सोमवार, ३० जानेवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर













....बाकी सगळं अलबेल आहे !"

       भारतीय माणसाला सोहळे प्रिय आहेत... तो नेहमीच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी (स्मृतीदिन) त्याच बरोबर नवस, कंदुरी, भंडारे, वाढदिवस आणि वर्षभरात येणारे सगळेच पारंपरिक सण साजरे करतो.. तेही अगदी आनंदाने....! परंतु ह्या सगळ्याच सोहळ्यांचं तो स्वतःला कधीच आऊटपुट मागत नाही...! 
      अलिकडे सोहळ्यांना चांगले दिवस आले आहेत. आम्हां सगळ्यांना सोहळे प्रिय वाटू लागले आहेत. आम्ही सोहळ्यांना अतिरिक्त महत्व देऊ लागलो आहोत....परंतु सोहळा का करायचा ? कशासाठी करायचा ? की,केवळ भूतकालीन इतिहासाचा  जागर करायचा..! की, नुसत्या भूतकालीन स्मृती जागृत ठेवायच्या..? की, भूतकालीन घटनांना नुसता उजाळा द्यायचा..? की, या कार्यक्रमातून, सोहळ्यातून काही आदर्श घ्यायचा,? की काही प्रेरणा घ्यायची ? की, यातून काटेकोरपणे काही आचरण करायला शिकायचे.? याबाबत आमच्याकडे काहीच उद्देश नसतो. म्हणजे "वाळूत मुतलं फेस ना पाणी" सारं निर्रथक.
        मला वाटतं या सर्व घटना, कार्यक्रम, उपक्रम, शाळेतील प्रतिज्ञा, प्रार्थना किंवा समाजात चाललेले कीर्तन, प्रवचन, सप्ताह किंवा शासनाद्वारे निघणारे उपक्रमाचे आदेश.. हे नुसते सोहळे होऊ लागले आहेत ते केवळ सोहळे न होता त्यांचे काटेकोरपणे पालन आणि आचरण व्हावे..!
      शालेय विद्यार्थ्यांकडून गेल्या सत्तर वर्षापासून दररोज राष्ट्रगीत, प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते....लहानपणी शाळेत दररोज आमच्याकडूनही राष्ट्रगीताचा दर्जा असलेलं एक प्रसिद्ध गीत वदवून घेत असत...*'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा "* कवी पुढे लिहितो *"मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* लाहोरचे कवी मुहम्मद इकबाल यांनी हे गीत १९०५ साली लिहिलं होतं. तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांना भारतातील अनेक जातीजातीत, धर्माधर्मात सलोखा,भाईचारा आहे, हे दाखवण्यासाठी हे गीत
लिहिलं होतं...एक मुस्लीम शायर म्हणतो," *मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* आणि आम्ही सत्तेसाठी हिंदुमुस्लीम दंगली घडवून आणतो... जातीजातीत भांडणे लावतो....निवडून येण्यासाठी भावाभावात भांडणे लावतो आणि आमची पोरं पोरी दररोज प्रतिज्ञेत म्हणतात, " *सारे भारतीय माझे बांधव आहेत.* किती कमालीचा विरोधाभास आहे हा. म्हणजे प्रतिज्ञा केवळ तोंडपाठ करण्यापूरतीच असते का ?  की तिचे आचरणही करायला पाहिजे. प्रियजनहो तुम्हीच ठरवा...आम्ही एकमेकांना भाऊ का समजत नाहीत..? आम्ही जातीचा धर्माचा, प्रतिष्ठेचा अहंकार घेऊन का भांडत राहतो..? अलिकडे तर जातीयवाद बोकाळला आहे तो स्पृश्य - अस्पृश्य असा नसून रुपांतरीत झाल्याचे दिसून येत आहे...महाराष्ट्रातील अनेक संतांनी जातीभेदांवर, अंधश्रद्धेवर लोकांच्या खोटारडेपणावर, अभंग व भारुडे रचली आहेत.. ती आम्हाला तोंडपाठसुद्धा आहेत; परंतु आम्ही त्यातील तत्वज्ञान आचरणात आणत नाही.
       इथे प्रत्येक समाज आपापल्या धर्माचे सोहळे करत आहे; मात्र ते फक्त सोहळेच होताहेत...आचरण मात्र शून्य आहे...
      दरवर्षी 'मराठी भाषा दिन' व 'मराठी भाषा पंधरवाडा' साजरा केला जातो; कार्यक्रमाला दहाबारा लोक उपस्थित असतात. माझ्यासारख्या मानधन न घेणाऱ्या गावातल्याच प्रमुख वक्त्याला बोलावून एक हार आणि त्याचं पंधरा मिनिटाचं भाषण असतं.. मी सांगत असतो, *"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी* 
 *खरेच धन्य जाहलो ऐकतो मराठी* पुढे मी सांगत असतो," मराठी लँग्वेज ही आपली मदरटंग आहे. मराठी लँग्वेजवर अनेक लँग्वेजने आपल्या मराठी लँग्वेजवर आक्रमण केलेलं आहे, आपल्याला ते हाणून पाडावे लागेल..! (टाळ्या ) माझ्या पंधरा मिनिटाच्या भाषणात हिंदी, इंग्रजीचे पाचपन्नास शब्द आलेले असतात यावर कुणीच काही बोलत नाही; कारण मी असतो गावातलाच विनामानधन वक्ता...म्हणून तेही काही बोलत नाहीत...शेवटी चहापाण्यावर कार्यक्रमाची सांगता होते....बस्स. झाला मराठी भाषा दिन साजरा...  अर्थात ही सुद्धा एक प्रासंगिक औपचारिकताच असते..  परंतु मराठी भाषेविषयी चिंतनशील चिकित्सक अशी चर्चा होत नाही...चर्चा होते ती शहरांची नावे बदलण्यावर....तो असतो सत्ताकारणाचा भाग, सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न... चर्चेत राहण्याचा..मुद्दा..!
          देशातले राज्यकर्तेसुद्धा श्रेय घेण्यासाठी अनेक कार्यक्रमाची उद्घाटने करतात; काम मात्र करत नाहीत...एक सत्त्य उदाहरण असे की, आम्ही गेल्या एप्रिलमध्ये एका आमदारांना वाचनालयाच्या उद्घाटनासाठी बोलावले त्यांनी तिथेच त्याप्रसंगी वाचनालयाला सहालाख रुपये देतो म्हणून जाहीर केले.. आज वर्ष होत आहे...अजून कृती नाही... दुसऱ्या एका प्रसिद्ध व्यक्तीने पंचवीस वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी अकरा हजार रुपये देतो म्हणून भरसभेत जाहीर केले होते. तो बिचारा कोरोनामधी मरण पावला; परंतु त्याचे आश्वासन आम्ही विसरलो नाही... आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा असंच आहे ह्यांच्या आश्वासनासारखं.....प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येऊन पडल्यासारखं...!
     पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला आम्हाला फक्त सगळीकडे स्वातंत्र्यदिनाचे भरगच्च कार्यक्रम दिसतात, ज्याची महिन्याभरापासून ,वाजवण्याची पीटीची, कवायतीची रंगीत तालीम सुरु असते... अनेक राज्यकर्तेही लिहून दिलेल्या आपापल्या सकारात्मक भाषणाचा सराव करत असतात
.....आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ऐकू येतात सगळीकडे स्वातंत्र्याचे गाणे, शहीदांची करुणरसातली कवने,
भाषणांची रेलचेल, सगळीकडे तिरंगा फडफडतांना...!  जल्लोष होताना..! जयजयकार होताना...!
        सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या धर्मनिरपेक्षतावादी आमच्या देशात लोकशाही स्वातंत्र्याचा जयघोष करतो आहोत, सोहळे करतो आहोत..मात्र लोकशाही अजून भारतातील दुर्बलांच्या, कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या झोपडीत शिरलेली नाही, की..शिरू दिली नाही..यावर आपण खुशाल चिंतन करू शकता..! लोकशाहीच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या मूल्यांचा फक्त भास होतोय..! जाहिरातींचे बळी ठरलेल्या भारतीय माणसाला फक्त  राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही...बाकी सगळं अलबेल आहे.
✍️
 डॉ.धोंडोपंत मानवतकर
लेखक- सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे अभ्यासक आहेत.

