कुठे चक्रीवादळ, तर कुठे मान्सून कोकणात अडकला. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसणार ! ....असा पावसाच्या आगमनाच्या नावानं नुसता बोभाटा ऐकायला मिळतोय..! नव्या नवरीवाणी पावसाची गत झालीय...माझ्या 'ओढाळ सुरांच्या देही' या संग्रहातील काव्यपंक्ती अशा...
                         किती पाहिली मी वाट
                          सांज ढळली रे सारी
                          हुंदक्यात दाटल्या रे
                         आज पावसाच्या सरी

                           तरी नाही तुझं येणं
                           अंगी वणवा पेटला
                          नुसत्याच बोभाट्यानं 
                           जीव उगाच बाटला
हवामान खाते पावसाच्या नावाचा नुसता बोभाटा करत आहे.
पाऊस मात्र अजून किती दिवस येणार नाही, याची काही हमी नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवकाळी पावसाने मे महिन्यातच पावसाळा सुरू केला होता; मात्र आता पेरणीसाठी त्याची गरज आहे, तर तो आभाळाकडे पहायला लावतोय, पेरणीची वेळ निघून गेली आहे तरी तो अजून कसा  पडत नाही. पावसाच्या घोरानं शेतकऱ्यांचा बीपी वाढतोय..!
              आकाशात काळे ढग जरी दिसले तरी... आता लवकरच पाऊस येईल असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात तयार होतोय ; उन्हाच्या तलखीने जीवाची काहिली होतेय.
        काल दुपारी आकाशात ढग जमत होते,स थोड्या वेळाने ऊन चटकत होतं. आषाढ लागूनही अजून पावसाचा पत्ता नाही म्हणून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पाऊस उशिरा का होईना येईलही; परंतु उशिरा आलेल्या पावसाचा पिकांवर अनिष्ट परिणाम होणार. पिकांवर महागामोलाची औषधी खते वापरूनही पिकांचा उतार येणार नाही. खर्च खूप होऊन तो खर्चही निघणार नाही. उशीर झालेल्या खरीपाच्या पिकांची काढणी उशिरा होईल. रब्बीच्या पीकाची वेळेवर पेरणी करता येणार नाही. म्हणजे रब्बीचे पीकही शेतकऱ्यांचा तोटाच करेल की काय ? अशा चिंतातूर शेतकऱ्यांच्या मनाची अवस्था कोणत्याच डॉक्टरांना कळणार नाही...ती शेतकऱ्याच्या मनालाच ठाऊक असेल. त्याच्या मनाची घालमेल ही वरुणराजाबाबतचीच असणार. फक्त पाऊस लवकर यावा ! मनातल्या मनात त्याची अस्मिता असलेल्या ईश्वराला साकडं घालून पावसाला शेतकरी काय काय विनवणी करत असेल.
कवीच्या भाषेत हेच वाक्य त्याच्या तोंडी असेल की...
          
 पड रं पान्या, पड रं पान्या, कर पानी पानी
 शेत माझं लय तहान्हेलं , चातकावानी.....
 
