सोमवार, २१ मार्च, २०२२

माझ्या कवितेच्या जन्माची कथा - कवी, लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर

माझ्या कवितेच्या जन्माची कथा-

कवी, लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


          सकाळीच आजोबानं रेडिओ लावला......"प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती..".......
आकाशवाणीचे सूर घुमत होते. दारी सडा सारवण करणार्या सुवासिनींच्या कंकणांचा मंजुळ आवाज....... गाणं  माझ्या कानात  झिरपत होतं........मी अंथरुणातच मौनात गाणं पकडत  होतो........उगाच  ह्या कुशीवरून त्या कुशीवर.......आज तर  रविवार  म्हणून मरगळ घेऊन पडलेला........ मला  शेतात ज्वारीवरची पाखरं हाणायला  पाठवायचं, हे आई-बाबांनी ठरवलेलं. त्यांची  कुजबूज मी  ऐकत होतो.....
         मी शाळेपेक्षा शेतात जायला नेहमीच उत्साही असायचो.....पण, एक पेन, वही अन् मराठीचं पुस्तक घेऊनच..शेत राखायला जायचो.....
अभ्यासापेक्षा  कविता गळ्यावर म्हणायचा भारी नाद......त्या काळी गुरुजी आमच्याकडून खूप पाठांतर करून घ्यायचे......!
          गप्पा रंगल्या की, आजोबा त्यांच्या समवयस्क मित्रांना सांगायचे...."वाजवणं तर आमच्या पाचवीलाच पुंजलेलं "......आणि गाणं म्हणाल  तर रक्तातच. !....आमची  लेकरं झोपेतून उठून सकाळी रडली तरी ती सुरातच रडतात......
        मला आठवतंय त्या दिवशी मी  शेतातल्या बांधांवर  बसून गोफणीनं पाखरं हाणीत होतो......मलाही  वाटायचं आपण एखादं गाणं, कविता रचून पहावी........ज्या  शेतात ज्वारीचं पीक होतं त्याच शेतात भलं मोठं लिंबाचं झाड होतं......मी आपली गोफण...(अर्थात वडिलांनी करून दिलेली ) फिरवून चार - दोन  वेळा ज्वारीवरून चिमण्या हाकारून लावायचो.....गोफण मोठी आणि  माझा जीव  लहान......म्हणून गोफणीतला दगड चिमण्यांच्या दिशेने जायचाच असं काही नव्हतं ....कधी तो पाठीमागेही पडायचा ; पण आवाज मात्र  मोठ्ठा करून  ओरडायचो.....व्हल्या, व्हल्या, व्हल्या, व्हल्या, व्हल्या... गं~~
            माझा  आवाज शांत झाला की, चिमण्यांचा थवा लिंबाच्या झाडावरून पुन्हा कणसांवर......... दिवसभराची हीच परिक्रमा.....
.....त्याच दिवशी  नाकी डोळी छान, रंग  गोरा गोरा पान,...ह्या दादा कोंडके यांच्या गाण्याच्या ओळी पुनः पुन्हा  उगाळायचो.....पुनः पुन्हा  तेच धृपद....आणि  चिमण्यांच्या  थव्याच्या दिशेने एक दगड गोफणीतून.
........चिमण्यांना हाकारणं झालं की,....त्याच गाण्याचं  तेच धृपद......"नाकी डोळी छान" च्या  चालीवरचं  मला  माझंही धृपद सापडलं....."चिमण्या  आल्या हो,आता चिमण्या आल्या हो....आल्यात चिमण्या कणसांवरी, गोफण फिरवू  माथ्यावरी.".....आणि माझ्या कवितेनं जन्म घेतला.......मला आभाळ ठेंगणं झालं.....ते  गोफणीतले छोटे- छोटे गोटे माझ्या  कवितेचे साक्षीदार  होते......
          १९८०-८१ ला सातवीत असतानाच मला माझ्यातली कविता  सापडली.....पण त्या चिमण्यांचा मी जन्मभर  ऋणाईत आहे. त्या...