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर


































 मोठं जग आहे. त्या उपेक्षितांच्या जगाकडे आपण नेहमीच कानाडोळा करत आलो आहोत. जणू आपल्याला त्या घटकाशी काही  देणंघेणं नाही, अशा अविर्भावात आपण वावरत असतो. उपेक्षितांची वेदना, त्यांचे जटिल होऊन बसलेले मूलभूत प्रश्न आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष हा "जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे.!"
     २६ जानेवारी जवळ येतीय.. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष चालू होईल....उघड्या नागड्या आदिवासींच्या, पाल ठोकून राहणाऱ्या उपेक्षितांच्या मनात पुन्हा स्वातंत्र्याचे, मानवी हक्कांचे, जगण्याचे, संघर्षाचे.. प्रश्न मनातल्या मनात घोळू लागतील आणि लगेच विरघळूनही जातील बर्फासारसे..!
             औरंगाबादसारख्याच अनेक शहराच्या उड्डाण पुलाखाली ह्या निराधार उपेक्षितांचा भातुकलीचा संसार मांडलेला असतो. त्यांच्याकडे बघितले की, वाटते या उपेक्षितांपर्यंत १९४७ च्या स्वातंत्र्याची वार्ता अजून गेलीच नाही की काय..? आणि ज्या पुलाखाली त्यांनी संसार मांडलाय त्याच उड्डाण पुलाला नाव दिलेलं आहे "स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल"  पुलाखाली बाजुलाच पुतळा होऊन हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब हे या उपेक्षितांचा भातुकलीचा संसार पहात उभे आहेत, कित्येक वर्षापासून..! त्यांनाही वाटत असेल, हल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी या बेघर असणाऱ्या पुलाखालच्या माणसांना आधुनिक जगाच्या प्रवाहात आणलं पाहिजे.. परंतु.. छे.!  ते निवडणूकीच्या मतदानासाठी बाहेर देशातून विमानाने खर्च करून आणतील ;परंतु अशा उपेक्षितांना आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात आणणार नाहीत. 
         सिडको कॉर्नरला सिग्नलजवळ
येणाऱ्या जाणाऱ्या मोटार गाड्यांच्या गर्दीतून पादचारी कसाबसा रस्ता काढत पुढे पुढ जात असतो...हे पुलाखालचं उपेक्षितांचं जग या चंगळवादी उद्विग्न जगाकडे टुकूटुकू बघत आपल्या संसाराचा एकेक दिवस ढकलत असते उपाशी-तापाशी.
      काही वंचित,पीडित, निराधार कुटुंब हे शहरातील अडगळीत पडलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपमध्येही आपला संसार थटवतात. त्यांना ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीच पर्वा नसते...काही कुटुंबाचा संसार तर रस्त्याच्या कडेला उघड्यावर उभा केलेला असतो. तिथे सुरू असतो  त्यांचा लहान मुलांना क्रिकेटच्या बॅट करून विकण्याचा पोटभरु धंदा....वास्तविक पाहता क्रिकेटच्या जगाचा आणि त्यांचा काहीच संबंध नसतो....एकाला एक बॅट तयार करुन विकल्यावर पाच-पंचवीस रुपये कमवून देते, तर तीच बॅट क्रिकेटपटूंना कोटी रुपये कमवून देते...पंचवीस रुपये आणि कोट्यावधी रुपये यामध्ये कमालीची तफावत असते... मग "सबका साथ सबका विकास" कसा शक्य असेल..?
      उड्डाण पुलाखाली राहणाऱ्यांनी कसा आणि कुठे लावावा "हर घर तिरंगा?"
 ज्या उपेक्षितांना घरकुलाची गरज आहे त्यांना कसे मिळतील घरकुलं.. त्यांच्याजवळ घरकुलासाठी लागणारे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि रहिवाशी प्रमाणपत्रच नसते...कारण पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबाला गावच नसते...जिथं भरला दरा, तोच गाव खरा" जिथं पोट भरेल तिथेच रहायचं.. कायमचे बस्तान कुठेच नसेल तर कुठून मिळणार त्यांना रहिवासी प्रमाणपत्र..? कुठून मिळणार आधार कार्ड..? जर कोणतेच दाखले मिळणार नसतील तर....पुलाखाली व  पालावर राहणारा माणूस या देशाचा नागरिक गणला जाईल का? तो जर एखाद्या राज्याचा नागरिकच नसेल तर तो भारतीय नागरिक म्हणून मुख्य प्रवाहात कसा येईल..? त्याचे मूलभूत हक्काचे प्रश्न कसे सुटतील.? त्याला कोणत्या कोर्टात न्याय मिळेल ? 
      "सबका साथ सबका विकास"च्या  योजनेत पुलाखालच्या माणसांचे कधी येतील अच्छे दिन..?"
     पाच सहा वर्षापूर्वी "काला पैसा लायेंगे, "अच्छे दिन आयेंगे" चा बोलबाला सुरू होता..नंतर "अच्छे दिन"ची तरुण मुले खिल्ली उडवू लागले...एका खेड्यातल्या चाळीत पत्राच्या पडक्या घरात राहणाऱ्या एका निराधार म्हातारीला ही दोनचार टवाळखोर मुले तिच्या घराजवळ जाऊन पुन: पुन्हा चिडवत म्हणायची "आच्छे दिन कधी येनार हे " ती म्हणायची "जाय ना भाड्या.!" हा व्हिडिओच खूप व्हायरल झाला होता... त्या म्हातारीच्या त्या बोलण्यावर ती मुले फिदी फिदी हसायची आणि पुन्हा तेच तेच वाक्य बोलून म्हातारीची शिवी खायचे. मला वाटतं ती शिवी त्या मुलांना लागत नसावी...असो. लागो कोणालाही..! मला वाटतंय तिला माहित होतं की काय, कोण जाणे..अच्छे दिन वगैरे काही नसतं... ती एक अंधश्रद्धा असते म्हणून.! 
       उपेक्षितांच्या जगाची ओळख करून घेणाऱ्या माणसांना असते त्यांची सहानुभूती आणि त्यांच्या विद्रूप जीवनाची अनुभूती...
            एके दिवशी सकाळीच भारत बाजारमधून ए.पी.आय.कॉर्नरजवळून फिरण्यासाठी पूर्वेला निघालो. काही अंतरावर नर्सरीचे दुकान, त्याच्या अलिकडे देवाच्या मूर्ती तयार करून विकणाराची मेनकापडाची खोपी. त्या खोपीसमोर अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या. त्यावर खूप धूळ साचलेली. अनेक वेळा बघितल्या तरी त्या जेवढ्याला तेवढ्याच दिसत असायच्या. म्हणजे त्या विकत होत्या किंवा नाही याबाबत तर मला शंकाच येत असायची. 
      खरेतर ते एक कलावंत, उत्कृष्ट शिल्पकार असूनही कित्येक वर्षापासून रस्त्याच्या कडेला खोपीसमोर मूर्ती तयार करून ठेवतात आणि ग्राहकांची वाट पाहत बसतात..हे वाट्याला आलेलं  दैन्य, दारिद्र्य हे त्या बिचाऱ्या मूर्त्या कशा संपवणार ? हे त्या कलाकाराला माहितच असते; कारण जाणून बुजून दगडाच्या मूर्त्याच त्या.!  कसला चमत्कार नि कसलं काय..? देवमूर्त्या विकल्या तरच चार पैसे मिळणार नि पोटाची खळगी भरणार..! नाहीतर दैन्य, दारिद्र्य आहेच पाचवीला पुजलेलं..!  
    बरे उपेक्षितांची ही दयनीय अवस्था सरकारच्या लक्षात का येऊ नये? अशा कलावंतांची दखल घेऊन त्यांच्या कलेला योग्य जागा, योग्य मानधन देऊन त्यांचं पुनर्वसन का करण्यात येऊ नये ? 
      क्रिकेट प्लेअर तयार होतील, राजकारणी तयार होतील, नट,नट्यां तयार होतील ;परंतु कलावंतांना कला ही निसर्गत:च मिळालेली देणगी असते. कलावंत हा देशाची सांस्कृतिक ओळख असतो.. म्हणून शासनाने शास्त्रज्ञ, कवी, लेखक, चित्रकार, विचारवंत, कलावंत, शिल्पकार यांची हेळसांड न करता देता त्यांना जपले पाहिजे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे. हे सरकारचे आद्यकर्तव्यच आहे.!
एका म्हाताऱ्याने तर सरकारचा उद्धारच केला.
      परवा पुणे गाडीतून उतरताना एका वयस्कर म्हाताऱ्याला मदत केली...आणि उतरल्यावर म्हणालो, "बाबा आता दबलंचोपलं घरीच राह्यलं पाहिजे." "आरं बाबू गाडी फुकटाची हाय मून पोरानं पाठीलं नातीकडं "  म्हातारं खोकलंत खोकलंत बोललं. मी लगेच म्हणालो,"बाबा आता पुढच्या महिन्यात लॉकडाऊन लागणार हे, जास्त गावं फिरू नका." माझं बोलणं संपायच्या आतच म्हाताऱ्याने तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडली नि म्हणालं,"हे सरकार आजून करुना आन्तय का काय रे बाबू..?"
       मला वाटलं मी जर हो म्हटलं तर म्हातारं  सरकारला पुन्हा एखादी शिवी देईल म्हणून मी लगेच म्हणालो,"येतो बाबा." आणि पेपर घेऊन घराकडे निघालो..! 
     अलिकडं असं वाटू लागलं की, आपलं लिहिण्या, बोलण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलंय की,काय ? एवढं सेन्सेटीव्ह वातावरण होऊन बसलंय. राजकारणातल्या कोणत्या   माणसाच्या बाजुने बोलावं अन् कोणत्या माणसाच्या बाजुने बोलू नये ? 
मोठा पेच निर्माण झालाय.!
चला,..हेही दिवस निघून जातील..!
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

____________________________________________________
लेखक - सामाजिक, साहित्यिक,सांस्कृतिक
चळवळीचे अभ्यासक आहेत.

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर

उपेक्षितांचं जग..."








लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


            मित्रांनो..! आपल्या अवतीभवती उपेक्षितांचं फार मोठं जग आहे.त्या उपेक्षितांच्या जगाकडे आपण नेहमीच कानाडोळा करत आलो आहोत. जणू आपल्याला त्या घटकाशी काही  देणंघेणं नाही, अशा अविर्भावात आपण वावरत असतो. उपेक्षितांची वेदना, त्यांचे जटिल होऊन बसलेले मूलभूत प्रश्न आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष हा "जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे.!"
     २६ जानेवारी जवळ येतीय.. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष चालू होईल....उघड्या नागड्या आदिवासींच्या, पाल ठोकून राहणाऱ्या उपेक्षितांच्या मनात पुन्हा स्वातंत्र्याचे, मानवी हक्कांचे, जगण्याचे, संघर्षाचे.. प्रश्न मनातल्या मनात घोळू लागतील आणि लगेच विरघळूनही जातील बर्फासारसे..!
             औरंगाबादसारख्याच अनेक शहराच्या उड्डाण पुलाखाली ह्या निराधार उपेक्षितांचा भातुकलीचा संसार मांडलेला असतो. त्यांच्याकडे बघितले की, वाटते या उपेक्षितांपर्यंत १९४७ च्या स्वातंत्र्याची वार्ता अजून गेलीच नाही की काय..? आणि ज्या पुलाखाली त्यांनी संसार मांडलाय त्याच उड्डाण पुलाला नाव दिलेलं आहे "स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल"  पुलाखाली बाजुलाच पुतळा होऊन हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब हे या उपेक्षितांचा भातुकलीचा संसार पहात उभे आहेत, कित्येक वर्षापासून..! त्यांनाही वाटत असेल, हल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी या बेघर असणाऱ्या पुलाखालच्या माणसांना आधुनिक जगाच्या प्रवाहात आणलं पाहिजे.. परंतु.. छे.!  ते निवडणूकीच्या मतदानासाठी बाहेर देशातून विमानाने खर्च करून आणतील ;परंतु अशा उपेक्षितांना आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात आणणार नाहीत. 
         सिडको कॉर्नरला सिग्नलजवळ
येणाऱ्या जाणाऱ्या मोटार गाड्यांच्या गर्दीतून पादचारी कसाबसा रस्ता काढत पुढे पुढ जात असतो...हे पुलाखालचं उपेक्षितांचं जग या चंगळवादी उद्विग्न जगाकडे टुकूटुकू बघत आपल्या संसाराचा एकेक दिवस ढकलत असते उपाशी-तापाशी.
      काही वंचित,पीडित, निराधार कुटुंब हे शहरातील अडगळीत पडलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपमध्येही आपला संसार थटवतात. त्यांना ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीच पर्वा नसते...काही कुटुंबाचा संसार तर रस्त्याच्या कडेला उघड्यावर उभा केलेला असतो. तिथे सुरू असतो  त्यांचा लहान मुलांना क्रिकेटच्या बॅट करून विकण्याचा पोटभरु धंदा....वास्तविक पाहता क्रिकेटच्या जगाचा आणि त्यांचा काहीच संबंध नसतो....एकाला एक बॅट तयार करुन विकल्यावर पाच-पंचवीस रुपये कमवून देते, तर तीच बॅट क्रिकेटपटूंना कोटी रुपये कमवून देते...पंचवीस रुपये आणि कोट्यावधी रुपये यामध्ये कमालीची तफावत असते... मग "सबका साथ सबका विकास" कसा शक्य असेल..?
      उड्डाण पुलाखाली राहणाऱ्यांनी कसा आणि कुठे लावावा "हर घर तिरंगा?"
 ज्या उपेक्षितांना घरकुलाची गरज आहे त्यांना कसे मिळतील घरकुलं.. त्यांच्याजवळ घरकुलासाठी लागणारे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि रहिवाशी प्रमाणपत्रच नसते...कारण पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबाला गावच नसते...जिथं भरला दरा, तोच गाव खरा" जिथं पोट भरेल तिथेच रहायचं.. कायमचे बस्तान कुठेच नसेल तर कुठून मिळणार त्यांना रहिवासी प्रमाणपत्र..? कुठून मिळणार आधार कार्ड..? जर कोणतेच दाखले मिळणार नसतील तर....पुलाखाली व  पालावर राहणारा माणूस या देशाचा नागरिक गणला जाईल का? तो जर एखाद्या राज्याचा नागरिकच नसेल तर तो भारतीय नागरिक म्हणून मुख्य प्रवाहात कसा येईल..? त्याचे मूलभूत हक्काचे प्रश्न कसे सुटतील.? त्याला कोणत्या कोर्टात न्याय मिळेल ? 
      "सबका साथ सबका विकास"च्या  योजनेत पुलाखालच्या माणसांचे कधी येतील अच्छे दिन..?"
     पाच सहा वर्षापूर्वी "काला पैसा लायेंगे, "अच्छे दिन आयेंगे" चा बोलबाला सुरू होता..नंतर "अच्छे दिन"ची तरुण मुले खिल्ली उडवू लागले...एका खेड्यातल्या चाळीत पत्राच्या पडक्या घरात राहणाऱ्या एका निराधार म्हातारीला ही दोनचार टवाळखोर मुले तिच्या घराजवळ जाऊन पुन: पुन्हा चिडवत म्हणायची "आच्छे दिन कधी येनार हे " ती म्हणायची "जाय ना भाड्या.!" हा व्हिडिओच खूप व्हायरल झाला होता... त्या म्हातारीच्या त्या बोलण्यावर ती मुले फिदी फिदी हसायची आणि पुन्हा तेच तेच वाक्य बोलून म्हातारीची शिवी खायचे. मला वाटतं ती शिवी त्या मुलांना लागत नसावी...असो. लागो कोणालाही..! मला वाटतंय तिला माहित होतं की काय, कोण जाणे..अच्छे दिन वगैरे काही नसतं... ती एक अंधश्रद्धा असते म्हणून.! 
       उपेक्षितांच्या जगाची ओळख करून घेणाऱ्या माणसांना असते त्यांची सहानुभूती आणि त्यांच्या विद्रूप जीवनाची अनुभूती...
            एके दिवशी सकाळीच भारत बाजारमधून ए.पी.आय.कॉर्नरजवळून फिरण्यासाठी पूर्वेला निघालो. काही अंतरावर नर्सरीचे दुकान, त्याच्या अलिकडे देवाच्या मूर्ती तयार करून विकणाराची मेनकापडाची खोपी. त्या खोपीसमोर अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या. त्यावर खूप धूळ साचलेली. अनेक वेळा बघितल्या तरी त्या जेवढ्याला तेवढ्याच दिसत असायच्या. म्हणजे त्या विकत होत्या किंवा नाही याबाबत तर मला शंकाच येत असायची. 
      खरेतर ते एक कलावंत, उत्कृष्ट शिल्पकार असूनही कित्येक वर्षापासून रस्त्याच्या कडेला खोपीसमोर मूर्ती तयार करून ठेवतात आणि ग्राहकांची वाट पाहत बसतात..हे वाट्याला आलेलं  दैन्य, दारिद्र्य हे त्या बिचाऱ्या मूर्त्या कशा संपवणार ? हे त्या कलाकाराला माहितच असते; कारण जाणून बुजून दगडाच्या मूर्त्याच त्या.!  कसला चमत्कार नि कसलं काय..? देवमूर्त्या विकल्या तरच चार पैसे मिळणार नि पोटाची खळगी भरणार..! नाहीतर दैन्य, दारिद्र्य आहेच पाचवीला पुजलेलं..!  
    बरे उपेक्षितांची ही दयनीय अवस्था सरकारच्या लक्षात का येऊ नये? अशा कलावंतांची दखल घेऊन त्यांच्या कलेला योग्य जागा, योग्य मानधन देऊन त्यांचं पुनर्वसन का करण्यात येऊ नये ? 
      क्रिकेट प्लेअर तयार होतील, राजकारणी तयार होतील, नट,नट्यां तयार होतील ;परंतु कलावंतांना कला ही निसर्गत:च मिळालेली देणगी असते. कलावंत हा देशाची सांस्कृतिक ओळख असतो.. म्हणून शासनाने शास्त्रज्ञ, कवी, लेखक, चित्रकार, विचारवंत, कलावंत, शिल्पकार यांची हेळसांड न करता देता त्यांना जपले पाहिजे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे. हे सरकारचे आद्यकर्तव्यच आहे.!
एका म्हाताऱ्याने तर सरकारचा उद्धारच केला.
      परवा पुणे गाडीतून उतरताना एका वयस्कर म्हाताऱ्याला मदत केली...आणि उतरल्यावर म्हणालो, "बाबा आता दबलंचोपलं घरीच राह्यलं पाहिजे." "आरं बाबू गाडी फुकटाची हाय मून पोरानं पाठीलं नातीकडं "  म्हातारं खोकलंत खोकलंत बोललं. मी लगेच म्हणालो,"बाबा आता पुढच्या महिन्यात लॉकडाऊन लागणार हे, जास्त गावं फिरू नका." माझं बोलणं संपायच्या आतच म्हाताऱ्याने तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडली नि म्हणालं,"हे सरकार आजून करुना आन्तय का काय रे बाबू..?"
       मला वाटलं मी जर हो म्हटलं तर म्हातारं  सरकारला पुन्हा एखादी शिवी देईल म्हणून मी लगेच म्हणालो,"येतो बाबा." आणि पेपर घेऊन घराकडे निघालो..! 
     अलिकडं असं वाटू लागलं की, आपलं लिहिण्या, बोलण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलंय की,काय ? एवढं सेन्सेटीव्ह वातावरण होऊन बसलंय. राजकारणातल्या कोणत्या   माणसाच्या बाजुने बोलावं अन् कोणत्या माणसाच्या बाजुने बोलू नये ? 
मोठा पेच निर्माण झालाय.!
चला,..हेही दिवस निघून जातील..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
लेखक - सामाजिक, साहित्यिक,सांस्कृतिक
चळवळीचे अभ्यासक आहेत.
१९ जानेवारी २०२३