       जून महिना लागून संपतही आला आहे, अजून पेरणी कुठेच नाही, या दिवसात शेतकऱ्यांना आपल्या मुलांला शाळेत टाकण्याचा घोर, शाळेचा ड्रेस घेण्याचा, पाटी दप्तर घेण्याचा घोर, काहींना मुलाची हजारोने फीस भरण्याची काळजी, बी-भरणासाठी, खत औषधीसाठी पैसा उभा करण्याची काळजी, पेरणी करण्यासाठी पुरेसा पाऊस कधी पडेल याची काळजी, अनेक प्रश्नांचं काहूर शेतकऱ्यांच्या डोक्यात थैमान घालू लागतंय, तरी तो ह्या सगळ्या गोष्टी विस्मरणात टाकून किंवा ही भावी काळजी विसरता यावी म्हणून पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतोय. कोसो दूर पायी चालू लागतो. शेतकऱ्यांच्या अंगात अशी सहनशक्ती येतेच कुठून ? असाही प्रश्न पडतो.
          एक बरं झालं पावसाचं येणं न येणं निसर्गाच्या हातात आहे, नाहीतर ते प्रत्येक मतदार संघाच्या आमदार, खासदारांच्या  हातात असतं तर पावसासाठी सुद्धा आमदार खासदारांच्या घरासमोर धरणे ,आंदोलनं करावी लागली असती. "अगोदर आमच्या मतदार संघात पाऊस पाडा. नाहीतर आम्ही निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू." "आमच्या मतदार संघात  पाऊस पाडा, नाहीतर खुर्ची खाली करा." अशा अनेक घोषणांची निर्मिती झाली असती. नेत्यांनी सुद्धा शेतकरी वर्गाला मतदार संघात पाऊस पाडण्यासाठी वेठीस धरलं असतंं...परंतु बरे झाले पावसाची सूत्रे दयाळू निसर्गाने स्वतः कडे ठेवून घेतली.

डॉ.धोंडोपंत मानवतकर
२१ जून २०२३

नको नको सांगू माये...!



आईची आठवण म्हणून ही कविता आईला
समर्पित......






















आईचा सासुरवास आणि तिच्या जिंदगीची तिनेच सांगीतलेली कथा....माझ्या कवितेतून..!🌼

--------------------------------------------------

नको नको सांगू माये..!


नको नको सांगू माये,  तुही करमकहानी
ऐकताना डोळ्यांमधीं, येतं पसाभर पानी


राब-राबली कष्टली,    तुव्हा फाटका संसार
तुव्हं खोटं खोटं भाग्य, दैवाचाही खोटा सार


मायबापाची गरीबी, नाही बोळवण साधी
सासरीही कष्ट केले, नाही धूसफूस कधी


बारा गाड्या गरिबीत, कशी जन्मली तू माय
कसायाच्या घरी जणू, गुणी जन्मली तू गाय


तुह्या बापाची गरिबी, तशी गेली शेवटाला
सासरीही फाटकाचं, तू  गं  संसार थाटला 


कामामधी जलम गेला, तुही सुद् तुला नाही  
जातं, चुलं  नि  वावर , देई  कामाची गवाही


कोंबड्यानं बांग द्यावा, तव्हा तुह्या हाती जातं
नव-याचं तुह्यासंग ,  गाय कसायाचं नातं 


उठे तांबडं फुटता,    तशी बसे जात्यावर
उपाशी न राहे कुणी, तुव्हा जीव नात्यावर


तुह्या मांडीवर डोकं,  मला येई गाढ झोप 
कणी कोंड्याचं दळण, चार पायल्याचं माप


दिसं निघायच्या आधी, बारा घागरी नदीच्या 
तुह्या कष्टामुळं येई, पानी डोळ्यात नदीच्या 