बांधावरल्या क्षणांचा मी आभारी आहे....त्या क्षणाने आज मी  धन्य झालो.......आईवडीलांनी शेतात पाठवल्यामुळे त्यांचे ऋण तर शब्दांच्या
आणि मौनाच्याही पलिकडले आहेच........
            त्यांच्या ऋणामुळेच आज माझ्याजवळ हजार पाचशे कवितांचं धन आहे......प्रतिथयश कवी म्हणून.. माझे कवी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले....त्या दिवशीचे भूपाळीचे सूर आणि झोपेतून लवकर उठावं म्हणून रागावलेली आई...आजही माझ्या स्मृतीगंधात आहे.....
         शेताचे खरे मालक पशु, पक्षी, प्राणी असतात.......रानातल्या प्रत्येक घटकांवर त्यांचा जन्मजात अधिकार असतो......आपल्या मालकीचा सातबारा कुठल्यातरी जुन्या सुटकेसमध्ये..तर आपले शेत दहाबारा कोसावर ......मी कसतो म्हणून माझी जमीन.....मी ज्वारी पेरू शकतो ; पण...ज्वारीला कणसं नाही आणू शकत..मी आंब्याचे झाड लावू शकतो ; पण आंबे नाही आणू शकत......ही तर  निसर्गाची किमया......फुलांची निर्मिती  फुलपाखरांसाठी, मधमाशांसाठी झालेली आहे.......फुले झाडावरंच छान दिसतात....फुले आणि दगड  (दगडांचे देव) ....ही कल्पना स्वार्थी  वाटते मला.....फुलांना जीव असतो म्हणून त्यांचा  सुगंध दरवळतो.....तो फुलांचा  गुण आहे.......सुगंधामुळे माणूस फुलांजवळ जातो...फुले माणसांकडे येत नाहीत......चांगल्या गुणवान माणसाचेही असेच असते  त्याच्या  गुणाचे कौतुक होते, त्याचे नाही.......त्याच्या कर्तृत्ववाचे गुणगान होते, त्याच्या अस्तित्वाचे नाही....कर्तृत्वानेच  माणसे मोठी  होतात...जातीपातीने किंवा धर्मभेदाने नव्हे....!
            दैनंदिन जीवनात पावलांपावलांवर ऊर्जा देणारी  माणसे भेटतात.....किंबहुना पशु,पक्षी,झाडे,वेली, प्राणी,दगड , गोटे, फळे, फुले,असे अनेक घटक आणि घटना आपले गुरु असतात.....रस्त्यावर ठेच लागली तर आपण खाली आणि पुढे  पाहून चालतो म्हणजे रस्त्यावरचा दुर्लक्षित  दगडही आपला गुरु होतो.......काही घटना आणि घटक माणसांना प्रेरणा देत असतात.....
              झाडं सावली देतात, फळे,फुले देतात. माणसात किंवा पशुपक्ष्यांमध्ये फरक करत नाहीत.. झाडं आणि पाणी यांच्याकडून भेद  न करणे हा चांगला समानतेचा गुण घेतला पाहिजे......या  निसर्गाने सर्वांसाठी सर्वस्व उधळून दिलंय.......काय घ्यायचे ?...आपण ठरविले पाहिजे......उगाच भयमुद्रा करत मिरवू नये.....तुमच्या चेहर्यावर नेहमीच आनंद ओसंडून वाहत राहिला पाहिजे.....आपला चेहरा
आनंदी पाहून आपल्याला पाहणाराही आनंदी व्हावा..!
         " प्रार्थना करत असाल तर," सगळ्यांचं भलं कर..!" ही वैश्विक प्रार्थना करा., त्या प्रार्थनेतून तुम्हीही सुटणार नाहीत, तुमचंही भलं होईल....पुजा करत असाल तर मानवतेची करा....भक्ती करणार असाल तर आईवडीलांची करा.....चांगले काही करणार असाल तर धाडस करा.
" नो  स्टिअरींग विदाऊट डेअरिंग " अपघात होऊ नये म्हणूनच शिकत असतो...धाडस तर करा, यश तुमची वाट पहात आहे."

डॉ.धोंडोपंत मानवतकर

सकाळ "गुडमाॅर्निंग" सदर
चित्र - गुगलवरून साभार.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...