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

|| गनीम || पुस्तक परीक्षण -डॉ.धोंडोपंत मानवतकर

भेदाधिष्ठित शोषणाचे षड्यंत्र उजागर करणारा कवितासंग्रह - गनीम


-----------------------------------------------------------------------
'गनीम' हा कवी डॉ.उत्तम अंभोरे यांचा तिसरा कवितासंग्रह होय..! या संग्रहापूर्वी त्यांचे 'धगीवरची अक्षरं' व 'पत्ता बदलत जाणारा गनीम' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 
        'गनीम' हे या संग्रहाचे अत्यंत सूचक असे नामाभिधान असून एकूण कवितांचा मथितार्थ या शीर्षकातच दडलेला आहे. शोषणाची विविध रूपे उलगडताना असे सिद्ध होते की,  विषमतावादाच्या मुळाशी अनाकलनीय, अदृश्य आणि अनभिज्ञ अशी विकृत स्वरुपाची व्यवस्था आहे, जी इथल्या सकल याती बांधवांना पारंपारिक शोषणाच्या जोखडातून  सुटू देत नाही. 
        अदृश्य रूपाने शोषण करणारा 'गनीम' आपले स्वरुप बदलत जातो. त्याची ती कूटनीती सोशिकांच्या लक्षात येत नाही, तो आपले काम अगदी रंग,रुप,आकार, बदलून साळसूदपणे करत राहतो. 
        पारंपारिक धर्मकारणाची जी विषमताधिष्ठित वर्णशृंखला आहे तिच्यावरच आधारित वर्गशृंखला आहे. जी प्रत्येक जात समुहाला आपापल्या समुहातून बाहेर पडू देत नाही. दैन्य, दारिद्र्य, जातीभेद टिकून कसे राहतील यासाठी हा 'गनीम' विविध रुपे धारण करत असतो. कविला या गनीमाच्या अनेक रुपांचं झालेलं आकलन आणि संशोधन प्रस्तुत संग्रहात प्रकर्षाने नोंदवलेलं आहे ; मात्र असं आकलन वंचित,पीडित,अज्ञानी, दरिद्री समुहाला झालेलं नाही. किंबहुना ते उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषितांनाही  झालेलं नाही, इतकेच नव्हे; तर या समुहातील स्वार्थी पुढाऱ्यांनासुद्धा झालेलं नाही. याचे कारण यातील काही समुह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच कष्टत असतो, तर काही समुह फक्त आपल्या स्वार्थीपणाच्या गर्तेतून बाहेर पडत नाही. 
        कविने स्वतःच्या संशोधनातून गनिमाची ओळख पटवून घेतलेली आहे. त्याच गनीमाची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि समग्र समाज या अदृश्य, बहुरुपी गनीमापासून सावध व्हावा. हाच एक उद्देश कवीच्या काव्यनिर्मितीच्यामागे दिसून येतो.
       समाजव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पनांचा कार्यकारणभाव आणि वर्चस्वासाठी वर्णवादाची व वर्गवादाची संकल्पना निर्माण करणारा व ती शतकानुशतके टिकवून ठेवणारा मार्ग म्हणजे देव, धर्म, दैव, कर्मकांड होय !
    उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ आदी भेदाभेदांची ही जी निर्मिती आहे... ती एका विशिष्ट समुहाचे श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यासाठीची आहे. म्हणून एका समुहाची श्रीमंती व श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यासाठी इतर समुहात भेदाभेद उभे करण्याचे विकृत षडयंत्र चालूच असते. जो तो समुह आपापल्या समुहात राहून जातीयद्वेषात निरंतर कसा अडकून पडेल व त्यातून एकाच समुहाचे श्रेष्ठत्व कसे अबाधित राहील ही अनभिज्ञ खेळी कैक शतकांपासून सुरू आहे. या खेळीच्या विषारी षडयंत्राचे वेगवेगळे पैलू आहेत. त्या पैलूंची सहज उकल होत नाही; म्हणून कवीने त्या पैलूंना 'गनीम' असे नाव दिले आहे; कारण त्या पैलूंचा दीन दुबळ्यांचे, गरीब वंचितांचे शोषण करण्यासाठी व भेदाभेद टिकवून ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे वापर केला जात असतो. 
     सर्वसामान्य जनतेला शोषणाचे प्रकार कळत नाहीत.. किंवा ज्यांना ज्यांना कळाले आहेत त्यांनी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला त्यांच्या आयुष्यात काटेपेरणी केली गेली. काहींना साम, दाम, दंड, भेद नीती वापरून कसे संपवता येईल किंवा कसे झुलवत ठेवता येईल याबाबतही हा 'गनीम' सतर्क असतो. तो आपले अस्तित्व, आपले ठिकाण आणि आयुधं कोणती आहेत हे कळू देत नाही. म्हणूनच कवी आपल्या कवितेतून 'गनीमाची अगोचर अपरुपे आणि त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सांगण्याचा प्रयत्न करतात...

"आताही शत्रूंच्या छावण्यांची 
पुराणी ठिकाणं तीच ती समजून
पाडून घेताहोत आपल्याच पायावर
दगड
आपण फक्त भावनिक शब्दहल्लकल्लोळात नि
शत्रू आपणास लोळवून जातो.

कवी आपल्या शत्रूंच्या अनेकांगी मनसुब्यांना जाणतो. विचारवंतांना, प्रतिभावंतांना, संशोधकांना शत्रूच्या अदृश्य गनीमाचा शोध घेता येतो; मात्र सामान्य माणसाला या अनाकलनीय षडयंत्राच्या 'गनीमाचा कधीच सुगावा लागत नाही.
     खरेतर कवी हा एक फिलॉसॉफर असतो.तो नेहमीच चिंतनाच्या मुळाशी जात असतो. त्यातही आंबेडकरवादी कवी हा व्यवस्थेच्या षडयंत्राचे वेळोवेळी विच्छेदन करत असतो; किंबहुना तो भविष्यकाळाचा भाष्यकार असतो; म्हणूनच हा षडयंत्रकारी 'गनीम' वेळोवेळी उध्वस्त करत असलेल्या पिढ्यांची व उद्याच्या पिढीच्या अंकुरांची कविला चिंता वाटते.. 

"आपण गर्क..भूतकालीन संघर्षाचे
अर्क काढून काढून चघळण्यात नि
शत्रू आपल्याच घोषणेसह...
आपल्या अंकुरांनाही उध्वस्त करीत
जातो पुढे पुढे..!
म्हणून कवी लिहितो....

"आता थोडं सावध व्हायलाच  हवं
पाठीशी उभं असणाऱ्यावर  नि
पाठीवरून हात फिरवणाऱ्यावरही शंका घ्यायला हवी."
कवीच्या शंकेला कारणही तसंच आहे 
"शत्रू शुगरकोटेड असतो नि
आपली फसगत होते."

कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी आपल्या कवितेतून नव्या पिढिला सामाजिकभान आणि जाण यावी यासाठी शत्रूच्या अनेक रुपाची ओळख करून देत सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.. नव्हे त्यांच्याठायी समाजाप्रती असलेली तळमळ व अस्मिता त्यांना अस्वस्थ करते आणि कविता जन्म घेते...
ते आपल्या 'हवालदिल' या कवितेत लिहितात....

"त्यांचे सारेच आंडू-पांडू  संत नि
संस्कृतीचे मोहक आलेख
आपल्याला वरचेवर सरपटत ठेवतात". 
याच कवितेत कविला हेही सांगावयाचे आहे की,
"माफक बंडखोरांचे आता त्यांना
तसे काहीच नसते सोयरसुतक..!"
 
       षडयंत्रकारी व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारे काही बंडखोर त्यांच्या गळाला लागणारेही असतात म्हणून कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी बंडखोरांबाबत माफक हा शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे. शोषकांच्या डावपेचांची जाणीव आणि बंडखोर बांधवांच्या कमजोर नाड्यांची सतावणारी चिंता याच घुसमटीतून या कवितेचा जन्म झालेला आहे.
      विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विकृतीकरणातून होत असलेल्या सामाजिक छळांचे आणि शोषणाचे अनेक संदर्भ उजागर करताना कवी आपल्या 'समरसता' या कवितेतून गनिमाच्या स्वरूपाचे दर्शन घडवतात....
"त्यांचं समरसनं
वाळवीच्या स्पर्शासारखं
पोखरत जाऊनही
सतत मातीचे वंशज भासविण्याचं
मातीच्या मुलाम्याखाली वावरण्याचं
आता त्या एकिकरणातही 
सतत पराभूततेचाच इतिहास,
आपला नुस्ता ऱ्हास ऱ्हास.
'समरसता' एक निमित्त
बाकी तेच ते
पुराणसुक्त !"

हे संदर्भ उजागर करण्याचा कवीचा उद्देश हाच की, प्रस्थापितांनी आता पारंपारिक मिथकांद्वारे, दंतकथांद्वारे या भाबड्या जनतेला देवाधर्मात आणि कर्मकांडात अडकवू नयेच शिवाय भेदाभेदांच्या चौकटी उभ्या करू नयेत.   डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता  समाजाला शहाणे करून सतर्क राहण्याचा सल्ला देते. ही कविता 'गनीमाचे नकळत स्वरुप सांगतांना गनिमाच्या गळाला लागलेल्या फितूर लोकांमुळे पुढच्या पिढीचे किती नुकसान झाले हेही सांगावयाचे टाळत नाही. समाजातील काही कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी. फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारांशी केलेली प्रतारणाही ही कविता आवर्जून नोंदवते.
    कवी डॉ.उत्तम अंभोरे आपल्या मनोगतात म्हणतात,"कविता हा अतिशय गांभिर्याने घेण्याचा विषय आहे" ते शतप्रतिशत खरेही आहे; कारण विद्रोही काव्याची निर्मितीच असत्याचा पर्दाफाश करण्यासाठी झालेली आहे.
      बाबासाहेबांनी व त्यांच्या समकालीन निष्ठावंतांनी समतेसाठी व्यवस्थेशी केलेला विद्रोह अलिकडचे कार्यकर्ते का विसरलेत..? की, त्यांची केलेली दिशाभूल त्यांच्या लक्षात येत नाही... म्हणून कवी लिहितात,..