कोसभर गावनदी, तुह्या चोवीस चकरा
रांजणाला येई कीव, माय बळीचा बकरा


गव-याबी थापल्या तू, रोज सारवण केलं
तुह्या सासुबाईच्या तं, कधी मना नाही आलं


मोठी सून मनू मनू, रातं दिन काम केलं
सास-यानं तुह्या तुला, नाही अंतर गं दिलं 


सासू होती कैदासीन, सासरा  तं बापावानी
त्याला ठाऊकच होती, तुह्या जुल्माची कहानी


तुह्या पोटामधीं भूक, आतड्याला पडे पीळ
माय करायची कामं, उपाशी ती  ईळ ईळ 


पाचविला पुंजलेला, तुला कष्टाचा डोंगर 
बापाच्या मागं..मागं, तुवा हाकिला नांगर


चार वरसाचा होतो,  तव्हा कलली सावली 
घास खुंटला मुखात,  मही दुःखात मावली 


जावा पोटामधीं घास, माय तडफडे भारी
पोटाच्याच दुखापायी, नाही मिळाली भाकरी 


माय गरोदर  तरी ,खायी पाथरीची भाजी
खाण्यापिण्याच्या नावानं, करी परपूस आजी


असं कसं भाग्य तुव्हं, किती नशीब फाटकं
संसारात नाही केलं, कधी खोटं तू नाटकं 


तुह्या गळ्यामधी होता, लताबाईचा गोडवा
मह्या कवितेला आला, तुह्या ओवीचा गोडवा


तुह्या नशिबाचे गिर्हे, कसे उलटे फिरले 
तुह्या दैवाचे उखाणे, कसे दुःखाने चोरले


कसं निखरट दैवं, त्याला नाही आली कीव
जलमभर सोसलेल्या, दुखण्यानं गेला जीव 


तुझा मुलगा 

धोंडोपंत मानवतकर, 


रविवार, ४ जून, २०२३

सामाजिक न्याय, संघर्ष कृती समितीची बैठक संपन्न

सामाजिक न्याय, संघर्ष कृती समितीची बैठक संपन्न  
       सामाजिक न्याय व संघर्ष कृती समितीच्या बैठकीत बोलतांना साहित्यिक                       डॉ.धोंडोपंत मानवतकर

मंठा प्रतिनिधी :

       मंठा तालुका सामाजिक न्याय व संघर्ष कृती समितीच्या वतीने बौद्ध, मातंग, आदीवासी समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचारांबाबत तसेच सरकारच्या अन्यायकारक धोरणाबाबत एक व्यापक बैठक ३ जून रोजी मंठा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
         या बैठकीत बौद्ध, मातंग,आदिवासी या समाजावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय,अत्याचाराबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी यांच्यात महत्वपूर्ण चर्चा होऊन वाढलेल्या सामाजिक,  अन्याय, अत्याचाराविरोधात तसेच राज्य व केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात भव्य मोर्चाचे लवकरच आयोजन करण्याबाबतची चर्चा झाली. या बैठकीत अनेक वर्षापासून मागासवर्गीय समाज करत असलेल्या गायरान जमीनचे पट्टे वाहणाराच्या नावे करावेत. या प्रमुख प्रश्नासह १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सरकारी भरती बंदचा निर्णय मागे घ्यावा. सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेले आरक्षण बंद करू नये. स्वाधारच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करू नये. समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या मागासवर्गीय वसतीगृहाचे खाजगीकरण करू नये. एस्.सी प्रवर्गासाठीचे निवासी केंद्रीय मॉडर्न इंग्लिश स्कूल सुरु ठेवावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी विहीरीचे अनुदान कमीतकमी विहीर खोदकामासाठी लागणाऱ्या रोजगार खर्चाच्या दुप्पट तरी देण्यात यावे. महाराष्ट्रात ६० हजाराच्यावर रिक्त असलेल्या डी.एड.,बी.एड्.जागा भरून सुशिक्षित बेकारांना न्याय द्यावा. शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येऊ नये. या व इतर समाजाच्या समस्यांवर दीर्घ चर्चा करण्यात आली. 
         या बैठकीला मा.दत्ताभाऊ बनसोडे, परतूरचे कॉम्रेड- मारोती खंदारे, ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ बापू वटाणे, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, भीमशक्तीचे जि.अ. प्रकाश अण्णा घुले, कामगार युनियनचे कॉम्रेड नंदकिशोर प्रधान, वंचित आघाडीचे सुभाष जाधव, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब वांजोळकर, भारत उघडे, अंबादास खरात सर,भीमराव वाघ, नितीन मोरे, गंगाराम गवळी, अचितराव खरात, एड.सुमेध आवारे, उद्धव सरोदे, महेंद्र टेकुळे,  सुनील तुरेराव, सुशील जाधव, आप्पासाहेब सदावर्ते, ढाकरगे बापू, सचिन थोरात, दिगंबर कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       या बैठकीला तालुक्यातील अनेक महिला व पुरूष कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते.
३ जून २०२३

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...