रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

फुले, शाहू, आंबेडकरी विचारच राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो.

|| मंथनाचे पैलू ||   लेखांक-२७


फुले, शाहू, आंबेडकरी विचारच राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो..


















प्रासंगिक लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर

        देशात सध्या अराजक वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे अविचारी लोकांचा पुढाकार राष्ट्राला खीळखीळ करण्यास कारणीभूत ठरत आहे; परंतु महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधाराच या अराजकतेला आळा घालू शकते. आतापर्यंत फुले, शाहू,आंबेडकरी विचारधाराच या राष्ट्रात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये टिकवून ठेवण्याचं काम करत होती, ती आजही करत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे आणि महत्वाचे ठरले आहे. विद्यमान भारत अनेक प्रश्नांच्या तावडीत सापडलेला आहे. इथल्या धर्मवादी राजकारणानेच अराजकता माजवली आहे. या अराजकतेला आळा घालण्यासाठी आता तरूणांनी पुढाकार घ्यावा. फुले शाहू बाबासाहेब यांचा समतेचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावा.  कारण आज ह्या विचारांची अत्यंत गरज आहे.  इथल्या धर्मवादी राजकारणाने जातीवाद पुन्हा उकरून काढला आहे त्याला गाडण्यासाठी भारतात पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे तरूण तयार झाले पाहिजेत. धर्मवादी सत्तेने बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. म्हणून देशात ह्या धर्मवादी राजकारणाला खीळ घालण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलने केली जात आहेत. स्त्रीयांवर, दलितांवर अन्याय होत आहे.  सर्वधर्मसमभाव मानणारा जातीविहीन समाज पुन्हा निर्माण करण्याची गरज असतांना़ देशातून एकेक सच्चा कार्यकर्ता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, विचारवंत काळाच्या पडद्याआड जात आहेत.  महाराष्ट्रातील फुले, शाहू,विचारांचे सच्चे विचारवंत प्रा.हरी नरके यांचे नुकतेच निधन झाल्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीला खिंडार पडले आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीवर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अनेकांच्या पायाखालची माती सरकली होती......
        आता महाराष्ट्रातील विकृत राजकारणामुळे धर्मवाद, जातीवाद बोकाळला असतांना विचारवंतांची गरज आहे आणि अशा बिकट परिस्थितीत हरि नरके सारख्या विचारवंतांची गरज होती. मुंबई विद्यापीठातल्या शामलताई गरूड आपल्या फेसबुक वाॅलवर त्या लिहितात,"हरिभाऊ ही जाण्याची वेळ नव्हती..! अजूनही खूप खूप प्रश्न चिघळत आहेत.. सांस्कृतिक राजकारण तुंबलेल्या गटारात परावर्तीत झालं आहे. जातीअंताचा लढा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याची वेळ आहे.. अशावेळी तुमचं जाणं खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. हरीभाऊ तुम्ही फुले, शाहू,आंबेडकर यांचा विचार वारसा चिकित्सक पद्धतीने नेटाने सांगत होता.. आयुष्यभर माणूसपणाच्या प्रतिष्ठेसाठी जातिविहीन, वर्गविहीन समाजाच्या एकोप्यासाठी वैचारिक हस्तक्षेप घेऊन उभे राहिलात." श्यामलताईंचे हे म्हणणे रास्त असले तरी या घटनेला कुणीच रोखू शकत नाही..
          पुरोगामी विचारांचा वारसा नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी जणू हरि नरके सरांनी आपल्या खांद्यावरून झटकून टाकून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत... असं वाटत असलं तरी येणाऱ्या पुरोगामी विचारांच्या तरुणावर ही जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी पेलण्याचं व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करावं लागणार आहे. इथल्या जातीयवादी, धर्मवादी राजकारणाला भिऊन चालणार नाही. मूठभरांच्या धर्मांध विचारसरणीला विरोध करण्याची आपली जबाबदारी आहे.. ती नेटाने पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
          प्रा.हरि नरके सरांना महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या या व्यासंगाचा पुरोगामी चळवळीला फायदाच झाला. आरक्षणावर परखड भाष्य करणारे प्रा.हरि नरके सर शैक्षणिक आणि सामाजिक जाण आणि भान देणारे विचारवंत होते. ते आज आपल्यात नाहीत.  त्यांच्या जाण्याने बहुजनांच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रा.हरि नरके हे बहुजनांचा आधार होते. बहुजनांच्या विचारवंतांमध्ये त्यांचा उल्लेख केल्याशिवाय चळवळीला पुढे जाता येणे शक्य नाही.
         प्रा. हरि नरके सरांनी संपादन केलेली ग्रंथसंपदा - महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा,  व   "महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ", ही पुस्तके माझ्या पीएच् डी.च्या प्रबंधासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मला घेता आली. तसेच "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हा ग्रंथ त्यांचा   प्रसिद्ध आहे.  समाज माध्यमावरही ते सक्रीय होते. ते आरक्षण, शिक्षण व समाज या विषयांवर परखड भाष्य करत असायचे. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले होते. प्रा. हरि नरके सर हे महात्मा फुले यांचे विचार बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी  चळवळीची फार मोठी हानी झाली आहे... पुरोगामी महाराष्ट्रातील एका विचारवंताला बहुजन समाज मुकला आहे... कारण जन्म आणि अंत कुणाच्याही हातात नाही.
        ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
        संपायची कधी ही  एकाधिकारशाही ?
ही निसर्गाची एकाधिकारशाही कधीच संपणार नाही
तरीही ते साहित्य रुपाने आपल्यात जीवंतच राहणार आहेत.
          प्रत्येक दुख माझे शाई बनेल जेव्हा
          होतील शब्द सारे साधेसुधे प्रवाही
प्रा. हरि नरके सरांच्या परिवर्तनवादी कार्याला सलाम व 
त्यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली...!🙏
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
११ | ऑगस्ट | २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...