"विद्रोहाची माय रडते ढसाढसा नि
विद्रोहाशी नाळ जोडून
अस्मितेचे मळे फुलविणारे
तळ्याच्या फिरतात काठाकाठानं
त्यांचं विद्रोहाचं शस्त्र हरवलंय कुठं  नि
पाण्याच्या बुडबुड्यासंगं त्यांचं प्रेम.'

        कवी डॉ.उत्तम अंभोरे यांचे सामाजिक निरिक्षण अत्यंत सूक्ष्म आणि चिकित्सक आहे.
      सामाजिक अस्मितेचा आव आणत तळ्याच्या काठकाठाने फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे विद्रोहाचे शस्त्र तळ्याच्या बुडाशी हरवलंय आणि त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यासंगं कार्यकर्त्यांचे प्रेम. अत्यंत चपखलपणे मारलेला टोमणा सामाजिक भान आणून देणारा आहे.
     कारण एखाद्या कुत्र्याला जरी दगड फेकून मारला तर तो दगडाला चावत नाही, तर दगड ज्या दिशेने आला आहे त्या दिशेच्या माणसाचा शोध घेऊन त्यालाच चावतो; परंतु आमच्या बंडखोरांचा विद्रोह नेमका कशाप्रकारे आणि का? डायव्हर्ट होतोय याची कारणंही ते आपल्या 'प्रगती' या कवितेतून उलगडून दाखवतात ...

 "सारा सुशिक्षितपणा..
आर्थिक सुरक्षिततेच्या कवचाखाली
प्रसिद्धीची दोन गोगलगायी शिंगं घेऊन 
लाचारीत सरपटत जाणारा अन्
उगाच रस्ता उजाडत गेल्याचं समाधान मानून धन्यता पावणारा !
बंडाचे झेंडे रोवण्याचं स्वप्नं
कधीतरी जोपासलं होतं...या
सुशिक्षितपणाच्या मातीत; पण
सारेच सांड आंडं ठेचून घेण्यासाठी
उत्सुक असल्याची वास्तवता...'
     उपरोक्त कविता विद्यमान पिढिला परखडपणे सुनावते की,"तुमच्या कुचकामी, लाचार सुशिक्षितपणाचे खापर तुम्ही अशिक्षित पिढीवर फोडणार असाल तर तुम्ही तुमच्याच लाचार मेंदूच्या शाईने लिहिताहेत तुमच्या मृत्यूचे जाहीरनामे."
     डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता समकालीन पिढीच्या अस्वाभिमानी, लाचार, बेईमानी, फितुर वृत्तीवर परखडपणे भाष्य करते किंबहुना ती अत्यंत तळमळीने प्रबोधनाचे काम करत भविष्यकाळाचाही वेध घेते.
     कविची समाजाप्रती असलेली अस्मिता, अस्मितेपोटी असलेली सामाजिक जाणीव, जाणिवेत असणारी संवेदनशीलता आणि त्याच संवेदनशीलतेतून निर्माण होणारी अस्वस्थता..ही कवीची अदृश्य वेदनाच आहे आणि ही वेदना कविला स्वस्थ बसू देत नाही. ती नोंदवायला भाग पाडते..मग ती कविता असो की, विचार. 
    साहित्याचे माध्यम कोणतेही असो, ग्रामीण असो, दलित असो, स्रीवादी असो, जनवादी असो, आदिवासी असो. सर्व स्तरावरून या शोषणाचा विरोध झाला पाहिजे; कारण एकाच समुहाचे शोषण होत नसून दलित, पीडित, वंचित, दुर्बल, कष्टकरी अशा अनेक घटकांची दिशाभूल करत शोषण केले जाते आणि ह्या सर्व घटकांचा शोषणकर्ता 'गनीम' मात्र एकच आहे. परंतु हा 'गनीम' सतर्क आणि संवेदनशील असणाऱ्या आंबेडकरवादी समुहावर प्रामुख्याने लक्ष ठेऊन असतो. या समुहाला जेव्हा ह्या गनीमाचा शोध लागत असतो तेव्हा त्या समुहाची दिशाभूल करण्याची रुपे बदलली जातात...अशी अपरुपे तो निर्माण करत असतो.
     अडीच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची मोडतोड करून आपली संस्कृती बहुजनांच्या माथी मारण्यात आली ती केवळ आंबेडकरवादी समुहालाच माहित आहे...म्हणून गनिमाचे लक्ष आंबेडकरी चळवळीकडे असते.
   बुद्धकालातील गणव्यवस्थेचे रुपांतर वर्णव्यवस्थेत करणारी व त्याचेच रुपांतर जातीप्रथेत करणारी व्यवस्थाच
शोषणाचा 'गनीम' ठरलेली आहे. ह्या धर्मवादी, कर्मकांडी, शोषणकर्त्या समुहासोबत चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर ह्या महामानवांनी जो विद्रोह केला होता, तो विद्रोह अजूनही करावा लागतो आहे. वास्तविक पहाता त्यांनी केलेला हा विद्रोह समता, बंधुता व मानवी हक्कांसाठीचा होता. तो मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठीचा होता, तो विद्रोह आजही आहे. मानवतावादासाठीचा हा विद्रोह  इतका टोकदार होऊनही इथली शोषणव्यवस्था आपली पकड सैल न होऊ देता वेगवेगळ्या मनसुब्यांद्वारे घट्ट टिकवून ठेवते.
           आजच्या पिढीचे अनेक कवी, लेखक, विचारवंत आपापल्या परिने मानवमुक्तीच्या विचारांचा प्रचार,प्रसार करत आहेत; मात्र विज्ञानयुगातही व्यवस्थेशी तडजोडीचे राजकारण करून परंपरांचा मूलतत्त्ववाद टिकवून ठेवण्यासाठी आमच्याच बांधवांकडून परिवर्तनावादाचा खून केला जातोय.! ही बाब आमच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याचवेळी आमच्या ओठांवर विद्रोहाच्या गाण्याऐवजी असतात..
"स्वातंत्र्याची गाणी
हम होंगे कामयाब,
किंवा 
क्रिकेटचे स्कोअर, 
किंवा
चित्रपट नट्यांचे गोडवे.
काळ्या चित्रफितीतून होतात रुपांतरीत... ढंगदार रंगसंगतीत नि
पठारापल्याडचे डोंगर झरे आटून
चालल्याचीही नसते खबर;
शहाणपणाची झूल पांघरून
दिसांधळ्यांच्या ते आडोसगावात."
विद्रोहाची माय रडते ढसाढसा नि
बाप जसाच्या तसा उभा..
डोळे पांघरून आकाश कवेत
घेण्यास सज्ज.
     या देशात लोकशाहीची घटनामूल्ये मुद्दामच न रुजू देण्यात व छळ करण्यात मूलगामी शोषण व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.. तो अगदी गावापासून ते राजधानीपर्यंत..
" हे माझ्या प्रिय गावा
तू तर सतत नाडतच नेलं
तोंड दाबून दिला बुक्यांचा मार
मनातही नाही जिंकायचं येऊ दिलं /७७

" हे माझ्या प्रिय गावा
तू माझ्या आया-बहिणींनांही
माणूस म्हणून कधी पाहिलेच नाही.
त्यांना म्हणाला..
आई-माई-बाई नावापुरता,
गायीला म्हणाला माय, पण..
यांच्या गळ्याचं दावं सोडलं नाही.

      " नाही रे" वर्गाला कमालीची वाईट वागणूक देण्याचे कारस्थान केले गेले.. आज त्याचे स्वरुप फक्त रुपांतरीत झाले आहे. वागणूक तीच आहे, विषमता तीच आहे. ती टिकवून ठेवणारे ठेकेदार आता अधिकच सतर्क राहून आपल्या कुटनीतीचा रंग बदलत असतात..."नाही रे" वर्गाचे बंड आणि बंडखोरीही अशीच उध्वस्त केली जाते.

"नाही रे' वर्गाची बंडखोरी मुद्देसूद भाषणांचे बॉम्बगोळे
सारं काही शांतपणे ऐकून
डूख धरून बसलेल्या जनावरासारखे
'आहे रे' वर्गाने एकदाच आक्रमण केले
मार्क्स, हेगेल, फुले, आंबेडकर, लाल, काळे, निळे निशान...
लोकशाही वगैरे
सारेच जमीनदोस्त झाले" 
 
कवी डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता "नाही रे" वर्गाच्या बंडाचे मनसुबे कसे हाणून पाडले जातात ते विद्रोही बंडखोरांच्या लक्षात आणून देण्याचे काम ही कविता करते.. इतकेच नव्हे,तर ती आंबेडकरी अनुयायींच्या काही चुकांनाही उजागर करताना दिसते. 

"काल
आपल्या घरी
निळा सूर्य
उगवल्याच्या गाथा
ओठाओठांवर,
गाथांना
कथनाचं एक रूप
कथांच्या दंतकथाच
आपण करीत जातो
आपलीही करतो
तोंडपूजा
अन् जमल्यास
पुतळ्याच्या सावलीत
विसावून जातो."
      
कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी आंबेडकरी अनुयायींच्या बऱ्याच गोष्टी कळत नकळत लक्षात आणून दिलेल्या आहेत. कारण कवी स्वतः आंबेडकरवादी विचारधारेशी एकनिष्ठ आहेत.. नव्हे; तो 
त्यांचा सत्यशोधकी, प्रामाणिक व स्वाभिमानी पिंड आहे. म्हणून समाजास्मितेपोटी त्यांना ह्या कवितेतून जे काही सांगावयाचे आहे ते निर्भयपणे व अधिकारवाणीने नोंदवलेलं आहे.
     दलित ही संकल्पना समस्त वंचित, पीडित,दुर्बल घटकांसाठी व परंपरेने बहिष्कृत केलेल्या समुहासाठी आलेली आहे. त्यांच्या व्यथा वेदनांना उजागर करणारं साहित्य हे दलित या संकल्पनेभोवती फिरत असले तरी ते मानवीमूल्यांच्या हक्कासाठी लिहिलेलं   साहित्य होय. म्हणून दलित साहित्य या संकल्पनेकडे मानवतावादासाठीचा विचार मांडणारे साहित्य या अर्थाने पाहणेच योग्य होईल. आंबेडकरवादी साहित्य हे कुठल्याही एका समुहाची पाठराखण करत नाही, तर ते मानवमुक्तीच्या संवैधानिक मूल्यांचे हक्क सांगणारे साहित्य आहे..कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या पानापानांवर मानवीमूल्यांचा आणि मानवमुक्तीचा जाहीरनामाच लिहून ठेवलेला आहे. संविधानच इथल्या समग्र वंचित, पीडितांच्या, दुर्बलांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडू शकते.ती ताकद फक्त  डॉ.आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या संवैधानिक विचारात आहे म्हणूनच आंबेडकरवादी विचारधारा किंवा आंबेडकरवादी साहित्य हे मानवी हक्कासाठीचा अधिकार मागणारे साहित्य असते..म्हणून ते साहित्य मानवतावादीच साहित्य ठरते.
    डॉ.उत्तम अंभोरे यांची 'गनीम' मधील कविता पारंपारिक विषमतावादी मूल्यांना नाकारते म्हणूनच ती प्रस्थापितांच्या शोषणाच्या  पैलूंचा पर्दाफाश करते..अर्थात या कवितेला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समतावाद हवा आहे.. जो बुद्ध,कबीर,फुले,मार्क्स, आंबेडकर या महामानवांना अपेक्षित होता..शोषितांच्या शोषणाच्या व छळांच्या अनेक क्लृप्त्या ती ऐकून घेण्याचा व सांगण्याचा अट्टाहास बंद केला पाहिजे म्हणून कवी त्वेषाने म्हणतात,...

"नेहमी नेहमी
त्याच त्याच गोष्टी 
सांगण्याची नि ऐकण्याची
सवयच झालीये आपल्याला...
आता आपले कान कापले पाहिजेत नि
सांगणाराचे तोंड फोडले पाहिजे.

     डॉ.उत्तम अंभोरे यांच्या कवितेने मराठी कवितेचे वैचारिकविश्व  अधिकच व्यापक करून मराठी कवितेला नवा आयाम दिला आहे.
कारण डॉ.अंभोरे यांची कविता आक्रस्ताळेपणा करत नाही तर ती आता अनुभूतीच्या पातळीवर चिकित्सक आणि चिंतनशील होत  जाऊन ती आत्मशोध घेते. आत्मचिंतनातून आलेल्या या कवितेला वर्तमानातल्या भासमान जगाची ओळख झाल्यामुळे ती शोषणाच्या मूळगाभ्याचा शोध घेते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तात्विक विचारात सत्याचा शोध होता.सत्यासाठी लढण्याची धमक होती. बाबासाहेबांच्या विचारांचे सत्व आणि तत्व या कवितेने स्वीकारले आहे म्हणून ती इथल्या विषमतावादी मूल्यांना थेट नाकारते व भेदाधिष्ठित शोषणाचे षडयंत्र उजागर करत विकृत मनसुबे हाणून पाडण्याचे धाडस करते म्हणूनच दलित कवितेने, साहित्याने मराठी कवितेत,साहित्यात मोलाची भर घालून एक नवा आयाम, नवा प्रवाह दिल्यामुळे मराठी साहित्यविश्वाच्या समीक्षेला खरेतर हे आव्हानच ठरले आहे.
   डॉ.उत्तम अंभोरे यांच्या गनीम' या  संग्रहातील काही कविता सहज अर्थाला जन्म देणाऱ्या आहेत. कवितेतील उपमान आणि उपमेये ही उपहासगर्भ असले तरी ती  आशयछटांच्या कल्लोळात अडकत नाहीत किंवा दुर्बोध होतांना दिसत नाही. 'गनीम'मधील काव्यात येणाऱ्या 'प्रतिमा, प्रतिके वाचकांच्या चिंतनाची व्याप्ती वृद्धिंगत करणारी आहेत. मुक्तछंदात लिहिलेल्या दलितकाव्यात आपली स्वतंत्र धाटणीची सौंदर्यस्थळे आहेत; परंतु या धाटणीच्या सौंदर्यस्थळामागे कमालीची वेदना प्रश्नांकित झालेली दिसून येते...डॉ.उत्तम अंभोरे यांच्या कवितेने समाजातील गाफील समूहाला सावध करण्याचा वसा घेतला आहे. तिने विषम व्यवस्थेच्या कुठल्याही घटकावर बॉम्ब फेकण्यापेक्षा चिंतनाच्या मुळाशी जाऊन गनीमाची चिकित्सा केली आहे; म्हणून ती आपले वेगळेपण सिद्ध करते. ती कबीर, फुले,मार्क्स, बाबासाहेब यांच्या विचारांची वारसदार असून चिंतन आणि चिकित्सा हा तिचा स्थायीभाव आहे. विद्रोही कवी अर्जुन डांगळे यांच्या प्रस्तावनेने संग्रहाला उंची लाभली आहे. सौरव प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दर्जेदार संग्रहाचे सूचक,वेधक मुखपृष्ठ चित्रकार दासू भगत यांचे असून डॉ.उत्तम अंभोरे यांच्या चिंतनशील काव्याचा आकृतीबंध मराठी दलितकाव्यसृष्टीला नवा आयाम देणारा आहे.
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

गनीम - काव्यसंग्रह
कवी-  उत्तम अंभोरे
प्रकाशक - सौरव प्रकाशन,औरंगाबाद
स्वागतमूल्य - ₹ ३००

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर - एक तत्वदर्शी ज्ञानवृक्ष




ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर - एक तत्त्वदर्शी ज्ञानवृक्ष

लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


   
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीतील अनेक संताचे कार्य बहुमोलाचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पर्यायाने देशाच्या जडणघडणीत मराठवाड्यातील संतांचा फार मोठा वाटा आहे. आपण म्हणाल, “महाराष्ट्राचे नाव पुढे करण्याऐवजी आपण मराठवाड्याचे नाव पुढे करीत आहात. होय, त्याचे कारणही तेवढेच गूढ आणि महत्त्वाचे आहे. गूढ असे की, आपला मराठवाडा हा पूर्वीचा महाराष्ट्र होता. त्याचे सप्रमाण पुरावे देता येतात. प्रा. प्रल्हाद लुलेकर व डॉ. सतीश बडवे संपादीत 'मराठवाड्यातील साहित्य या ग्रंथात प्रा.लुलेकर लिहितात, “अशोकाच्या आलेखात सर्वप्रथम देशनामे ( देशांची नावे ) आढळतात. प्राचीन साधनात प्रतिष्ठानचा (पैठण) उल्लेख महाराष्ट्राची राजधानी म्हणून करण्यात आला आहे. यावरूनच आजचा मराठवाडा हा मूळचा महाराष्ट्र होय !
   वारकरी संप्रदायाची पायाभरणी करणारे संत ज्ञानेश्वर हे पैठण तालुक्यातील आपेगावचे. संत एकनाथ हे पैठणचे. 'विवेकसिंधू'चे रचनाकार आद्यकवी मुकुंदराज हे अंबाजोगाईचे. महाकवी भास्कर भट्ट बोरीकर हे परभणी जिल्ह्यातील बोरीचे. आद्यकवयित्री महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगावच्या. संत जनाबाई परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील होत्या. संत विठोबा खेचर औंढा नागनाथचे. संत दासगणू हे नांदेडचे. संत नामदेव हे परभणी जवळच्या नरसीचे. संत गोरोबा कुंभार हे उस्मानाबादचे. मराठवाड्यातील अशा अनेक संतांची नावे अभिमानाने सांगता येतील ज्यांची जन्मभूमी व कर्मभूमी ही मराठवाडाच आहे.
    अकराव्या शतकात कृष्ण रामदेवराय यादव काळात विधी, यज्ञ, पूजा, मंत्र-तंत्र, होम-हवन, जादूटोणा, या श्रद्धांनी उच्छाद मांडला होता.  मुले-मुली होण्याकरिता दगडाच्या देवांना नवस सायास करणे, अंगारे धुपारे, उतारे-पातारे अशा अनेक थोतांडाच्या गर्तेत बुडून समाज रसातळाला जात असताना या अराजकतेवर सामाजिक विकृतीवर, दगडाच्या देवावर, व्यंगावर, संतांनी अभंग, ओव्या, भारुडे लिहून तर काही संतांनी कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्या विरोधात लेखन करून सामाजिक संतुलन राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संत नामदेव महाराजांनी भारतभ्रमण करत भारतीय समाजव्यवस्थेतील सामान्य जनतेच्या मागासलेल्या मनाचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अधिकतर समाज दगडाचीच पुजा करतो आणि त्यालाच ईश्वर मानतो. म्हणून संत नामदेव महाराज लिहितात...

"नामदेव कहे | सुनो रे धगडा ||
 आत्म देव पुजौ |न पुजौ दगडा || किंवा 
" देव दाखविल ऐसा नाही गुरू ।
 जेथे जाय तेथे दगड शेंदरू ||

त्याकाळी संतांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी भक्ती संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची निर्मिती केली  आणि त्याद्वारे या त्या संप्रदायांनी सामाजिक विकृतीवर ओरखडे ओढून समाजप्रबोधन केले.
     आजही मराठवाड्यातील अनेक गावामध्ये खरे संत, खरे प्रबोधनकार आहेत. काही होऊन गेले आहेत. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातही असे अनेक संत होऊन गेले आहेत.. त्यात संत रामगिरी बाबा, संत दुनियादास महाराज, संत देविदास महाराज, संत बाबाराव महाराज किर्लेकर या संतांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशा विवेकवादी संतांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांची स्मृती जागविण्यासाठी त्यांच्या कारकिर्दीचा जागर व्हावा, अशाच एका तत्त्वचिंतक संताचा गौरवग्रंथ काढण्यासाठी काही मंडळींनी पुढाकार घेतला आहे त्या ग्रंथासाठी लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
      जालना जिल्ह्यातील, मंठा तालुक्यातील "किर्ला" या गावात एक संत होऊन गेले. ते म्हणजे गुरुवर्य ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर. ते वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक, वेदाभ्यासी, प्रबोधनकार, तत्वचिंतक, कीर्तनकार, प्रवचनकार होते. त्यांच्या विचार व कार्यावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.
    ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आपला शिष्यवर्ग तयार केला होता. या शिष्यवर्गाच्या माध्यमातून कीर्तन व प्रवचनांचे कार्यक्रम घडत होते. अनेक गावात संप्रदायाची प्रबोधनकारी चळवळ उभी केली होती. पारंपारिक भाकडकथांमधून अनुयायांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. अशा थोर विभुतीच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करतो. आमचे स्नेही श्री.भागवतराव काकडे सर हे महाराजांच्या विचार व कार्यावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करीत आहेत. कोणत्याही कार्यासाठी, कुणाला तरी पुढाकार घेण्याची गरज असते. त्याशिवाय ते कार्य पुढे जात नाही. या गौरवग्रंथाच्या निमित्ताने महाराजांच्या सानिध्यात अनेक अनुयायी घडले. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा सुंदर योग आहे. ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांच्या सानिध्यातून त्यांच्या तात्त्विक चिंतनातील बारकावे मला अनुभवता आले. त्यांच्या प्रवचनातून मिळालेली तत्त्वचिंतनाची शिदोरी माझ्या आकलनक्षमतेतून प्रस्तुत लेखनप्रपंचाद्वारे मांडत आहे.
      ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांचा मला सन २००४ पासून सहवास लाभला आहे. मंठा येथील एम.एस.ई.बी.च्या प्रांगणात आयोजित केलेल्या प्रवचनातून त्यांचे विचार ऐकण्याचा योग मला आला होता. त्या प्रवचनातून त्यांच्या विचारांची तात्त्विक बैठक मला अनुभवता आली.
      साधारणपणे नेहमीच महाराजांचा पोशाख पांढरी शुभ्र टोपी, पांढरा खमीस, पांढरे धोतर. भाळावर गंध, गळ्यात ठोकर मण्यांची तुळसीमाळ, अत्यंत साधी राहणी हे त्यांचे व्यक्तिविशेष. मात्र त्यांचा अध्यात्माचा अभ्यास गाढा होता. मंठ्यातील कार्यक्रमात श्री.घोरबांड साहेब, श्री. संपत अण्णा गोरे, श्री.विवेक सोनटक्के यांच्या मैत्रीमुळे मी प्रवचनाचा लाभार्थी झालो. तसेच महाराजांच्या अनेक कार्यक्रमाला मी उपस्थित असायचो. या प्रवचनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजांवर प्रेम करणारी अनेक शिष्य मंडळी जोडली गेली होती. त्या मित्रमंडळींनी महाराजांना माझी, प्रा. प्रदीप देशमुख आणि कवी विवेक सोनटक्के आम्हां तिघांची साहित्यिक म्हणून ओळख करून दिली होती. त्यानंतर आम्ही महाराजांच्या विचारांचे भोक्ते झालो. का झालो? कारण वारकरी संप्रदायात काही प्रमाणात आंधळी भक्ती असते. ती विचारधारा महाराजांच्या प्रवचनात दिसून आली नाही. तर 'डोळस श्रद्धा' हा त्यांच्या प्रवचनाचा मूलभूत गाभा होता.
     द्वैत आणि अद्वैत विचारांवरही ते बराच वेळ बोलून अद्वैताच्या बाजूने रसिक श्रोत्यांची संमती घेत असायचे. अद्वैत म्हणजे एकेश्वरवाद. देव ही कल्पना समजून उमजून स्वीकारण्याची असते. ती सहज स्वीकारण्याची नसते. याविषयी महाराज अनेक उदाहरणे देत असायचे. यावरून महाराज एकेश्वरवादी होते असे ठामपणे सांगता येते.
      महाराजांची एक चांगली शैली होती. ते बऱ्याच गोष्टींचा श्रोत्यांकडून खुलासा करवून घेत असायचे. या अनुषंगाने अधूनमधून विनोद करून श्रोत्यांना खूप हसवायचे. महाराजांचा प्रामाणिक हेतू हा की, अनुयायी कर्मकांडाच्या बाहेर पडले पाहिजेत. म्हणून महाराजांनी कीर्तनापेक्षाही जास्त प्रवचनाला (पाठाला) महत्त्व दिले होते. कारण कीर्तनातून असे चिंतनशील विषय मांडणे अवघड असतात म्हणून त्यांच्यामध्ये प्रवचनातूनच खरोखर परिवर्तन होऊ शकते. भक्तांना किंवा रसिकांना अशाच प्रवचनाच्या माध्यमातून विचार देता येतात.
       प्रवचनातूनच मोक्ष-मोक्ष म्हणत भरकटलेल्या वृत्तीला नेमका विचार देता येतो. असे महाराजांनी एके दिवशी मंठा येथील बसस्टॉपवर झालेल्या भेटीत एका तासाच्या चर्चेतून सांगितले होते.
    आमचे मित्र विवेक सोनटक्के यांनी मला सांगितले की, महाराज 'ओशों'च्या विचारांचे अभ्यासक आहेत. म्हणून मी एके दिवशी महाराजांना प्रश्न विचारला. " महाराज मी 'ओशो' ची तर काही तरुण सागर महाराजांची पुस्तके वाचतो. ओशोबद्दल तुमचे मत काय आहे?” महाराज म्हणाले, “मला जरी ओशोचे विचार आवडत असले किंवा तात्त्विक वाटत असले तरी आपल्या प्रवचनाला येणारे सर्वच लोक सुशिक्षित नाहीत. कुणी शेतकरी, कुणी व्यापारी, शिक्षक, कामगार किंवा मजूर आणि बऱ्याच प्रमाणात अशिक्षित आहेत. वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आहेत. म्हणून 'ओशोंचा विचार हा खूप खोलाचा आहे. त्यामुळे तो सगळ्यांनाच समजेल असे नाही.
      महाराज पुढे बोलू लागले. मी कीर्तनकार व प्रवचनकार आहे. कीर्तनापेक्षा प्रवचनातून चिंतनशील विचार समजतात. त्यातून एक चिकित्सा करणारा वर्ग तयार होतो. प्रबोधनही होते आणि आपल्यालाही आनंद मिळतो. मंठा शहरात भागवत गीतेतल्या बाराव्या अध्यायातील भक्तियोगावर प्रवचन चालू होते. आणि महाराजांनी भक्तीविषयावर बोलताना सहज सांगितले की, अनेक लोक भक्तीत अडकून पडतात. त्या लोकांना अशा विधा (वैधी) भक्तीतून बाहेर काढायचे आहे. मला विधा भक्ती म्हणजे काय समजले नाही. मी त्यांना प्रश्न विचारला महाराज विधा भक्ती म्हणजे काय ? महाराजांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले. 'भक्तीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सुरुवातीला दोन प्रकार सांगतो. एक विधा भक्ती (वैधी) आणि दुसरी 'रागानुगा' भक्ती,' पुढे महाराज म्हणाले, 'विधा भक्ती म्हणजे विधा, कर्मकांड करत केलेली भक्ती म्हणजे 'विधा भक्ती होय आणि रागानुगा 'भक्ती' म्हणजे कर्मकांड न करता भगवंताविषयी दाखवलेलं सरळ सरळ प्रेम म्हणजेच रागानुगा भक्ती होय.' महाराजांचा हा भक्तीचा प्रकार सांगण्यामागे चांगला हेतू होता. कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठीच प्रवचनाची गरज आहे. असा खुलासाच त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या विवेचनातून व्यक्त झाला होता.
       ह.भ.प. बाबाराव महाराजांची भूमिकाच मुळात कर्मकांडी लोकांना आंधळ्या भक्तीतून बाहेर काढण्याची होती. कारण संपूर्ण समाज कर्मकांडाच्या आहारी गेलेला आहे आणि अशा अंधभक्तांना वाटते की, पापमुक्त होण्यासाठी किंवा सुखी होण्यासाठी विधी, कर्मकांड केल्याशिवाय आपणास सुख मिळणार नाही किंवा आपण पापमुक्त होऊ शकणार नाही. या भ्रमात माणूस अंधभक्त होत गेलेला आहे. या अंधभक्तीत गुरफटलेला समाज जगाच्या विचारवादी प्रवाहाबरोबर राहण्याऐवजी तो मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला जाईल. यासाठी त्याने अशा अंधभक्तीत अडकून पडू नये. यासाठीच अशा प्रवचनातून समाजाला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. असा त्यांच्या प्रवचनाचा गाभा आणि हेतू होता.
    महाराज कर्मकांड, सोंगढोंग या विकृतीवर आपल्या सात्त्विक आणि विनोदी भाषेतून आसुड ओढत असायचे. महाराजांच्या प्रवचनात काही जाणकार होते. काही देव-देव करणारे होते. तर काही भजन पाठ करून म्हणणारे होते. त्यावेळी महाराज सोंग - ढोंगावरही बोलायचे. आणि पुन्हा मूळ मुद्यावर यायचे, कारण त्यांना वाटायचे की, ज्यांच्यासाठी आपण प्रवचन करतो आहोत. तो श्रोतावर्ग, अनुयायी वर्गच दुखावला जाऊन आपल्या प्रवचनातून व आपल्यापासून दूर जाऊ नये, त्यांची आणि आपली ताटातूट होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत होते.
     ह.भ.प. बाबाराव महाराज गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथासह अनेक ग्रंथांचे पारायण करायचे. वारकरी संप्रदाय, भक्ती सांप्रदाय या अनुषंगाने येणाऱ्या सर्व आध्यात्मिक शास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. भगवद्गीतेतील १. अमूर्त विशारदयोग, २. सांख्ययोग, ३. कर्मयोग, ४. ज्ञानकर्म संन्यास योग, ५. कर्मसंन्यासयोग, ६. ध्यानयोग, ७. ज्ञानविज्ञान योग, ८. अक्षरब्रह्म योग, ९. रामविद्यायोग, १०. विभूती योग, ११. विश्वरूपदर्शन योग, १२. भक्तियोग, १३. क्षेत्रक्षेत्रज्ञ योग, १४. गुणप्रथयोग, १५. पुरुषोत्तम योग, १६. देवातूर योग, १७. श्रद्धाप्रय योग, १८. मोक्ष संन्यास योग अशा अठरा अध्यायावर महाराजांचे प्रवचन होत असायचे; परंतु मला ज्ञानेश्वरातील 'पसायदान' पाठाला आवर्जून उपस्थित राहता आले. त्यावेळी मला महाराजांच्या ज्ञानाची व्याप्ती कळाली होती. महाराजांची प्रवचन करण्याची शैली अतिशय परिणामकारक होती. अगदी मनाला रुजणारी आणि अंतर्मनाला भावणारी होती. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, अनेक जाणकार व अभ्यासू श्रोते महाराजांच्या सहवासात घडले. महाराजांच्या अगाध ज्ञानाची अनेकांना प्रचिती आली. महाराजांच्या जवळ असलेली ज्ञानाची शिदोरी काहींना घेता आली. तर काही शिष्यांना ती घेता आली नाही. महाराज हे एक ज्ञानयोगी होते. महाराजांच्या चिंतनाची खोली आणि तात्त्विक अभ्यासाची बैठक माझ्या बुद्धीला पटली होती. म्हणून महाराजांच्या काही दिवसांच्या सानिध्यात 'मोक्ष' म्हणजे काय ? सूक्ष्म देह आणि स्थूल देह म्हणजे काय ? व काही आध्यात्मिक बाबतीतल्या जाणिवांचे आकलन झाले. ते केवळ महाराजांच्या सांनिध्यानेच, हे मान्यच करावे लागेल..! महाराजांच्या प्रवचनातून व काही प्रत्यक्ष भेटीतून तात्त्विक गोष्टींचा मला झालेला उलगडा हा आयुष्यभर आठवणीत राहण्याजोगा आहे.
      महाराजांनी स्वतःच्या चिंतनातून मला 'मोक्षाचा सहज अर्थ सांगितला आणि कोणकोणत्या मोहाचा क्षय झाला पाहिजे, तर षड्विकारांच्या मोहाचा नाश झाला पाहिजे. याविषयी आमची भरपूर चर्चा झाली. षड्विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे टाळायला पाहिजे. या विकारांच्या अतिमोहातून मुक्त व्हायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीची व ऱ्हासाची प्रक्रिया समजून घेणे हाच मोक्ष आहे. मात्र बरीच शिष्य मंडळी, भक्त मंडळी काही वारकरी संप्रदायाची मंडळी आयुष्यभर 'मोक्ष' मिळावा म्हणून, जप, तप, साधना करत असतात. आयुष्यभर 'मोक्षाचा' अर्थ न समजलेली मंडळी, भोंदू साधूंच्या पायावर लोटांगण घालताना दिसतात. 'साधूंचे पाय चेपताना दिसतात. गंध, टिळा, माळा, जटा, भगवी वस्त्रे घालून समाजात अवडंबर दाखवतांना दिसतात अशा लोकांना मोक्षाची व्याख्याच कळालेली नसते. म्हणून ते खोट्या अविर्भावात वावरत असतात.
    महाराजांच्या सानिध्यात जीवनाकडे सकारात्मक बघण्याची दिव्यदृष्टी मिळाली. स्थूलदृष्टीत जी उतावीळ भूमिका असते ती सूक्ष्म दृष्टीत नसते. कारण सूक्ष्मदृष्टीत चिंतनशीलता असते. ती चिंतनवृत्ती असते, जे समोर दिसते त्याच्या पलिकडे बघण्याची क्षमता निर्माण होणे, विचार करण्याचे बौद्धिक ज्ञान प्राप्त होणे. मूलभूत अशा स्थूल अर्थाला जखडून न राहता मनन, चिंतनातून,अभ्यासातून सूक्ष्मदृष्टी प्राप्त होऊ शकते. हा विचार महाराजांच्या सहवासात मला मिळाला. बरेच महाराज मंडळी देवाचे निर्गुण निराकार स्वरूप सांगतात. सगुणभक्ती, निर्गुणभक्ती सांगतात; परंतु बाबाराव महाराज किर्लेकर यांनी आम्हाला द्वैत आणि अद्वैताचा विचार सांगितला. म्हणून आम्हाला परमेश्वर किंवा ईश्वर ही संकल्पना कळाली. ईश्वर ही केवळ मानण्याची बाब नाही. तर ती जाणून घेण्याची गोष्ट आहे. महाराजांच्या वाणीतून, अभ्यासातून भगवद्गितेतील भक्तियोग आणि ज्ञानेश्वरीतील पसायदान या दोन ग्रंथातील कठीण विषयाचे काही अंशी आकलन झाले. महाराजांकडे अगाध ज्ञान होते. 'जे जे आपणांसी ठावे ते ते इतरां शिकवावे' या उक्तीप्रमाणे ते त्यांच्याजवळची शिदोरी कीर्तनाच्या माध्यमातून अनुयायांना वाटत गेले.
     मला मंठा येथील एम.एस.ई.बी. मंदिरात तसेच गुरुकृपा मंगल कार्यालयात त्यांच्या प्रवचनाला हजर राहता आले. महाराजांच्या प्रवचन श्रवणातून जीवनविषयक आणि शास्त्रविषयक काही संकल्पना स्पष्ट समजल्या होत्या.
   ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून सामाजिक स्तरावर असलेले पराकोटीचे अज्ञान दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अनेक भक्तांना अज्ञानातून, कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठीच महाराज कीर्तन व प्रवचन करीत राहिले. त्यांनी वारकरी सांप्रदायाची चळवळ उभी केली. महाराष्ट्रात अनेक संतांनी केलेली भक्तीची चळवळ ही केवळ भक्तीची चळवळ नव्हती. तर ती मुक्तीची चळवळ होती. कर्मकांडातून सामान्य माणूस, अज्ञानी माणूस मुक्त व्हावा. हा या भक्ती चळवळीचा खरा उद्देश होता. बराचसा अज्ञानी वर्ग अंधश्रद्धेतच आणि भक्तीतच अडकून पडला असल्याने तो बाहेर काढणे महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा जो खरा उद्देश होता. ती संताची खरी चळवळ होती.
    ती फक्त अज्ञानी समाजाला कर्मकांडातून आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठीच होती. महाराजांचे कार्य सुद्धा अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्य होते. त्यांच्या प्रबोधनपर कार्याचा गौरव व्हावा. त्यांनी मराठवाड्याच्या प्रवित्र भूमीत जे अनमोल कार्य केले आहे. त्या मौलिक योगदानाचे यथोचित कौतुक व्हावे. त्यांच्या अद्वितीय प्रबोधनपर कार्याची दखल घेतली जावी. त्यांच्या निस्वार्थी कार्यातून नवोदित प्रबोधनकारांनी प्रेरणा घ्यावी. महाराजांचे विचार व कार्य पुढे निरंतर सुरू रहावे हाच एक निर्मळ हेतू या गौरवग्रंथाच्या निर्मितीमागे आहे, असे मला वाटते.
     ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर हे खरे ज्ञानयोगी, मोक्षयोगी होते. 'एक तत्त्वदर्शी ज्ञानवृक्षच' होते. याचा प्रत्यय मला आणि अनेक शिष्यांना आलेला आहे. महाराजांच्या प्रगल्भ विचारांची व प्रबोधनकार्याची अनेकानेक शिष्योत्तमांनी वीणा हाती घ्यावी, हीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल..!

✍️९८९०८२७४१४

डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...